३० जून, २०२१

दिनविशेष - ३० जून

. .

दादाभाई नौरोजी ( स्मृती दिन)

दादाभाई नौरोजी (1825-1917) ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येणारे पहिले आशियाई नेते होते. पण त्यांची ओळख एवढीच नाही. महात्मा गांधी यांच्याआधीचे ते देशातील प्रमुख नेते होते. जगभरात त्यांना जातीयवाद आणि साम्राज्यवादाविरोधात लढणारे नेते, म्हणूनही मान होता.

भारत रत्न सी.एन.आर.राव - जन्मदिवस

चिंतामणी नागेश रामचंद्र राव, ऊर्फ सी.एन.आर. राव हे एक कन्नडभाषक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. घन-स्थिती रसायनशास्त्र व संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. त्यांचे आजपर्यंत चौदाशे शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी एकूण ४५ पुस्तके लिहिली आहेत.

( माहिती संग्रहित, चित्र साभार तत्वमसी यूथ क्लब)


२९ जून, २०२१

ज्योतिष अभ्यासकास पत्र

. .
 'ज्योतिष पदवीसाठी' प्रवेश घेऊ इच्छिणा-या  अभ्यासकास  माझ्याकडून  एक पत्र: -📝

ज्योतिष पदवी आता घेता येईल  अशी  आशा निर्माण  झाली असली , अजून अभ्यासक्रम काय आहे  , काय काय विषय समाविष्ट होणार याबाबत अजून विस्तृत माहिती नसली   , नेहमीप्रमाणे  विषय समजवून न घेताच  अनेक संस्था विरोधासाठी उभ्या ठाकल्या असल्या, तरी या विषयात पदवी घ्यायची तुझी इच्छा झाली याबद्दल  सर्वप्रथम अभिनंदन 💐
 ज्योतिष या विषयाची व्याप्ती एवढी  प्रचंड आहे की दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात आपण जेवढे ज्ञान घेऊ ते कमीच असणार आहे  आणि  हे मनात सुरवातीपासूनच पक्के ठेवावेस असे सांगावेसे वाटते  . 

खगोल शास्त्र , गणित ,  विज्ञान  यातील  अनेक सिध्दांत शिकून जेव्हा तुला पदवी मिळेल  ती  मात्र ' आर्ट'/ किंवा 'कला' शाखेची  ( MA ) .  ही गोष्टच मला  विशेष वाटते  आणि  या शास्त्रासंबंधीचे  अगदी संक्षिप्त   वर्णन करायला  पुरेसी ठरते .  

असं म्हणतात की " सुखी सोनाराकडे आणि दु:खी ज्योतिषाकडे " . तेव्हा आपल्याकडे आलेल्या  जातकाची मुळातच  मनस्थिती ठीक नसते . अशावेळी मार्गदर्शनासाठी आलेल्या जातकाची अडचण समजवून घेणे ,संभाषणातून त्याला बोलते करणे  ही एक कला आहे  आणि यात प्राविण्य मिळवणे तसे सोपे नाही . अर्थात येणारा जातक इतके ज्योतिष  असताना  आपल्याकडेच येणे ही पण एक नियतीची योजना असते . कारण त्यावेळी त्या जातकाला भेडसावणा-या प्रश्नाचे योग्य उत्तर ( होकारार्थी किंवा नकारार्थी  जे प्रत्यक्षात घडणार असेल ते  )  आपणच योग्य प्रकारे देऊ शकणार असतो. तो जातक ही ज्या  ग्रहस्थितीवर येतो , त्यावेळची ग्रहांची स्थिती प्रश्नाचे उत्तर शोधायला   मदत करत असते. अर्थात हे सगळे तू  शिकशीलच. 

आणखी एक महत्वाची गोष्ट  जस जस अधिक अधिक पत्रिका सोडवायला लागशील  तसतस तुझ्या  लक्षात येईल  की पत्रिकेतील ग्रह ही आपल्याशी बोलत असतात. अर्थात ते सांकेतिक भाषेत. ती  भाषा अवगत करणे ही पण एक ' कला आहे ' .  पत्रिकेत  दिसताना  फक्त १२ राशीत , १२ स्थानात  , १२ ग्रह  असले  तरी  ग्रहांची  एकमेकांशी असलेली केमेस्ट्री , कुणाची  युती, कुणाची आघाडी , कोण कुणावर लक्ष ठेऊन आहे ? कोण   कुणाच्या घरात  भाड्याने आहे  , वरवर न दिसणा -या  नवमांश कुंडलीत  हेच ग्रह कशा पध्द्तीने भूमिका पार पाडत आहेत  ,  पत्रिकेतील निर्णायक घटक कोणता , वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात कोणता ग्रह महत्वाचा ठरणार हे सगळं 
' कले कलेने'  तुझ्या लक्षात येईलच.

तुझा जातक तुझ्याकडून  योग्य मार्गदर्शन घेऊन  समाधानाने जाऊन  तू  त्याच्यासाठी "फॅमिली ज्योतिष"  होशील या सदिच्छा 

हे शेवटचं सांगणं.वेळोवेळी तुला  अनेक गोष्टीकडे  दुर्लक्ष  करावे लागेल. त्या गोष्टी कुठल्या  हे मी तुला आता सांगणार नाही कारण त्या गोष्टींचा तू स्वतः सामना करून अनुभसिद्ध व्हावेस आणि अशा प्रसंगाला तोंड देण्यास तू  खंबीर व्हावेस असे मला वाटते. 

आता तुझ्या मनात आलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न.  मी  कोण  हे सगळं लिहिणारा ?

तर  मित्रा मी पण  एक ज्योतिषी अभ्यासकच. आजपर्यत  तरी  कुठलीही  ज्योतिष उपाधी/ पदवी नसणारा . 

थोडक्यात  मी  जरा  
'  लिटील - जास्त - अभ्यासक ' तुझ्यापेक्षा 

आता ते लिटिल चँम्प डायरेक्ट परीक्षक बनू शकतात तर

एवढा  सल्ला देऊच शकतो ना भौ मी तूला 😜 

( अजूनही लिटिलच पण चॅम्प नसणारा  ज्योतिष अभ्यासक )  अमोल  केळकर 📝

ज्येष्ठ कृ.पंचमी
२९ जून २१  

दिनविशेष - २९ जून

। 
कॅप्टन  विजयंत थापर -बलिदान दिन
 कारगिल युध्दात वीरमरण

क्रांतिकारी राजेंद्रनाथ लाहिरी- जन्म दिवस
काकोरी कट आणि दक्षिणेश्वर बॉम्बस्फोटामागील सूत्रधार. ते हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रिय सदस्य होते


स्वामी ध्रुवानंद सरस्वती पुण्यतिथी - आर्य समाजाचे सदस्य, गोहत्या बंदी साठी विशेष आंदोलन केले

प्रशांतचंद्र महालनोबिस - जन्मदिवस ( २८ जून स्मृतीदिन)
प्रसिद्ध भारतीय संख्याशास्त्रज्ञ





२८ जून, २०२१

दिनविशेष २८ जून

वह धन्य देश की माटी है, जिसमें भामा सा लाल पला।
उस दानवीर की यश गाथा को, मेट सका क्या काल भला॥

२७ जून, २०२१

रविवारची संकष्टी भाग २

. .रविवारची संकष्टी - भाग २

गेल्या वर्षी १० मे ला रविवारी संकष्टी होती. तशी ती ३१ जानेवारी २१ ला आली ,त्यानंतर आता रविवारी २७ जून ला आहे आणि परत यावर्षी आँक्टोबर २४ ला येत आहेत


एकंदर निभावण्यास कठिण अशी रविवारची संकष्टी असते हे नक्की. या बाबतचे माझे मनोगत भाग-१ मधे लिहिले आहे. त्याची लिंक सोबत दिली आहे. इच्छूकांनी अवश्य वाचावे.

आज या रविवारच्या संकष्टी निमित्य थोडे वेगळे अनुभव. श्री गणेश हे संकष्टीचे ( कृ. चतुर्थी) उपास्य दैवत. मात्र रविवार आणि गणेश दर्शन हे समीकरण मात्र ब-याच वेळा, अनेकांनी  अनुभवलं असणार.
लहानपणी सांगलीत असताना रविवारी संकष्टी असली की बागेतला गणपती का संस्थानच्या गणपतीला ? असा प्रश्ण पडायचा आणि मग दोन्ही ठिकाणचे दर्शन घेणे हा मार्ग काढला जायचा. मात्र रविवारी संकष्टी नसली आणि जरी कारखान्याहून सांगलीत येणे झाले की दोन पैकी एका मंदिरात जायचेच हे हळूहळू इतके पक्के झाले की शिक्षण, नोकरी निमित्य सांगली सोडून गेल्यावर सुट्टीला कधी येणे झाले तर यापैकी एका बाप्पांचे दर्शन घेणे हे 'मस्टच' असा पक्का निर्धार झालेला आहे.

गाव सोडून नोकरीसाठी चिपळूणला गेल्यावर रविवारी कधी गणपतीपुळे तर कधी हेदवी च्या सिध्दीविनायकाचे दर्शन घ्यायचा योग आला. इंजिनिअरिंगचा एक मित्र वाईचा असल्याने ब-याचदा रविवारी त्याच्याकडे गेल्यावर ढोल्या गणपतीचे दर्शन झाले. पुणे हे अजोळ असल्याने लहानपणापासून तळ्यातला गणपती ( सारसबाग), पेशवे पार्क, पर्वती हा रविवारचा कार्यक्रम फिक्स्ड असायचा. आजकाल मात्र दशभूजा गणपती पर्यतच जाणे होते.

मुंबईत स्थाईक झाल्यावर अर्थातच रविवारी प्रभादेवीचा सिद्धीविनायक होतोच. आलेल्या पाहुण्यांना सिद्धीविनायक दर्शन घडवण्याचा योग रविवारीच ठरवला जायचा. दोन चार वेळेला कंपनी तर्फे आयोजित सिध्दीविनायक पदयात्रेत सामील होता आले जी शनिवारी रात्री कंपनीतून निघायची आणि रविवारी पहाटे काकड आरतीला मंदिरात पोहोचायची.

मुंबई परिसरात भ्रमंतीसाठी / नातेवाईक / मित्र परिवार यांच्याकडे जाण्यासाठी रविवार हा हक्काचा दिवस. याच रविवार मुळे टिटवाळा महागणपती, खोपोलीचा वरदविनायक, डोंबिवलीचा सिद्धीविनायक, चिरनारचा गणपती, पालीचा गणपती आणि 
माथेरानच्या कड्याच्या गणपतीचे अनेक वेळा दर्शन झाले. 

मंडळी,  आज रविवारच्या संकष्टी निमित्याने कसे वाटले हे गणेश दर्शन ?  हे वाचताना तुम्हालाही तुमचे रविवार- गणेश दर्शन नक्की आठवले असेल.

हे लिहून होईपर्यंत १० दिवसाच्या खंडानंतर परत मस्त पाऊस पडायला लागलाय. उपवासाची मिसळ असते,
 ' उपवासाची भजी ' कशी करतात कुणाला काही कल्पना?

असेल तर नक्की कळवा. परत भेटू रविवारची संकष्टी भाग- ३ मधे एक वेगळा विषय घेऊन २४ आँक्टोबरला

मोरया 🙏🌺

"देवा तुझ्या द्वारी आलो" 📝
संकष्टी चतुर्थी ( २७/०६/२१ )

पहिल्या भागाची लिंक👇🏻
https://poetrymazi.blogspot.com/2020/05/blog-post_10.html 

२२ जून, २०२१

दिल चाहता है

.दिल चाहता है ....❤️

या की , दुकानं संपली की जी कमान आहे तिथं  पर्यत सोडतात, तिथून दर्शन घ्या,  मंगळवारी विशाखा नक्षत्र आणि दशहरा पण चालू आहे. वाडीच्या गुरुजींशी हे बोलणे झाले आणि विचार पक्का केला.


सांगलीला गेलोय आणि वाडीला देऊळ बंद म्हणून जायचं नाही ?  हे काही पटत नव्हतं. पण गुरुनेच मार्ग दाखविला आणि गुरुच्याच नक्षत्रावर एक रम्य दृश्य अनुभवता आलं जे आजपर्यंत कधीच अनुभवंल नाही नरसोबावाडीला जाऊन.

असं म्हणतात की मंदिरातील देवाचे दर्शन घेता नाही आले तरी निदान कळसाचे दर्शन घ्यावे. आणि हे घेण्यासाठी आम्ही सकाळी पोहोचलो ते औरवाडच्या कृष्णेच्या पूलावर

एरवी 'संथ वाहणारी कृष्णा -माई ' पावसाळ्यात काही महिने दुथडी भरून वाहते. इथून मंदिराकडे म्हणजे उत्तर दिशेकडून वाहत येत,  गुरूंच्या पादूकांवर जलाभिषेक करुन दक्षिण दिशेला, पंचगंगेला कवेत घेऊन पुढे जाते. 

हाच तो दक्षिणद्वार सोहळा , आणि हे कृष्णेचे विराट स्वरूप 

परब्रह्म भेटी लागे..।

देवा तुझ्या द्वारी आलो 🙏🌹

📝 २२/०६/२१  

१० जून, २०२१

श्री शनैश्चर जयंती

.
"कर्माधीन आहे जगती पुत्र मानवाचा !"

ही दृष्टी / जाणिव करुन देणारा ग्रह म्हणजे शनी

आज वैशाख अमावस्या म्हणजेच " शनैश्चर जयंती "
 🙏🌹



पत्रिकेत प्रत्येक स्थानात शनी असता आपल्याला जीवनात कसा अनुभव येऊ शकतो याची माहिती ' शनी महिमा ' या वसुधा वाघ यांच्या पुस्तकातून साभार इथे देत आहे

पत्रिकेतील. 
१ ले लग्न स्थान - चारूदत्त
२ रे - धृतराष्ट्र
३ रे - द्रोण
४ थे - गांधारी
५ वे - उर्मिला
६ वे - पंडू
७ वे - अंबा
८ वे - भीष्म
९ वे - दुर्योधन
१० वे - श्रीकृष्ण
११ वे - कर्ण
१२ वे - पांडव

उदा. अष्टमातील शनी भीष्माचे आयुष्य देतो. या व्यक्ती चांगल्या दीर्घायू असतात,पण जीवनात अखेरीस त्यांच्या नशिबी शरपंजरच असतो.
अशाप्रकारे आडाखे मांडता येतात.

द्विभुजां दीर्घदेहायाम दंडपाशधराय च
पींगाक्षीं यमरुपाय शनिदेवाय नमो नम:!
🌹🙏

शनिदेवा शामलांगा,सूर्यपुत्रा जटाधरा
महांकाळ,भयानक शनैश्चरा नमो नम:!
🌹🙏

#शनैश्चर_जयंती
#देवा_तुझ्या_द्वारी_आलो
#वैशाख_अमावस्या
१०/०६/२१

 

काकड आरती- गोंदवलेकर महाराज

.देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी साधिलिया !!.


ज्ञानेश्वर माऊलींच्या हरीपाठाची सुरवातच या ओवीने आहे. परिस्थितीने  तो ' क्षण ' मात्र आज हिराऊन घेतलाय. सरकारने नवीन 'अनलाँक दान ' जाहीर केले असले तरी अजूनही  ज्या क्षणासाठी भाविक / भक्त उत्सुक असतो म्हणजेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे याबद्दल मात्र अजूनही उल्लेख नाही. 

या सगळ्या भावनेतूनच मध्यंतरी गोंदवल्याला
' काकड आरतीला' जायची इच्छा व्यक्त करणारे मनोगत   लिहिले होते. शनिवारी आँफीस मधून निघायचे, मुक्कामाला गोंदवले आणि रविवारी पहाटेची आरती असा पुर्वी एकदा घडलेला कार्यक्रम परत घडावा अशी इच्छा व्यक्त केली होती.

गुरु / परमेश्वर/ माऊली तुमच्या मनातील इच्छा केंव्हा आणि कशा पध्दतीने पूर्ण करेल हे सांगता येत नाही.

जायला मिळालं गोंदवल्याला ?  
नाही, मग? 



तर आज वैशाख कृष्ण एकादशीला म्हणजेच ६ जूनला गोंदवलेकर महाराजांची काकड आरती झुम अँप द्वारे अनुभवण्याचा एक आगळावेगळा योग आला.  *ते ही रविवारीच*

श्री अनंत लेले आणि इतर काही जण दर एकादशीला हा उपक्रम करतात. आपल्या घरीच केलेली ही 'काकड आरती',  झुम अँप द्वारे अनेकांना उपलब्ध करुन देऊन एक आगळी वेगळी सेवा ते देत आहेत.

यात मला आज सहभागी होता आले हे माझे भाग्य. याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद, खूप छान पद्धतीने  हा  धार्मिक सोहळा सादर केला गेला. सर्वांनी खूप छान भक्ती गीते सादर केली.🙏

दर एकादशीला अशी झुम अँप द्वारे आरती अनुभवता येते हे कळणे, श्री लेलेंशी  संपर्क होणे,  त्यांनी त्यांच्या समुहात समावेश करुन घेणे, ते आज काकड आरतीला उपस्थित राहता  येणे आणि हे इच्छा व्यक्त केल्यानंतर काहीच दिवसात घडणे  "

धन्य ती माऊली 🙏

*काकड आरती ब्रह्मचैतन्य नाथा,स्वामी चैतन्यनाथा*
*प्रेमानंदे सद्गुरू चरणी,प्रेमानंदे सद्गुरू चरणी, ठेवीला माथा*!!🌺

मनोगत आवरता घेताना परत एक आठवण, "नाम सदा बोलावे घ्यावे " हा सुबोध गुरुंनी सांगितलाच आहे तसा आजच्या परिस्थितीत वैद्यांनी सांगितलेला सुबोध लक्षात असू द्या. कारण अजूनही संकट टळलेले नाही

*मास्क' सदा घालावे,*
*जावे भावे, जनांसि सांगावे |*
*हाचि सुबोध वैद्यांचा,*
' *मास्का' परते न सत्य मानावे!*😷

#स्वामी माझा पाठीराखा माणगंगा तिरी " 🙏🌹
#अपरा एकादशी 🚩
६/६/२१

#देवा_तुझ्या_द्वारी_आलो
www.kelkaramol.blogspot.com  

३ जून, २०२१

पाऊस आणि ज्योतिष शास्त्र

. .#पाऊस आणि ज्योतिष  शास्त्र  ☔

गुढीपाडव्याला  पंचांग  पूजन करून  संवत्सर फल  वाचले जाते.  त्यात या वर्षी पडणा-या  पावसाविषयी  विवेचन असते . साधारण मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरवातीला  भारतीय हवामान खाते आणि आजकाल खाजगी संस्थाही पावसा विषयीआपले अनुमान जाहीर करत असतात . याची मदत अर्थातच शेतकरी बांधवाना होत असते 

याचप्रमाणे आपल्या शास्त्रात ही पावसाळी वाहन या संकल्पनेचा उल्लेख आढळतो. या वाहनां वरुन पाऊस कसा पडेल याचा अंदाज घेता येतो.  आजकाल दिनदर्शिकेत वाहन ज्या तारखेला लागते त्या तारखेचा   ऊल्लेख ही केलेला आढळतो .  


वाहन लागणे हे कसे ठरते ?????

तर  रवीचा मृग नक्षत्र प्रवेश  म्हणजे पावसास सुरुवात  असे समजतात.  साधारण पणे ७ जूनला रवी मृग नक्षत्रात प्रवेश करतो ( यंदा ८ जूनला मृग नक्षत्र प्रवेश आहे) .  रवीच्या मृग नक्षत्र प्रवेशावेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते नक्षत्र  बघतात . दोन्ही  नक्षत्रातले अंतर मोजून त्याला ९ ने भागले जाते आणि राहणा-या बाकीचा  नंबर जो येतो त्यावरून वाहन ठरते . अधिक माहिती वरील चित्रात दिलेली आहे  त्यावरून प्रत्येक रवी नक्षत्र बदलानंतरचे  वाहन कोणते हे सहज काढता येते 


हत्ती , म्हैस , बेडूक  - खूप पाऊस 

गाढव , कोल्हा  - कमी पाऊस 

मोर , घोडा ,  मेंढा  -  मध्यम पाऊस 


आता हे वाहन साधारण दर १३ - १४ दिवसांनी बदलते कारण एक नक्षत्र  १३ अंश २० कलेचे असते आणि रवी रोज एक अंश पुढे जातो , म्हणजे १३ - १४ दिवसाने पाऊस वेगळे वाहन घेऊन येतो .  या  सगळ्या गोष्टींचा  शेतकरी बांधवाना  शेतीची कामे ठरवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.



गेली काही वर्षे प्रत्येक वाहन आणि पडलेला पाऊस याची मी नोंद केलेली आहे. (  १ जून पासून हवामान खात्याच्या संकेतस्थळावर रोज पडलेल्या पावसाची नोंद होते ) . यात एक गोष्ट लक्षात येत आहे की  वरील नियम अगदी अचूक लागू पडत नाही आहेत. 

अगदी २०१९ चे उदाहरण द्यायचे झालं तर   जुलै शेवटचा आठवडा  ते ऑगष्ट  पहिला आठवडा (  २० जुलै ते ३ ऑगष्ट )  'गाढव'  वाहन  असताना  पश्चिम महाराष्ट्रात महाभयंकर पूर आला होता, आणि त्यापुढच्या 'बेडूक' वाहनात  तुलनेने कमी पावसाची नोंद दिसून आली.

यासाठी थोडा वेगळा अभ्यास करायची गरज आहे असे वाटते.  रवीच्या  पावसाळी नक्षत्र प्रवेशा बरोबरच  चंद्र , रवीचे   कर्क , वृश्चिक , मीन  ( जल तत्वाच्या  राशी )  या  नवमांशातून/ राशीतून    होणा-या भ्रमणांचा  ही संयुक्तिक विचार होणे आवश्यक आहे.  यानुसार पावसाचा अधिक चागला अंदाज वर्तवता येईल  असे मला वाटते

यासंदर्भातले एक उदाहरण २६  जुलै २००५  चे पाहू 
त्यादिवशी ची ग्रहस्थिती

चंद्र - मीन राशीत - जलतत्व 
रवी- कर्क राशीत - जलतत्व
 
त्या दिवशी च्या नवमांश कुंडलीत
शुक्र, केतू, हर्षल - कर्क नवमांश. - जल राशीत

थोडक्यात पावसाळी वाहन बरोबरच ग्रहांचा जलतत्वाच्या राशी/ नवमांशातून होणारा प्रवास आणि पडणारा पाऊस हे अभ्यासनीय असेल

अमोल केळकर 📝
३/६/२१
वैशाख कृष्ण नवमी  

२९ मे, २०२१

नित्य पूजा - संगमेश्वर मंदीर ( हरिपूर)

.संगमेश्वर मंदीर, हरीपूर ( सांगली)   इथल्या नित्य पूजेचे फोटो आमचा शाळेतला मित्र पाठवतो. दिनविशेषा नुसार गुरुजी इथे मधे दिसणारी  चंदन/ गंधाची मूर्ती बनवतात.  ती मूर्ती पाहूनच मन प्रसन्न होते. काय मस्त भाव उतरतात त्या शिल्पात. 



🙏🌺

#संगमेश्वर_मंदीर_हरिपूर
#देवा_तुझ्या_द्वारी_आलो
#देव_संगमेश्वर_नित्य_पूजा

 

२४ एप्रिल, २०२१

क्विन आँफ पेनटँकल

. Queen of pentacle

११ एप्रिलचा रविवार, सुट्टी असल्याने तस निवांतच होतं. मात्र आज लँपटाँप घेऊन ती १२५- १५० जणांची लिस्ट ५० वर आणायलाच पाहिजे हा विचार पक्का केला. बातम्या बघायचा कंटाळा आला होता. शनिवार-रविवार विकेंड लाॅकडाऊन डिक्लेअर झालाच होता. एका गोष्टीचे समाधान वाटत होते की आपले कार्य शुक्रवारी असल्याने यात आपण अडकलेलो नाही. सगळीकडे चर्चा मात्र सुरु होती. ८ दिवसाचा लाॅकडाऊन, १५ दिवसाचा लाँकडाऊन लागू शकतो, कडक निर्बंध लागू शकतात. पण केंव्हा पासून, केंव्हा पर्यत ,पाडवा झाल्यावर का आंबेडकर जयंती झाल्यावर?  १५ पासून ८ दिवस धरले तर २२ तारखेपर्यत. म्हणजे २३ तारीख ( शुक्रवार ) परत मिळेल पण मग लगेच शनिवार-रविवार वीकेंडसाठी लाँकडाऊन मग १ दिवस सूट कशी मिळेल?  लाॅजिकलच नाही. १५ दिवसाचा लाँकडाऊन/ कडक निर्बंध  होणार अशी मनाची तयारी होत चाललेली.
           अशाच टेंशन मधे दिवस गेला. जी काही ठरवलेली कामे उरकायची ती उरकली. रात्री क्रिकेटचा सामना सुरु होता पण तिकडे ही फारसे लक्ष नव्हते
त्याचवेळेला डाँ कविता जोशी , सानपाडा यांचा फोन आला. एका जोतिष विषयक गृपवर आम्ही एकत्र आहोतच पण आमची ओळख खूप आधीपासूनची जेंव्हा पारंपारिक जोतिषाच्या आधीही मी जेंव्हा 'टँरो कार्ड रिडिंग " घ्यायचो तेव्हापासून. यानिमित्ताने त्या माझ्या घरीही येऊन गेल्या होत्या मात्र बरीच वर्ष प्रत्यक्ष संपर्क किंवा बोलणे झाले नव्हते.

त्यांनी फोन केला होता तो जोतिष समूहात जी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा सुरु होती त्याच अनुषंगाने. जवळ जवळ २० एक मिनिटे आम्ही बोललो. सध्याचे ग्रहयोग, एकंदर ठाम उत्तर न मिळणे यावरून आमची चर्चा थोडी टॅरो कार्ड रिडींग कडे सरकली. त्यांनी त्यांचे सध्याची वेगवेगळ्या परिस्थितीची घेतलेली रिडिंग, मुलांची मानसिक अवस्था, आँन लाईन शाळा,  पुढचे व्यवसाय, एकंदर सगळाच बदल आणि परिस्थिती यासंबंधी भरपूर चर्चा केली. तसेच टॅरो कार्डचा सकारात्मक ( +ve) affirmation म्हणून कसा वापर करता येईल यावर ही बोललो.

 मी काही रिडींग घेतले का परत असे त्यांनी विचारले. कारण मागच्या एप्रिल / मे मधे कोविड महामारीवरचे घेतलेले कार्ड रिडिंग त्यांनी पाहिले होते. त्यांना नम्रपणे सांगितले की सध्या टॅरो कार्ड रिडिंग घेणे होत नाही मात्र आज तुमच्याशी बोलणे झाल्यावर मला प्रेरणा मिळाली. निदान आठवड्यातून एकदा तरी रिडिंग घेत जाईन असे सांगून चर्चा संपवली.

नंतर विचार केला सध्याच्या परिस्थिती वर रिडिंग घेण्यापेक्षा सध्या आपल्या समोर जो प्रश्ण उभा आहे  की 
' ठरलेले कार्य सुरळीत होईल का?  ' यावर उद्या सकाळी रिडिंग घेऊ. सकाळी पूजा करुन झाल्यावर मनात वरचा प्रश्ण धरुन एक कार्ड काढले,  ते कार्ड होते "Queen of Pentacle"

कार्ड जरी चांगले निघाले तरी माझ्या प्रश्णाचे सरळ उत्तर मला मिळाले नाही. पण कार्ड +ve निघाले त्यामुळे जरा बरे वाटले. संदर्भ पुस्तकात लिहिले होते
Emotional centre , security
Affirmation : I have what I need to feel secure.

गुढीपाडवा झाल्यानंतर ३०  तारखेपर्यंत कडक निर्बंध, लग्नासाठी २५ जण वगैरे नियम आले. आमच्या कार्यासाठी सांगलीहून पौराहित्य करण्यासाठी येणारे पटवर्धन गुरूजींचा फोन आला आणि त्यांनी सध्याच्या परिस्थितीत येणे शक्य होणार नाही असे सांगितले.  अर्थात त्यांचे बरोबरच होते. त्यांना हरकत नाही म्हणून सांगितले.

पण मग आता?  पुढे काय

आणि मग एकदम लक्षात आलं आपल्या बेलापूर मधील गोखले काकू ( Queen of Pentacle) . तसं त्याना आधी जुजबी बोलून ठेवलेच होते की काकू काहीही झालं तरी प्रणवची मुंज करायचीच,  समजा आमचे गुरुजी नाही येऊ शकले तर तुम्ही व्रतबंध सोहळा पार पाडायचा

काकूंना फोन करुन सांगितले,  त्या लगेच तयार झाल्या. सध्याच्या परिस्थितीत मुंज बाहेर हाॅल मधे न करता घरीच करु असे ही ठरले आणि २३ ला ठरल्या प्रमाणे गोखले काकू आणि कुलकर्णी काकू यांनी पौराहित्य करुन व्रतबंध संस्कार संपन्न झाला

साधारण १५ दिवसा आधी  ग्रामदैवत गणपतीला ( बेलापूरचा राजा)  पत्रिका निमंत्रण पत्रिका ठेवायला जाताना मंदिराच्या आधी एका पक्षाची घाण अंगावर पडली.  त्यावेळी घरच्या Queen ने सांगितले की शुभ शकुन झाला आहे. गुढीपाडव्याला  कुलदैवत रामेश्वराला ( आचरा, कणकवली)  पत्रिका ठेऊन कार्य व्यवस्थित होण्यासाठी नारळ ठेवला आहे हे स्नेही बापटांनी ही सांगितले होतेच




तरी देखील Queen of pentacle चा एका ठिकाणी असलेला उल्लेख
This lady really has her life in order. Nothing rocks or shakes her. She is the stable centre of her family and group of friends

हा प्रत्यय आमच्या घरच्या 'क्विन'  ने सार्थ करुन दाखवला.

आजूबाजूला जी भयानक परिस्थिती आहे त्यात ही ठरलेले कार्य निविघ्न पार पडण्यात परमेश्वरा बरोबरच या  नारी शक्तीचा ही मोठा वाटा होता

आणि हेच ते कार्ड सांगत होते, पण लक्षात उशीरा आले 🙏

अमोल केळकर 📝
२४/०४/२१

२१ एप्रिल, २०२१

चला राम घडवू या

.
" चला राम  घडवूया " 🚩🚩

मंडळी एक वेगळा विषय मांडतोय. उद्या रामनवमी आहे. यानिमित्यानेच मध्यंतरी एका संस्थेने निबंध स्पर्धेच आयोजन केले होते, त्यात खुल्या गटातील अनेक  विषयांपैकी हा एक विषय होता. यानिमित्याने माझे काही विचार इथे मांडतोय. 


//

निबंध स्पर्धेसाठी  त्यातही खुल्या गटा साठी हा  एक विषय . सहज इतर गटांसाठीचे ही  विषय बघितले त्यात  लहानगटा साठी  विषय होता 
 " चला राम बनूया "

संकेत स्पष्ट आहेत , काय करायचे  आहे दिशा स्पष्ट आहे . त्यांना  ' राम बनण्यासाठी' आपणास  सक्रिय सहभाग घ्यायचा आहे , त्यांना सहकार्य , मार्गदर्शन करायचे  आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वतः ला आधी राम तर बनायचे आहेच पण  परिस्थतीनुसार /  भूमिकेनुसार  कधी  राजा दशरथ ( वडील ) , कौसल्या  ( आई ) , विश्वामित्र  ( गुरु ) ,  प्रेमळ बंधू  ( लक्ष्मण ) , निष्ठावान पत्नी  ( सीता माई ) , अन्याया विरुध्द्व साथ देणारा सहकारी ( हनुमान )  तर वेळ प्रसंगी नितीमत्ता जागृत असणारा  शत्रू (  बिबिषण )  या वेगवेगळ्या भूमिका  समोरच्या व्यक्तीशी आपल्या नात्यानुसार निभावायच्या आहेतच. 

प्रभू  श्री रामचंद्राचे  विशेष गुण , त्यांचे  चरित्र  याची जाण ठेऊन सध्याच्या जीवन पध्द्तीत  ते कशा प्रकारे आचरणात आणता येतील  / इतरानाही प्रवृत्त करता येईल हे पहाणे महत्वाचे. 
 एकनिष्ठ राम,  एकबाणी राम, एकवचनी राम होणे म्हणजेच   आजच्या काळातले  शब्द जसे कमिटमेंट, इन्व्हॉलमेंट , फोकस  होणे आहे . माझे  आयुष्याचे ध्येय काय आहे ?  त्यादृष्टीने माझी वाटचाल आहे का ?  मी कुठे विचलीत तर होत नाही आहे  ना ?  माझे जे ध्येय आहे  त्याचा मला फायदा होईलच  पण त्याचा समाजाला पण फायदा आहे का  ?  माझे लक्ष मूळ ध्येयापासून विचलीत होत आहे का ?  असे लक्षात आल्यास  योग्य उपाययोजना काय  करायची  हे मी समजून घेऊन तसे  मी  माझ्या सानिध्यात येणा-यांसाठी ही अमलात आणीन आणि ' राम घडवण्याचा ; मनापासून प्रयत्न करेन 


राष्ट्रकार्याच्या यज्ञात  जर कुणी असुरी शक्ती विघ्न आणत असतील तर  त्याला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य  माझ्या रामात यावे, तशी त्याला बुध्दीयावी  यासाठी चे बाळकडू  मला  त्याला द्यावे लागेल. 

   पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला स्वत: ला जे अपेक्षित राम राज्य आहे त्यातील  एक नागरिक  म्हणून आपण कुठे कमी पडतोय हे बघायचं आहे . स्वतःत सुधारणा घडवून आणायची आहे आणि दुस-याला ही त्या साठी मदत करायची आहे .  व्यवस्थेने घालून दिलेले नियम , सद्विवेकबुधदी चा वापर  मला करायचा आहे 
  
रामराज्य  येणे म्हणजे काय ?  

जिथे सर्व प्रजानन सुखी समाधींनी आहेत, एकोप्याने रहात आहेत.  कुणी कुणावर जबरदस्ती  करत नाही आहे . तशी जबरदस्ती झाली गुन्हा झाला तर लवकरात लवकर  न्याय  मिळत आहे , गुन्हेगाराला शासन  होत आहे . प्रजाजन आणि राज्यकर्ते यांच्यात सुसंवाद होत आहे 

वरील जर चित्र रेखाटले तर मी स्वतः यासाठी काय करतोय ? मी स्वतः जे कायदे आहेत , नियम आहेत  ते काटेकोर पणे बजावतो का ? का पळवाट काढतोय ? माझी कर्तव्य करतोय का ?  का फक्त हक्क सांगतोय? 


  हा सगळा विचार करुन आपण चांगला नागरिक बनू या आणि इतरांनाही  चांगला  नागरिक बनण्यास सहकार्य करु या  . घरोघरी असे प्रजानन  म्हणजेच राम आणि त्यांना तयार करणारे  पालक, गुरु, सहकारी , बंधू   निर्माण  झाले तर  रामराज्य ख-या अर्थाने  निर्माण होणार नाही का ?????  

तेंव्हा चला 


एकबाणी  होऊ या , एक वचनी होऊ  या 🚩
राष्ट्रप्रेम जागवू या , बंधुभाव वाढवू या 🚩
आधी राम होऊ या, असंख्य राम घडवूया 🚩

अंती राम राज्य आणू या 🚩🚩

जय श्रीराम 🙏

 अमोल केळकर

 

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या