मंडळी, दिल्लीला जनपथ रोडवर आज मोठी लगबग असणार आहे. आज शनिवार, अनुराधा नक्षत्र ( शनीचे नक्षत्र) चंद्र वृश्चिक राशीत असताना युवराजांचा पक्षीय अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक होत आहे.
आता पुढचे लिखाण *मुहूर्त बघणे म्हणजे कसा भंपकपणा आहे वगैरे मानणारे आणी असे टुकार मेसेज वेळोवेळी Whatsapp किंवा इतर सोशल मिडीयावर पुढे ढकलणाऱ्यांसाठी*
तर आजच्या अध्यक्ष पदाची सूत्रे घेण्याआधी या माऊलीने आपल्या मुलाची पत्रिका जोतिषाला नक्कीच दाखवली असणार आणी माझ्यामते त्यांनी आजचा योग्य दिवस निवडला आहे.
राजकारणाचा कारक ग्रह शनी आहे.आज त्याचा वार आणी अनुराधा नक्षत्र स्वामी या नात्याने शनी दिवसभर रुलिंग मधे आहे.
साधारण पणे एखादा चांगला दिवस बघण्यासाठी रोजच्या चंद्राचे भ्रमण लक्षात घेतात. मुळ पत्रिकेतील शुभ स्थानातून त्या दिवशीचा चंद्र जात असेल तर तो दिवस उत्तम मानतात
आज चंद्र वृश्चिक राशीत आहे आणि युवराजांच्या पत्रिकेत वृश्चिक रास लाभस्थानात आहे. अर्थात लाभस्थान हे पत्रिकेतील एक चांगले स्थान आहे.
शास्त्र कारांनी प्रत्येक नक्षत्रावर काय करावे हे लिहून ठेवले आहे. आज अनुराधा नक्षत्र, या नक्षत्रावर राज्याभिषेक करताता ( पक्षाच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारणे हा एक प्रकारचा राज्याभिषेकच)
खाली पुस्तकातील लिखीत स्वरूपातील माहिती दिली आहे 👇🏻
तर निवडणुकीपूर्वी ' देवा तुझ्या द्वारी आलो' म्हणणारे पदग्रहण करण्यासाठी ही जर चांगला दिवस/ मुहूर्त बघायला लागले असतील तर तो तमाम भारतवर्षासाठी
अजि सोनियाचा दिनू असंच म्हणावं लागेल.
युवराजांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐आणि ' देवा तुझ्या द्वारी आलो' या अनुदिनी कडून एक प्रेमळ भेट 🎁
ही म्हण ऐकली असेल सगळ्यांनी. पण या म्हणीसाठी शनिवारच का निवडला असावा? रविवार ते शुक्रवार पैकी एका वाराची निवड का केली नाही?
मंडळी थोडा जोतिष शास्त्रीय विचार करु. कृष्णमूर्ती पद्धतीत रुलिंग प्लँनेट ही एक संकल्पना आहे. यात प्रत्येक क्षणावर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असतो हे त्यांनी सांगितले आहे. यात त्या दिवसाचा स्वामी दिवसभर रुलिंग मधे असतो असाही एक नियम आहे. म्हणजे शनिवारी - शनी रुलिंग मधे पूर्ण दिवस असतो.
आता ' शनी' चे कारकत्व माहितच आहे. उशीर करणे, वेळ लागणे, विलंब म्हणूनच ही म्हण तयार झाली असावी.
पण केवळ ' न कर्त्याचा वार शनिवार ' म्हणजे कुठल्याही चांगल्या ( मोठ्या) कामाला सुरवात शनिवारी करु नये असा गैरसमज पसरत गेला
पण शनी - उशीर करतो पण हक्काने काम करुन देतो.
शास्त्रकारांनी रचलेले नियम बरोबर होते आपलीच समजण्यात कधी कधी चूक होते.
आज एका मित्राच्या भाच्चीची पत्रिका बघत असताना मंगळ - नेपच्यून युती पत्रिकेत बघितली. नुकताच तिला अपघात झाला होता.
श्री व. दा भट यांच्या ' हर्षल, नेपच्युन प्ल्युटो या ' पुस्तकात जे लिहिले आहे अगदी तसेच घडले
शास्त्रकारांनी केवढा मोठा अभ्यास केला आहे याची प्रचिती आली .
धनू राशीत शनी १८ एप्रिल ते ६ सप्टेंबर २०१८ आणी ३० एप्रिल ते १८ सप्टेंबर २०१९. वक्री असल्याने प्रत्येक नक्षत्रात आणखी चरणात त्याचा कालावधी असा असेल
मूळ नक्षत्र. चरण १ २८ नोव्हेंबर १९१७ पर्यत
मूळ नक्षत्र, चरण २ २८ नोव्हेंबर १७ ते २६ डिसेंबर २०१७ पर्यत
मूळ नक्षत्र, चरण ३ २६/१२/२०१७ ते २५/०१/२०१८ २२/०७/२०१८ ते २१/१०/२०१८
मूळ नक्षत्र, चरण ४ २५/०१/२०१८ ते ०२/०३/२०१८ ०५/०६/२०१८ ते २२/०७/२०१८ २१/१०/२०१८ ते २७/११/२०१८
पु.षाढा , चरण १ ०२/०३/२०१८ ते ०५/०६/२०१८ २७/११/२०१८ ते २७/१२/२०१८
पु. षाढा, चरण २ २७/१२/२०१८ ते २४/०१/२०१९ ०२/०९/२०१९ ते ०५/१०/२०१९
पु.षाढा , चरण ३ २४/०१/२०१९ ते २६/०२/२०१९ ०५/०७/२०१९ ते ०२/०९/२०१९ ०५/१०/२०१९ ते २५/११/२०१९
पु.षाढा, चरण ४ २६/०२/२०१९ ते ०५/०७/२०१९ २५/११/२०१९ ते २७/१२/२०१९
उ.षाढा, चरण १
२७/१२/२०१९ ते २४/०१/२०२०
२४ जाने २०२० नंतर शनीचा मकर राशीत प्रवेश आणी धनू साठी साडेसातीची अडीच वर्षे शिल्लक.
वरील नक्षत्र आणी चरण जांचे आहे त्यांना त्या कालावधीत काही त्रास होऊ शकतो. - नैराश्य, मानसिक त्रास. मुळ पत्रिकेत चर चंद्र चतुर्थेश असेल ( मेष लग्नाची पत्रिका असेल) तर आईला त्रास होण्याची शक्यता
अर्थात पत्रिकेत धनू रास कुठल्या स्थानात आहे, त्या राशीत कुठले ग्रह आहेत यावर अनेक गोष्टी अवलंबून आहे
जोतिष शास्त्रात वाईट समजली जाणारी शनी - मंगळ युती २. एप्रिल २०१८ ला धनू राशीत पु.षाढा नक्षत्रात होत आहे. यासंबंधीची माहिती परत कधीतरी
२६ ऑक्टोबर २०१७ ते २४ जानेवारी २०२० म्हणजे तब्ब्ल ८२० दिवस शनीचे धनु राशीतून भ्रमण होईल
या मध्ये खालील कालावधीत शनी वक्री असेल ( उलट गतीने धनु राशीत मार्गक्रमण करेल )
१८ एप्रिल २०१८ ते ६ सप्टेंबर २०१८ - साधारण १४१ दिवस
३० एप्रिल २०१९ ते १८ सप्टेंबर २०१९ - साधारण १४१ दिवस
आता आपणास माहितच आहे की एका राशीची अगदी लाखो माणसे असतात . मग सगळ्यांना एकाचवेळेला त्रास होतो का? तर नाही.
मग `प्रत्येकाने केंव्हा काळजी घेतली पाहिजे? हे प्रत्येकाच्या पत्रिकेवरून अवलंबून आहे व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात तसेच जोतिष शास्त्रात व्यक्ती प्रमाणे पत्रिका असे ही म्हणता येईल आता पुढचा भाग काही दिवसांनी पाठवेन, त्याआधी एक काम करायचं आपली पत्रिका बघून ठेवा धनू रास आहे म्हणजे चंद्र धनू राशीत (९) असणारच, आता तो कुठल्या नक्षत्रात आहे, चरण काय आहे, धनू राशीतच इतर काही ग्रह आहेत का? मुळ पत्रिकेत शनी कुठल्या राशीत आहे ( धनेतच आहे का? ) मुळ पत्रिकेत धनु रास पत्रिकेत १- ते १२ पैकी कुठल्या स्थानात आहे, महादशा- अंतर्दशा - विदशा कुठल्या ग्रहाची केंव्हा आहे, धनु राशीचा स्वामी गुरु पत्रिकेत कुठे आहे, त्याचे गोचर शनीशी काय योग होत आहेत
ही माहिती करुन घेतलीत तर शनीचे गोचर भ्रमण केव्हा त्रासदायक ठरेल आणी केंव्हा फलदायी ठरेल याचे अनुमान काढता येईल ( सध्या ज्यांचे मुळ नक्षत्र पहिले चरण आहे त्यानी काळजी घेणे आवश्यक आहे कारण शनीचे याच चरणतून भ्रमण होत आहे)
खुप गर्दी असलेल्या बसमधून किंवा लोकल मधून प्रवास करताना सर्वसाधारण पणे तीन प्रकारचे लोक दिसून येतात...
१) आरामात सिट वर बसलेले पण आता उतरायचे ठिकाण जवळ आल्यामुळे एवढ्या गर्दीत उतरायचं टेन्शन घेतलेले २) २-३ स्थानकापुर्वी चढलेले प्रवासी, पण अजून दोन सीटच्या मधेच उभे राहिलेले, बसायला केंव्हा मिळतय याची वाट पाहणारे अजून बराच प्रवास बाकी असणारे ३) मागच्याच स्टेशन/ स्थानकावर चढलेले, प्रचंड घाबरलेले प्रवासी, खुपच लांबचा पल्ला गाठायचा आहे पण अजून दारातच लोंबकळणारे प्रवासी
हे 🏻सा रे सा थी नेहमी सर्वत्र दिसतात
हेच उदाहरण 🏻 सा डे सा ती ला कसे संयुक्तिक ठरते पहा
आज २६/१०/१७ ला रात्री ' शनी' धनु राशीत जात आहे त्यामुळे आता वृश्चिक राशीची अडीच वर्षे शिल्लक, धनुची ५ आणी मकरेला साडेसातिची सुरवात
वरील उदाहरणातील प्रवासी १- वृश्चिक प्रवासी २ - धनू प्रवासी ३ - मकर
मंडळी अशी नेहमीची उदाहरणे दिली की जोतिष समजायला सोपं वाटतं ना?
तर मकर राशीला साडे साती सुरु होईल, धनू राशीत शनी प्रत्येक नक्षत्रातून केंव्हा भ्रमण करेल ? त्यानुसार धनू राशीवाल्यांनी केंव्हा काळजी घ्यावी? उपाय, उपासना आणि इतर उपयुक्त माहिती जमेल तशी क्रमश: देईनच तुर्त आज इतकेच
जाता जाता भारत देशाची रास मकर आहे. तसेच खालील काही मान्यवरांच्यासाठी साडेसातीचा हा कालखंड कसा जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल
राज ठाकरे( मकर रास) ऐश्वर्या बच्चन ( धनू) प्रशांत दामले( वृश्चिक) सोनाली कुलकर्णी (मकर)
मोरया गोसावी हे सतराव्या शतकातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. मोरया गोसावी हे शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समकालीन.
कर्नाटक राज्याच्या बिदर जिल्ह्यातील बसव तालुक्यातले शाली हे मोरसा गोसावी यांच्या आईवडीलांचे मूळ गाव. मोरया यांचे आईवडिल, वामनभट शाळिग्राम आणि त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांचे वैदिक कुटुंब होते. वामनभट त्यांना मूलबाळ न झाल्याने गाव सोडून निघाले. सोबत पार्वतीबाई होत्या. ते दोघे पुण्यातील मोरगावला येऊन स्थिरावले. त्यांना कऱ्हा नदीचे खळाळणारे पाणी, मोरयाची भव्य मूर्ती यांनी भुरळ घातली. त्या परिसराबद्दल काही अद्भुत दंतकथा वामनभटांच्या कानी आल्या. ब्रम्हदेवाने तेथे तपश्चर्या केली! त्याच्या कललेल्या कमंडलूतून कऱ्हा नदी उगम पावली! जगताच्या उत्पत्तीचा ब्रम्हदेवाचा मनोरथ तेथे पुरा झाला! मोरयाच्या कृपेने ब्रम्हदेवाला जगताची सृष्टी करता आली! वगैरे वगैरे. त्या कहाण्या ऐकून वामनभटांना वाटले, की मोरया त्यांचेही मनोरथ पूर्ण करेल! त्यांनी अनुष्ठान मांडले. मोरयाने स्वप्नात येऊन सांगितले, की ‘तुझ्या नशिबात पुत्र नाही.’ त्यामुळे वामनभट खट्टू झाले. पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. शेवटी, पार्वतीबाईंचा पाळणा हलला. त्यांनी बाळाचे नाव मोरया हेच ठेवले.
मोरया वाढू लागला. त्याची मुंज झाली. त्याचे वेदाध्ययन झाले. त्याच्यात तपश्चर्येची ऊर्मी जागी झाली. त्याला नयन भारती गोसावी गुरू भेटले. मोरया त्यांच्या प्रेरणेने थेऊरला आला. त्याची तपश्चर्या मुळा-मुठेच्या काठी चिंतामणीजवळ सुरू झाली. मोरयाच्या बेचाळीस दिवसांच्या तपश्चर्येनंतर चिंतामणीने मोरयाला दर्शन दिले.
मोरया गोसावी महाराज सिद्धी प्राप्त झाल्यावर मोरगावला परतले. आईवडिलांचा आनंद गगनात मावेना. गावकऱ्यांना मोरया गोसावींचा आधार वाटू लागला. मोरया गोसावी सगळ्यांच्या अडचणी दूर करत. रंजले-गांजले अष्टौप्रहर त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामुळे मोरया गोसावींना पूजेअर्चेला वेळ मिळेना. शेवटी, ते कंटाळून गेले. त्यातच त्यांच्या आईवडिलांचाही अंत झाला. मोरया गोसावींनी मोरगावचा निरोप कोणालाही न कळवता घेतला.
मोरया गोसावींनी पवनेच्या काठी किवजाईच्या देवळात मुक्काम केला. त्यांची साधना थेरगावच्या घनदाट जंगलात सुरू झाली. परंतु तेथेही मोरया गोसावींच्या एकांतात व्यत्यय येत असे. चिंचवडच्या गावकऱ्यांना मोरया गोसावींनी त्यांच्या गावी यावे असे वाटत होते. त्यामुळे गावडे-चिंचवडे, भोईर, वाल्हेकर, रबडे, गपचूप असे सगळेजण मोरया गोसावींकडे गेले आणि त्यांनी मोरया गोसावींना चिंचवडला आणले. मोरया गोसावी रबड्यांनी बांधलेल्या झोपडीत राहू लागले.
मोरया गोसावींचा प्रघात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी चिंचवड सोडावे, चतुर्थीपर्यंत मोरगावला जावे, मोरयाची पूजाअर्चा करावी, पंचमीचे पारणे करून परतावे असा होता. मोरया गोसावींच्या मोरगाव वारीत कधी खंड पडला नाही. त्यासंदर्भातील एक दंतकथा सांगितली जाते. एकदा कऱ्हेला पूर आला, नदी ओलांडणे मुष्किल झाले, तर मोरया कोळ्याचे रूप घेऊन आला. त्याने मोरया गोसावींना नदीपार नेले. दुसरी दंतकथा अशी - एकदा, मोरया गोसावींना पोचायला उशीर झाला. गुरवांनी देऊळ बंद केले. मोरया गोसावी बाहेर तरटीच्या झाडापाशी बसले, तर मोरया स्वत: बाहेर आला आणि महाराजांना चिंतामणीचे दर्शन झाले! कऱ्हा नदीत स्नानाच्या वेळी भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या मंगलमूर्तीची स्वयंभू मूर्ती आली. मग मासिक वारीऐवजी भाद्रपद, माघ, ज्येष्ठ अशा वाऱ्या चालू झाल्या.
पुढे, चिंचवडजवळच्या ताथवडे गावच्या गोविंदराव कुलकर्ण्यांना दृष्टांत झाला. त्यानुसार त्यांची मुलगी उमा हिच्याबरोबर मोरया गोसावींचे लग्न झाले. थेऊरचा चिंतामणी त्या उभयतांच्या पोटी जन्माला आला. जन्मल्यावर तो रडला नाही. त्याच्या छातीवर शेंदराचा पंजा होता आणि त्याने खेचरी मुद्रा (अष्टांगयोगातील एक मुद्रा) केली होती. मोरया गोसावींना त्या सगळ्या गोष्टींचा अचंबा वाटला नाही. कारण त्या खुणा चिंतामणीने अगोदरच मोरया गोसावींना सांगून ठेवल्या होत्या!
‘न मागे तयाची रमा होय दासी’ असे म्हणतात. मोरया गोसावींना 1616 पासूनच जमिनी इनाम म्हणून मिळू लागल्या होत्या. त्यांना आदिलशहा, निजामशहा, शहाजीराजे, शिवाजीराजे यांच्याकडून मोरगाव, कुंभार वळण, चिंचवड, चिंचोली या आणि इतर अनेक ठिकाणच्या जमिनी मिळाल्या. संप्रदाय वाढला, अन्नछत्र-सदावर्त, उत्सव-यात्रा, पूजाअर्चा यांचा पसारा वाढला. मोरया गोसावी वयोमानाप्रमाणे थकले. ते मार्गशीर्ष वद्य षष्ठी(25-01-1657) या दिवशी सकाळीच घाटावरील तयार केलेल्या गुंफेत जाऊन बसले. मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली. त्यावर त्यांचे पुत्र थोरल्या चिंतामणी महाराजांनी मोठी शिळा ठेवली आणि त्यावर सिद्धी-ऋद्धीसहित मोरयाची मूर्ती बसवली. चिंतामणी महाराजांनी 1658-59 मध्ये त्यावर देऊळ बांधले. समाधीच्या प्रवेशद्वारावर कोथळ्याहून (जेजूरीच्या खंडोबाची मूर्ती सोमवती अमावस्येला स्नानासाठी कोथळे गावी नेली जाते.) आणलेली अर्जुनेश्वर शंकराची मोठी पिंड बसवली.
चिंतामणी महाराज संस्थानचा कारभार पाहू लागले. तेही वडिलांइतकेच साक्षात्कारी संत होते. त्यांच्या कारकिर्दीत समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरू तुकाराम महाराज चिंचवडला आले. चिंतामणी महाराजांनी त्या प्रसंगी मोरयाला बोलावले तर ते स्वत:च मोरया झाले असे म्हणतात. खुंडादंडविराजित, चतुर्भुजमंडित असे त्यांचे गणेशरूप पाहून तुकाराम महाराजांनी त्यांना ‘देव’ म्हणण्यास सुरुवात केली. पुढे, तेच त्यांचे आडनाव झाले. शाळिग्राम-गोसावी-देव असा हा आडनावांचा प्रवास पूर्ण झाला.
चिंतामणी महाराजांच्या कृपेने पुण्याची देशमुखी कृष्णाजी काळभोर यांना 1664 मध्ये मिळाली, म्हणून कृष्णाजींनी चिंचवड-रावेतची देशमुखी चिंतामणी महाराजांना दिली. चिंतामणी महाराजांनी कारभाराला शिस्त लावली, यात्रा-उत्सव आखीवरेखीव केले. त्यांनी पौष वद्य चतुर्थीच्या रात्री देह ठेवला. ते वर्ष बहुधा इसवी सन 1694 असावे.
चिंतामणी महाराजांना चार मुले होती. पैकी नारायण महाराज गादीवर आले. नारायण रावांचे भाऊ काका महाराजांनी थेऊरला तपश्चर्या करून स्वतंत्र चिंतामणीची प्राप्ती करून घेतली; थेऊरची यात्रा सुरू केली. नारायण महाराज एका भाद्रपदी यात्रेत जेजुरीजवळच्या घोडेउड्डाण समोर कोथळ्याच्या देसाई पाटलांकडे उतरले होते. महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांची कोथळ्याला समाधी आहे.
नारायण महाराज राजगुरू होते. त्यांच्या काळात चिंचवड संस्थान श्रीमंत झाले. चिंचवड, वाकड, औंध, माण, चिखली, चऱ्होली, पिरंगुट इत्यादी गावे, कित्येक गावांच्या जमिनी, अनेक ठिकाणची देशमुखी, जकाती यांसारखी उत्पन्नाची साधने संस्थानास मिळाली. चिंचवडला येणाऱ्या मालाला जकात माफ असे. नारायण महाराजांनी 1719 च्या भाद्रपद शुद्ध सप्तमीला देह ठेवला.
नारायण महाराजांचा थोरला मुलगा चिंतामणी याने 1741 पर्यंत संस्थानचा कारभार पाहिला. त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे चिमाजी अप्पांचा वसईचा वेढा. हिंदू बांधवांची फिरंग्यांच्या छळातून सुटका करण्यासाठी चिंतामणी महाराजांनी पेशव्यांकडे आग्रह धरला, त्या मोहिमेला लागणाऱ्या खर्चासाठी दहा हजार रुपये कर्जही दिले. महाराजांचा भक्त गंगोजी नाईक अणजूरकर पठारे प्रभू त्या मोहिमेत होता. महाराजांनी दिलेली गणपतीची मूर्ती अणजूरला नाईकांच्या माडीत आहे. चिमाजी अप्पा 1739 च्या मोहिमेचा विजय साजरा करण्यासाठी पुण्याला जाण्याआधी चिंचवडला थांबले. त्यांनी वसईतून आणलेल्या मोठ्या घंटा चिंचवड, मोरगाव, सिद्धटेक आणि थेऊर या ठिकाणी आहेत.
चिंतामणी महाराजांचा थोरला मुलगा धरणीधर महाराज. त्यांची मोरयाचे वरदायक, साक्षात्कारी संत म्हणून ख्याती होती. धरणीधर महाराजांची गणेशभक्तीची अनेक पदे प्रसिद्ध आहेत.
पेशव्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटत असे. यात्रेच्या वेळी पेशवे स्वत: गणेशखिंडीत पालखीला सामोरे जात, त्यांचे स्वागत करत असत. यात्रेला शिधाशिबंदी देऊन, महाराजांचा आशीर्वाद घेऊन, पालखीबरोबर चार पावले चालून मंगलमूर्तीला निरोप देत असत. त्यांच्या काळात चिंचवडला टांकसाळ आली. टांकसाळीचा फायदा अन्नछत्रात वापरला जाऊ लागला. टांकसाळ इंग्रजी राज्य येईपर्यंत चालू होती.
चिंचवड, मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक या देवस्थानांची व्यवस्था चिंचवड देवस्थानामधून होते. सर्वत्र त्रिकाळ पूजा, नैवेद्य, नंदादीप यांची व्यवस्था असते. चिंचवडला अन्नछत्र व वेदपाठशाळा चालू आहे. तसेच, एक ग्रंथालय व देवस्थानच्या पुढाकाराने चालू झालेले मोरया हॉस्पिटल आहे. माघ व भाद्रपद महिन्यांत दोन मोठ्या यात्रा असतात. श्री मोरया गोसावी त्यांना प्राप्त झालेल्या मंगलमूर्तीसहित वाजत-गाजत मोरगावला जातात. माघात थेऊर, सिद्धटेकलाही जातात. येताना जेजुरीला खंडोबा, शिवरीला यमाई, पुण्याला कसबा गणपती आणि जोगेश्वरी यांचे दर्शन घेतात. देवांची भेट होते, पालखीचे ठिकठिकाणी स्वागत होते. मिरवणूक निघते. श्री मोरया गोसावी यांच्या पुण्यतिथीचा चार दिवसांचा भव्य सोहळा मार्गशीर्ष वद्य षष्ठीला होतो. नामवंत कलाकारांची कीर्तने, प्रवचने, गायन-वादन, सत्कार समारंभ होत असतात. मोठ्या प्रमाणावर अन्नदान होते. इतर सत्पुरुषांच्याही पुण्यतिथी साजऱ्या होतात. देवापुढे गायनाचे कार्यक्रम रोज सकाळी व संध्याकाळी होतात. इतर अनेक कार्यक्रम वर्षभर चालू असतात.
ज्यांना मंगळ आहे ( दोष आहे असे म्हणणार नाही ) त्यांनी अंगारकी चतुर्थीचे व्रत अवश्य करावे . आपल्या शास्त्रात अशा अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. फक्त विश्वास पाहिजे
येत्या १३ जूनला अंगारकी चतुर्थी आहे ज्यांना ' अंगारकी चतुर्थी व्रतकथा' पुस्तक हवे असेल ( पीडीएफ फाईल ) त्यांनी अवश्य ईमेल करा a.kelkar9@gmail.com
येत्या गुरूवारी शनी जयंती आहे. प्रस्तृत लेखनमालेत या निमित्ताने *झुंजार शनी*( लेखक : पद्माकर जोशी) व *शनि महिमा* ( लेखिका: वसुधा वाघ) यांच्या पुस्तकातील संकलित माहिती देत आहे.
झुंजार शनी या पुस्तकात लेखकाने सर्व जोतिषांसाठी एक सुरेख विवेचन लिहिले आहे. ते म्हणतात, '
जोतिषशास्त्र हे मनोरंजक असून भविष्याचे ज्ञान समजावून देणारे म्हणजे ईश्वराच्या अगदी जवळचे शास्त्र आहे. जितके हे शास्त्र सुगम व पवित्र आहे तितकेच हे शास्त्र जो शिकेल त्याला अपवित्र करणारे आहे. याचे कारण नकळत त्याला गर्व येतो आणि गर्वाचे घर नेहमी खालीच असते. म्हणून कुणाचे ही वर्म दुस-यास सांगू नका. एखाद्याच्या कुंडलीचा व्यवहारात उपयोग करु नका, नाहीतर तुमचे भाग्य नष्ट होईल, तुमच्या वाणिचे तेज नष्ट होईल.
खूपच छान विचार आहेत हे.🏻 आणि सर्व जोतिषांना याचा नक्की फायदा होईल
शनी संबंधि काही ठळक सिध्दांत देताना लेखक म्हणतात
१) शनी समोर रवी प्रथम स्थानी असेल तर बाप लेकाचे पटत नाही २)शनी समोर रवी जर धन स्थानात असेल तर नेत्रदोष, अंधत्व येते
३) शनी समोर रवी तृतीयात असेल तर भावंडांबाबतीत एखादी वाईट घटना घडू शकते
४) शनी समोर बुध लाभात असेल तर परदेशात फायदा होतो
*शनी महिमा* या वसुधा वाघ यांच्या पुस्तकातही अनेक गोष्टींची विस्तृत माहिती आहे.यात त्यांनी एका वेगळ्या प्रकारे पत्रिकेतील प्रत्तेक स्थानात शनी असता व्यक्तीचे जीवन कसे असते हे समजावून सांगितले आहे
प्रथम स्थानात शनी - त्या व्यक्तीचे जीवन चारुदत्ता सारखे असते
शनी द्वितीयस्थानात - धुतराष्ट्राचे जीवन वाट्याला येते
तृतीय स्थानात - द्रोणाचार्य
चतुर्थात शनि - गांधारीचे जीवन
पंचमात शनी - उर्मिला
षष्ठात शनी - पंडू राजा ( निरोगी आयुष्य कमी)
सप्तमात शनि, - अंबे सारखे जीवन वाट्याला येते
अष्टमात शनि - भीष्म
नवमात शनि - दुर्योधन
दशमात शनि - श्रीकृष्ण ( चकीत करणारे जीवन)
लाभात शनि - कर्ण
व्ययात शनी - पांडव
शनिच्या प्रसन्नतेसाठी हनुमानकवच, हनुमान चालीसा, शनी महात्म्य अवश्य वाचावे. शनिच्या देवळात जाऊन मनोभावे प्रार्थना करुन दर्शन घ्यावे.
निलांजन समाभासं रवीपुत्रं यमाग्रजं
छायामार्तंड संभूतं त्वं नमामिम् शनैश्चरम् !!
( नीलवर्ण व अंजनाप्रमाणे कृष्ण कांती असलेला, सूर्याचा पुत्र, यमाचा अग्रज तसेच छाया व आदित्य यांच्यापासून जन्मलेला जो शनैश्चर त्याला माझा नमस्कार असो)