११ जानेवारी, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ जानेवारी २०१४




 ११ जानेवारी 
नामाचे सूक्ष्म स्वरूप. 



नुसते 'राम राम' म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहजच विचारतो, आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की, समजा एखादा मनुष्य 'नोकरी नोकरी' असा जप करीत खोलीत बसला, तर त्याला नोकरी मिळणे शक्य आहे का ? वरकरणी हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा, पण थोडासा विचार केला, तर तो इथे मुळीच लागू पडत नाही, असे कळून येईल. जो दाखला द्यायचा, आणि ज्या बाबतीत तो द्यायचा, त्यांचे गुणधर्म सारखे असावे लागतात. 'रामनाम' आणि 'नोकरी' यांचे परिणाम एकमेकांविरूद्ध आहेत. 'राम राम' म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वत:च्या विस्मरणात होत असतो; म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे, म्हणजे स्थूलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे, हा 'राम राम' म्हणण्याचा परिणाम. परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरूद्ध आहे. मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे. नंतर, ती मिळावी म्हणून दहाजणांचे आर्जव करायचे, त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा, आणि मग आपण ती नोकरी करायची. म्हणजे नोकरी या कल्पनेतून, सूक्ष्मातून, स्थूलात जाणे हा नोकरीचा प्रकार. पण 'राम राम' म्हणणे हा प्रकार स्थूलांतून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे. यावरून नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही हे स्पष्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे 'नोकरी नोकरी' असा जप करून नोकरी मिळणे कठीण हे तर खरेच, पण 'राम राम' म्हणून राम मिळणे कसे सोपे, किंबहुना कसे हमखास शक्य आहे हे पहा. नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून, ती प्रत्यक्षात आणण्याकरिता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते, हे आपण आत्ताच पाहिले. तसेच, घर बांधणे ही कल्पना; ती पुरी करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचे आगर व्हावे या हेतूने सर्व जिनसा पैदा करून त्यात आणून ठेवणे, म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला. आता हे करणे किती कष्टाचे आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे. 'राम राम' म्हणण्याचे उद्दिष्ट, स्थूलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे; म्हणजेच, अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एकेक वस्तू फेकून देऊन रिकामे करण्यासारखे आहे. ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे. तेव्हा 'नोकरी नोकरी' म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण, तितकेच 'राम राम' म्हणून राम मिळणे निश्चित आहे. सबब 'राम राम' म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता 'राम राम' जपावे. मनाच्या सर्व दु:खाला कारण देहबुद्धी आहे. ती जायला उपाय एकच; प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे. त्याच्या योगाने सर्व मल जाईल. नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल. चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे. 'मी' पणा टाकावा आणि परमात्म्याचे होऊन राहावे.

 ११. जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदु:खाची जाणीव राहणार नाही. तो आनंदात राहील.
 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१० जानेवारी, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० जानेवारी २०१४


 १० जानेवारी 
नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥



 संसारातील सार । आपला करा रघुवीर ॥
 कलि अत्यंत मातला । नीतिकर्तव्याचा विसर पडला ॥
अनाचार होतसे फार । आता नाही रामावाचून दुजा ठाव ॥
चोराने घरफोड केले । मग जागृतीचे कारण नाही उरले ॥
 म्हणून असावी सावधान वृत्ति । अखंड राखावी भगवंताची स्मृति ॥
 भगवंतासी अनन्य होता । दु:खाची नाही तेथे वार्ता ॥
अभिमानवृत्ति सोडावी बरी । त्यास घडे रामसेवा खरी ॥
सरे मीपणाची उरी । ब्रह्मरूप दिसे चराचरी ॥
म्हणून ज्याने जन्माला घातले । ज्याने आजवर रक्षण केले ।
 तो माझा धनी हे ठेवून चित्ती । भावे भजावा रघुपति ॥
रामाचे व्हावे आपण । राम जोडावा आपण ॥
 हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण ॥
 म्हणून रामाविण न मानी कोणी त्राता । धन्य त्याची माता पिता ॥
 प्रपंच तसा परमात्म्यावाचून । हे जसे अलंकार सौभाग्यावाचून ॥
अलंकार सर्व घातले । पण सौभाग्यतिलक न लावले ॥
 तैसे रामाविण राहणे आहे खरे ॥
ऐहिक आणि पारमार्थिक । न जाणावे एकाहून एक परते ॥
ऐहिक आणि पारमार्थिक सुख । रामावाचून नाही देख ॥
म्हणून शुध्द असावे आचरण । तसेच असावे अंत:करण ॥
त्यात भगवंताचे स्मरण । हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥
 रामचरणावर ठेवावा विश्वास । हेच परमार्थाचे भांडवल खास ॥
 ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण । हीच परमार्थाची खरी शिकवण ॥
माझे हित भगवंताचे हाती । हीच ठेवावी मनाची प्रवृत्ति ॥
राम कर्ता ही असावी भावना । तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा ॥
भाव ठेवावा रामापायी । पण व्यवहार चुकू न देई ॥
परमात्म्याचे राखणे अनुसंधान । हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण ॥
बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगति । चित्ती असावा एक रघुपति ॥
 प्रयत्‍न करणे आपल्या हाती । यश देणे भगवंताचे हाती ॥
प्रयत्‍नाला न पाहावे पुढे मागे । परि परमात्मा उभा आहे मागे । ही ठेवावी जाणीव मनामध्ये ॥
प्रपंचात दक्षतेने वागत जावे । धीर सोडू नये । भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे ॥
 सर्व कामधंदा घरी करी । पण चित्त लेकरांवरी । ऐसे जैसे करी जननी । जाण तैसे वागावे आपण ॥
 काया गुंतवावी प्रपंचात । मन असावे रघुनाथात ॥
 नीतिधर्माचे आचरण । पवित्र असावे अंत:करण ।
त्यात कर्तव्याची जोड पूर्ण । त्या सर्वात राखता आले अनुसंधान । तर याविण दुजा परमार्थ नाही जाण ॥
व्यवहार उत्तम प्रकारचा केला । पण परमात्मा विसरला । तो व्यवहार दु:खच देता झाला ॥

१०. असावी सावधानवृत्ति । अखंड राखावी भगवंताची स्मृति ॥ 

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

९ जानेवारी, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन-९ जानेवारी २०१४


 ९ जानेवारी
 नाम व विकल्प ! 



नाम घेऊ लागले की विकल्प उठतात आणि ते घेण्याबद्दलची निष्ठा कमी होते, याला काय करावे ? अशी तक्रार आपण सर्वसाधारणपणे करतो; पण असे होण्यातच नामाचे महत्त्व प्रस्थापित होते हे आपल्या लक्षात येत नाही. मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होते, आणि आता हा नाम घेऊ लागला, आता आपली धडगत नाही अशा धास्तीने त्यांची चळवळ चालू होते, आणि मनुष्याला नामापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्‍न करतात. विकल्प हे अती सूक्ष्म आहेत. त्यांचे उच्चाटन करायला त्यांच्यापर्यंत पोहोचणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे. तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम. एखाद्या बिळात सर्प शिरला तर त्याला बाहेर काढण्याकरिता त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला तिथे राहणे असह्य करील असाच उपाय करणे जरूर असते. बाहेरून कितीही आरडाओरडा केला तरी त्याचा उपयोग होत नाही. बिळात धूर किंवा गरम पाणी सोडले की तो बाहेर येतो. त्याप्रमाणे नाम घेतले की विकल्प उठतात, म्हणजे विकल्पांच्या मूळ ठिकाणापर्यंत नामाची आच जाऊन पोचली असे ठरते. तर मग नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागले तर गांगरून न जाता, हे सुचिन्ह आहे असे समजून विकल्पांच्या उच्चाटनाची गुरूकिल्ली मिळाली अशा जाणिवेने, जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्चय करावा हाच त्याला उपाय. नामाबद्दल सुरूवातीला सर्वांचीच वृत्ती साशंक असते, पण आपण सतत नाम घेत गेल्यानेच विकल्प कमी होतात. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही; आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले. आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटायचीच; पण आपण आपले नाम चालू ठेवावे. तसे, विकल्प आले तर नाम सोडू नये. पण गंमत अशी होते की, वाईट मनुष्य भेटला आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही असे म्हटले तरी, तो मुद्दाम खाकरतो आणि आपले लक्ष वेधतो. अशा वेळी त्याच्याकडे पाहूनही आपण दुर्लक्ष करतो. त्याचप्रमाणे विकल्पांनी आपले लक्ष ओढून घेतले तर नावडीने लक्ष द्यावे पण आपले नाम सोडू नये. शंका घ्यायचीच झाली तर नाम चालू ठेवून घ्या, म्हणजे ते नामच शंकांचे निरसन करील आणि विकल्पांनाही हळूहळू पायबंद घालील.

 ९. पुष्कळ केलेले शंकेने व्यर्थ जाते. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरविले की आपली वृत्ती निःशंक होतेच होते.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

८ जानेवारी, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन-८ जानेवारी २०१४



८ जानेवारी 
नामाचे प्रेम नामाच्या सहवासाने येईल.


नामाचे प्रेम आपल्या प्रेमळ आईकडेच बघा. मुलाला जरा ताप आला तरी आईच्या पोटात धस्स होते अन्न गोड लागत नाही अशा अनेक गोष्टी होतात. थोडक्यात म्हणजे तिला सर्व बाजूंनी अस्वस्थता उत्पन्न होते. नाम घेण्यात थोडा व्यत्यय आला तर आपली स्थिती तशी होते का याचे उत्तर आपल्याला स्वत:कडूनच मिळण्यासारखे आहे. नाम घेणे हा माझा धर्म आहे ते माझे आद्य कर्तव्य आहे त्याच्याशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे नाम घेण्यात माझे आत्यंतिक हित आहे किंबहुना मी नामाकरिताच जन्माला आलो आणि तद्‌रूपच होऊन जाईन इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणे जरूर आहे आणि मग प्रेम आले नाही ही गोष्ट शक्यच नाही. प्रेम येत नाही याचा अर्थच हा की आम्ही नाम खर्‍या आस्थेने घेत नाही. ह्या सर्वांवर उपाय म्हणजे घेण्याच्या निश्चयाने ते जसे येईल तसे घेत राहणे. तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेऊन ध्येय गाठून देईल. परिस्थिती चांगली आली म्हणजे नाम घेईन असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही. नाम हे मनात किंवा उच्चार करूनही घेता येते. नामात राहावे म्हणजे अंत:करणाची शुध्दता होईल आणि अंत:करण शुध्द झाले की भगवंताचे प्रेम येईल. नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेले प्रेम नामात असणे जरूर आहे. खरे म्हटले म्हणजे नामांतच नामाचे प्रेम आहे. ताकात लोणी असतेच, फक्त ते वर दिसत नाही पण ताक घुसळल्यावर जसे ते वर येते तसे भगवंताचे नाम आपण घेतले की त्याचे प्रेम आपोआप वर येते. साध्या शब्दांचादेखील आपल्या वृत्तिवर परिणाम होऊन तो तो भाव आपल्या मनात जागृत होतो मग भगवंताच्या नामाने भगवंताचे प्रेम का येणार नाही ? आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्‍न करा. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी आपल्याला प्रेम येते ना ? प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे. तसे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल. उठता बसता चालता बोलता आपण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्‍न करावा. कोणतेही व्यसन कालांतराने पचनी पडते आणि मग मनुष्य जास्त जास्त त्याच्या आधीन जातो. अफूचे पहा दिवसेंदिवस त्या माणसाला जास्त अफू लागते. त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनाचे आपल्याला व्यसन लागले पाहिजे. कोणतीही चांगली गोष्ट साधायला कठीण असणारच; पण अगदी थोडया श्रमात पुष्कळ साधून देणारे नामासारखे दुसरे साधन नाही. म्हणून नेहमी मनाने नाम घेत असावे.
८. नामाचे प्रेम यायला एक गुरूंना ते आवडते म्हणून घ्यावे किंवा दुसरे नामातच माझे कल्याण आहे या भावनेने घ्यावे.
 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

७ जानेवारी, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन-७ जानेवारी २०१४


  ७ जानेवारी
 नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे. 

 नामाचे प्रेम का येत नाही, हा प्रश्न बहुतेकजण विचारतात. पण थोडासा विचार केला तर असे लक्षात येईल की, हा प्रश्नच बरोबर नाही. मूल न झालेल्या बाईने, 'मुलाचे प्रेम कसे येईल ?' असे विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे. मूल झाले की प्रेम त्याच्याबरोबरच येत असते. तेव्हा 'मुलाचे प्रेम कसे येईल' हा प्रश्न करण्याऐवजी 'मूल कसे होईल' याचाच विचार करणे बरोबर ठरेल. आपणसुद्धा प्रश्न करायचाच असेल तर 'नामाचे प्रेम कसे येईल' असा करण्याऐवजी, 'मुखी नाम कसे येईल' असा प्रश्न करणे बरोबर होईल. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे ? दुसर्‍या कोणाचीही नसून आपली स्वत:चीच आहे. वास्तविक, एकदा नाम घ्यायचे ठरवून सुरूवात केली की झाले. पण तसे होत नसेल तर, दोष दुसर्‍या कोणाचा नसून आपला स्वत:चाच आहे. म्हणून नाम घेणे हे आपले काम आहे; मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे. जसे आईच्या बाबतीत, मूल आणि प्रेमाचा पान्हा ही निराळी असूच शकत नाहीत, तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. ह्यावरून एक गोष्ट अशी ठरली की, 'प्रेम का येत नाही', याचे उत्तर आमच्याजवळच आहे, आणि ते म्हणजे, 'नाम घेत नाही म्हणून.' यावर कोणी असे म्हणेल की, आम्ही नाम घेतोच आहोत, तरीही प्रेम का येत नाही ? हे विचारणे ठीक. पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो, त्याचा विचार केला तर काय दिसेल ? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो, तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरूने, नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण ते घेतो, किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेतो, इतकेच. अर्थात्, तसे घेतले तरी आज ना उद्या आपले काम होईलच. पण 'प्रेम का येत नाही', असा प्रश्न विचारण्यापूर्वी, आपण नाम किती आस्थेने घेतो, हा प्रश्न स्वत:ला विचारणे जरूर आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्याबाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली होणे जरूर आहे. आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला नकळत होते, तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्याला नकळत झाली पाहिजे. ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थात 'मिळविण्यापेक्षा' मिळविलेले 'टिकविणे', हेच जास्त कठीण आहे. ज्याला 'मी काही तरी झालो' असे वाटते तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे.

 ७. नवर्‍याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही. तिने नाम घेतले तर धर्म सोडला असे न होता उलट संसार सुखाचा होईल.
 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

६ जानेवारी, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ जानेवारी २०१४



 ६ जानेवारी
 नाम - रूपाचा संबंध ! 


नाम घेत असताना रूपाचे ध्यान आवश्यक आहे का ? वास्तविक, नाम आणि रूप ही भिन्न नाहीतच. पण नाम हे रूपाच्या आधीही असते आणि नंतरही उरते. नाम रूपाला व्यापून असते. राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मीकींनी रामायण लिहिले, आणि रामाने मागाहून जन्म घेऊन त्यात वर्णन केल्याप्रमाणे आचरण करून दाखविले. म्हणजे रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते, आणि रूप गेल्यानंतर आजही नाम शिल्लक आहे. देशकालाच्या पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते. म्हणजे नाम हे देशकालाच्या पलीकडे असते; म्हणजे ते रूपापेक्षा जास्त सत्य असते. जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे. तेव्हा नाम घेणे ही गोष्ट मुख्य आहे. ते घेत असताना रूपाचेही ध्यान राहिले तर उत्तमच; पण ते तसे न राहिले, तरी नाम घेत असताना रूपाचे स्मरण सूक्ष्मरूपाने असतेच असते. समजा, एका गृहस्थाच्या घरी राम नावाचा गडी आहे. तो गृहस्थ 'राम राम' असा जप करीत बसला आहे, पण त्याचे लक्ष राम-रूपाकडे नाही, मनात काहीतरी दुसरेच विचार चालू आहेत. अशा वेळी त्याला जर एकदम विचारले की, 'तुम्ही कुणाचे नाव घेत आहात' तर अर्थात् 'रामाचे' असेच उत्तर तो देईल. हे उत्तर देताना त्याच्या मनात "दाशरथी राम" हीच व्यक्ती असणार. "राम गडी" ही व्यक्ती नसणार. याचाच अर्थ असा की, नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्मरूपाने आत जागृत असते. म्हणूनच, रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये. नामस्मरण करण्याचा अट्टाहास ठेवावा, त्यात सर्व काही येते. एखाद्या माणसाची आणि आपली ओळख असेल तर पहिल्याने त्याचे रूप पुढे येते आणि नंतर नाम येते. पण आपली त्याची ओळख नसेल, आणि आपण त्याला बघितलेला नसेल, तर त्याचे फक्त नाव येते. आज आपल्याला भगवंताची ओळख नाही, म्हणून त्याचे रूप माहिती नाही; परंतु आपल्याला त्याचे नाम घेता येईल. सध्यासुद्धा, त्याचे नाम घेताना त्याची आठवण आपल्याला होते हा आपला अनुभव आहेच. भगवंताचे रूप तरी निश्चित कुठे आहे ? एक राम 'काळा' तर एक 'गोरा' असतो; एक राम 'लहान' तर एक 'मोठा' असतो; पण सर्व रूपे रामाचीच असतात. भगवंत स्वतः अरूप आहे; म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच ती लीन होतात. म्हणून भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे. हे त्याचे नाम तुम्ही आवडीने, अखंड घ्या आणि आनंदात रहा.

 ६. दानात दान अन्नदान, उपासनेत उपासना सगुणाची उपासना, आणि साधनात साधन नामस्मरण. 
 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

५ जानेवारी, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ जानेवारी २०१४



५ जानेवारी 
नामस्मरण व एकाग्रता 

नामस्मरण करताना चित्त एकाग्र का होत नाही ? त्याकरिता काय करावे ? नामस्मरण करीत असताना हजार तर्‍हेचे विचार मनात येतात हे खरे. त्यांना आवरण्याचा पहिला उपाय म्हणजे त्या विचारांच्या मागे न जाणे. विचार मनात आले तर त्या विचारांना फाटे फोडून ते वाढवू नयेत; म्हणजेच मनोराज्य करू नये. विचार जसे येतील तसे जातील, तिकडे लक्ष देऊ नये. चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे. चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे. चित्त चंचल आहे. त्याला कुठेतरी स्थिर करून ठेवल्याशिवाय भागत नाही, म्हणून ते नामात गुंतवून ठेवावे. नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या कानांनी ऐकावे, म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होईल. एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही, आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही, या संशयात न पडता साधे, सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआप एकाग्रता येईल. दुसरी गोष्ट अशी की, ज्याची आपल्याला आवड असते त्यात आपल्याला एकाग्र होता येते. आपल्याला विषयाची आवड असते म्हणून विषयाचे सेवन करताना आपण एकाग्र होतो; मग त्याचप्रमाणे विषयाच्या ऐवजी आपण परमात्म्याची आवड धरली तर त्याच्या ठिकाणीही एकाग्र होता येणार नाही का ? म्हणून, आज विषयाची जितकी आवड आहे तितकीच देवाच्या प्राप्तीबद्दलही आवड ठेवावी, म्हणजे आपल्याला त्याच्या ठिकाणी एकाग्र होता येईल. एकाग्र होणे म्हणजे त्या ठिकाणी समरस होणे. मीठ पाण्यात टाकले म्हणजे ते पाण्याहून वेगळे राहते का ? योग केल्याने एकाग्र होता येईल खरे, पण जोपर्यंत समाधी आहे तोपर्यंतच ती एकाग्रता टिकेल. सर्वांभूतीं भगवद्‍भाव पाहणे हेच खरे एकाग्रतेचे साधन. सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे असे समजल्यावर द्वैत कुठे राहिले ? आणि जिथे द्वैत गेले तिथे आपोआप एकाग्रता आलीच. अशी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय. मनुष्य अगदी एकटा असला किंवा एकांतात असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवती गोळा करतो. विशेषत: विद्वान लोकांना कल्पना जास्त असतात. तेव्हा कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करू या. भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे, अशी कल्पना आपण करू या; त्यातच खरे हित आहे. कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आणून सगुण करावा, आणि तिथेच आपले चित्त स्थिर करण्याचा प्रयत्‍न करावा.

 ५. मन एकाग्र होत नसेल तर न होवो पण नामस्मरण सोडू नये.
( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

४ जानेवारी, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ जानेवारी २०१४



 ४ जानेवारी 
नाम कसे घ्यावे ? 


 नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे, पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते. पेढा ज्याने खाल्ला आहे, तो पेढा कसा खाऊ म्हणून जसे विचारणार नाही, तसे नाम घेणारा मनुष्य नाम कसे घेऊ म्हणून विचारणार नाही. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहात नाहीत. बी शेतात पडते तेव्हा, ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्यातरी एका बाजूला, खाली किंवा वरही असू शकेल; पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो. तसे, नाम कसेही घेतले तरी घेणार्‍याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. नाम घेताना कोणती बैठक असावी, किंवा कोणते आसन घालावे ? हा प्रश्न म्हणजे श्वासोच्छवास करताना कोणत्या तर्‍हेची बैठक असावी असे विचारण्यासारखा आहे. समजा, एखाद्याला दमा झाला आहे, तर तो काय करतो ? तो अशा तर्‍हेने बसण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्‍न करतो की, जेणेकरून श्वासोच्छवास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल; म्हणजे श्वासोच्छवास सुलभ रीतीने कसा चालेल, हे त्याचे ध्येय असते, आणि मग त्याकरिता देहाची बैठक कशीही ठेवावी लागली तरी चालते. श्वासोच्छवास विनाकष्ट चालू ठेवणे हे जसे त्याचे ध्येय असते तसे नाम अखंड कसे चालेल हे आपले ध्येय ठेवावे; आणि त्याला मदत होईल, व्यत्यय येणार नाही, अशा तर्‍हेची कोणतीही बैठक असावी. बैठकीला फार महत्व देऊ नये. समजा, आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागली, तर आपले लक्ष नामापेक्षा देहाकडेच लागेल; म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल. म्हणून नामस्मरणात खंड न व्हावा हे ध्येय ठेवून, त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृतिधर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी. भगवंताच्या नामाला शरीराचे कसलेही बंधन नाही. हेच तर नामाचे माहात्म्य आहे. मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे स्मरण सहज ठेवता येण्याचे एकच साधन आहे आणि ते म्हणजे त्याचे नाम होय. पण देहबुद्धी अशी आहे की त्या निरूपाधिक नामाला आपण काही तरी उपाधी जोडतो आणि त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो; असे न करावे. इतर उपाधी सुखदु:ख उत्पन्न करतील, पण नाम निरूपाधिक आनंद देईल.

४. शुध्द भावनेत आणि निष्ठेत खरे समाधान आहे; ही निष्ठा अनुसंधानाने उत्पन्न होते.

३ जानेवारी, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ जानेवारी २०१४



 ३ जानेवारी
 नाम कुठवर घ्यावे ? 

नाम कुठवर घ्यावे ? आपला श्वासोच्छवास चालू आहे, किंवा स्वत:ची स्मृती आहे, तिथपर्यंत नाम घ्यावे. आपण श्वासोच्छवास जसा मरेपर्यंत घेतो तसेच नामाचे आहे. बरोबर भाषेत बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, श्वासोच्छवास थांबला म्हणजे मरण येते त्याचप्रमाणे नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखेच आहे, असे वाटले पाहिजे. अक्षरश: जीव जाईपर्यंत, म्हणजे मीपणाने मरेपर्यंत नाम घेत सुटावे. शेवटी 'मी' जातो आणि नाम शिल्लकच उरते. नाम घेऊन कधी पुरे होऊ शकत नाही. मुक्ती मिळाली की सर्व पुरे झाले असे म्हणतात, पण मुक्तीनंतरही जर काही कर्तव्य उरत असेल तर ते नामस्मरणच. माणसाला गुंगीचे औषध दिले म्हणजे त्याला गुंगी आली की नाही हे पाहण्यासाठी अंक मोजायला सांगतात. अंक मोजता मोजता तो थांबला की, तो देहभानावर नाही असे ठरते. तसे, नाम घेता घेता 'मी नाम घेतो' हेही स्मरण जेव्हा राहात नाही तेव्हाच त्या नामात रंगून गेलेल्या माणसाचे पर्यवसान 'एकांतात' होते. एकांत म्हणजे नाम घेणारा मी एक, ह्या एकाचाही अंत होणे म्हणजेच देहबुध्दीचा विसर पडणे, देहबुध्दीच्या पलीकडे जाणे. नाम घेता घेता अशी स्थिती प्राप्त झाली, म्हणजे त्याचे चित्त भगवंताकडे आहे की नाही असा प्रश्न करायला वावच कुठे राहतो ? निद्रानाशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत झोपेचे औषध आपण घेतो, तसे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे. नाम उपाधिरहित असल्याने आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही. नामाने आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य लाभून त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही; किंबहुना, ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते. नामजपाची संख्या नोंद करून ठेवावी का ? अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला असेल, किंवा रोजचा काही कमीत कमी जप करण्याचे ठरविले असेल, तर जपसंख्येची नोंद करून ठेवणे जरूर आहे. जपाची सवय होण्याच्या दृष्टीने, आणि नेमाने काहीतरी किमान जप झाल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीनेही, जपसंख्येची नोंद करावी. मात्र असे करताना एका बाबतीत खबरदारी घ्यावी; ती म्हणजे, आपली आजची नामसंख्या पुरी झाली, आता उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काही संबंध नाही, अशा तर्‍हेची वृत्ती होण्याचा संभव असतो त्याला जपावे आणि नेमाची संख्या पुरी झाली तरी होईल तेवढे आणखी नाम घेण्याची सवय ठेवावी.

 ३. साध्या माणसाने विशेष खोलात न शिरता, सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे.

२ जानेवारी, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ जानेवारी २०१४





 २ जानेवारी
 नाम सद्‍गुरूकडून घेणे श्रेयस्कर.

 नाम सदगुरूकडूनच घेणे जरूर आहे की ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालेल ? वास्तविक भगवंताचे नाम स्वत:सिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे; त्याला दुसर्‍या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही. म्हणून सदगुरूकडून घेतलेले नाम आणि आपण स्वत:च्या पसंतीने घेतलेले नाम ह्यांत फरक करता येत नाही. तरीसुध्दा सदगुरूकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्टय आहेच. ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते. त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्याच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तर्‍हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहात नाही. सदगुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. म्हणून सदगुरूकडून नाम घेणे जरूर आहे. सदगुरू भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सदगुरूची भेट करवून देईल. तसे पाहता आधी संताची भेट होणे कठीण; समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते. म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे. खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळयांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढीत येतात. तसे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील. खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा. संतांना काय आवडते ? भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा. सदगुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील. आता अशा रीतीने सदगुरूने नाम दिल्यावर एखाद्याला असे वाटेल की मी 'राम राम' असे म्हणत होतोच आणि आता सदगुरूने तेच सांगितले तर मग यात काय मोठे झाले? पण यातच विशेष आहे कारण यात मी कर्ता हा अभिमान टाकावा लागतो. सदगुरूकडून नाम घेतले म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वाव रहात नाही. मिठाचा एकच खडा खीर नासवायला कारणीभूत होतो. म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्वाची ठरते. भगवंताचे नाम हे औषध समजावे भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ जरूर तेवढेच करणे, म्हणजे सांगितलेले तेवढेच करणे, जास्त न करणे, हे त्याचे अनुपान समजावे. औषध मात्र थेंबथेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे.

२. साध्या शब्दांचासुध्दा आधार मोठा असतो मग भगवंताच्या नामाचा आधार केवढा मोठा असेल.

१ जानेवारी, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १ जानेवारी २०१४



१ जानेवारी

नाम हे परमात्मस्वरूप आहे.




नाम म्हणजे भगवंताचे नांव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळया नांवांत फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुणरूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवर्‍याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तिचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तिसुध्दा सूक्ष्म आहे म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल, वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल, चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळयांचा भावार्थ एकच आहे. अन्नाला स्वत:ची चव असते त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वत:ची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वत:ला विसरून जावे हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे. जसे आपले आपलेपण आपल्या नांवात आहे तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते परंतु देहबुध्दी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मस्वरूपच आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे.

 १. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही.

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या