November 30, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० नोव्हेंबर २०१४

लोभाच्या चित्तीं धन । तैसें राखावें अनुसंधान ॥

 



मंगलांत मंगल, शुद्धांत शुद्ध जाण । एक परमात्म्याचें अनुसंधान ॥
हें बीज लावले ज्यांनी । धन्य धन्य झाले जनीं ॥
अचूक प्रयत्‍न तोच जाण । ज्या प्रयत्नांत न चुकतें अनुसंधान ॥
सत्य करावें भगवंताचे अनुसंधान । जेणें दूर होईल मीपण ॥
'मी माझे' म्हणून सर्व काही करीत जावें । परि भगवंतापासून चित्त दूर न करावें ॥
मारुतिरायाचे घ्यावे दर्शन । त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान ॥
लोभ्याच्या चित्तीं धन । तैसे राखावे अनुसंधान ॥
दूर गेला प्राणी । परत येण्याची वेळ ठेवी मनीं ।
तैसे राहणे आहे जगांत । मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावा हेत ॥
म्हणून न सोडावे अनुसंधान । कशापेक्षांही जास्ती करावें जतन ॥
कोणाचेंच न दुखवावें अंतःकरण । व्यवहार करीत असावा जतन ।
व्यवहारांतील मानअपमान । हे टाकावे गिळून ॥
अखंड राखावें रामाचें अनुसंधान । जेणें सदाचरणाकडे लागेल वळण ॥

माझें नातेगोतें राम । हा भाव ठेवून जावें रामास शरण ॥
हें ऐका माझें वचन । मनानें व्हावे रामार्पण ॥
अनन्य व्हावें भगवंती । जो कृपेची साक्षात् मूर्ती ॥
आपले कर्तेपण टाकावें । म्हणजे शरण जातां येते ॥
ज्याने धरलें भगवंताचे पाय । तोच त्याला झाला उपाय ॥
मी आता झालों रामाचा । त्याला अर्पावी सर्व चिंता ॥
मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी । हा ठेवावा भाव चित्तीं ॥
माझे हित तो जाणे । हें जाणून स्वस्थचि राहणें ॥
विषयवासना सुटण्यास उपाय जाण । आपण जावें रामास शरण ॥
जें जें करणें आपलें हाती । तें करून न झाली शांति । आतां शरण जावें रघुपति ॥
जावें रघुनाथास शरण । तोच दुःख करील निवारण ॥
एक राम माझा धनी । त्याहून दुजें आपले न आणी मनीं ॥
अभिमानरहित जावें रामाला शरण । त्यानेंच राम होईल आपला जाण ॥
आतां जगांत माझे नाही कोणी । एका प्रभु रामावांचुनी ॥
निर्धार ठेवा मनीं । शरण जावें राघवचरणीं ॥
जें जें केले आजवर आपण । तें तें करावें रामास अर्पण ॥
जें जें होते तें राम करी । ते स्वभावें होय हितकारी ।
म्हणून जी स्थिति रामाने दिली । ती मानावी आपण भली ॥
गंगेच्या प्रवाहांत पडले । गंगा नेईल तिकडे गेले ॥
गंगा जाते योग्य ठिकाणी । याचे जाणे सहजासहजी ॥
तैसे असावे भगवंताचे स्मरणात । राम ठेवील त्यांत मानावें हित ॥
सर्व जगत् ज्यानें जाणले मिथ्या । हे जाणून शरण जावे रघुनाथा ॥
कारण परमात्म्याला जाणे शरण । याहून दुजा मार्ग न उरला जाण ॥
धन्य तो व्यावहारिक जाण । जेणे केलें रामास स्वतःला अर्पण ॥

३३५. रामापरतें सत्य नाही । श्रुतिस्मृति सांगतात हेंच पाही ॥
रामसत्तेविण न हाले पान । हें सर्व जाणती थोर लहान ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 29, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ नोव्हेंबर २०१४

वेळीच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा. 

 



कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वासनेपासून होत असते. जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो. गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो. त्याप्रमाणे, आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते. याच वेळी आई लहान मुलाला शिकवते, ’ देवा चांगली बुद्धी दे, ’ पुढे या निर्मळ मनावर निरनिराळ्या बर्‍यावाईट वासनांचे पगडे बसू लागतात. गंगेचे पाणी पुढे पुढे वाहात गेल्याने गढूळ होते. आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो, त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालविण्यासाठी ’राम कर्ता’ ही भावना दृढ करायला पाहिजे. भगवंताच्या नामाची तुरटी फिरल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतःकरण प्रकट होईल. ’ गेल्या जन्मात मी जी काही पापे केली असतील ती आता भोगतो आहे, ’ असे नुसते म्हणून जगण्यात अर्थ नाही, कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करीत असतो. जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे; म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे.
सत्तावान्, श्रीमंत, वैभववान् माणसे सुखी असतात, हा नुसता भ्रम आहे. जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामाच्या आहेत. आपले प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसते, परंतु ती सूज आहे, हे काही खरे बाळसे नव्हे. म्हणून आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही. आपले वय जसजसे वाढत जाते, तसतसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते. वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते, आणि तीच पुढल्या जन्माची अधिष्ठात्री ठरते. तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळेलाच काढणे आवश्यक आहे. हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे. संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिला आहे. त्या मार्गाने पावले टाका, भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे. तुम्हाला हे सर्व पटले असे म्हणता, परंतु पटले असून करीत नाही. बरे, पटले नाही म्हणावे, तर का पटले नाही तेही सांगत नाही, याला काय करावे ? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रापेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगलेवाईट कळण्याची बुद्धी. तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसे वागला नाही किंवा नुसता प्रयत्नही केला नाही, तर तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का ? म्हणून मला पुनः सांगावेसे वाटते की, वेळेलाच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा. भगवंताच्या नामात राहून सर्व काय ते करा, हेच माझे शेवटचे सांगणे आहे.

३३४. नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करू या. नाम न सोडता इतर गोष्टी करू.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 28, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ नोव्हेंबर २०१४

भगवंताला पाहण्यास स्वांतर शुद्ध करावे. 

 



'अंते मतिः सा गतिः' असे एक वचन आहे. जन्माचे खरे कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की, वासनेमुळे जन्माच्या फेर्‍यात आपण सापडलो. जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलेच असते. जन्ममरणाचा ओघ सतत चाललेला आहे. वासना आधी का जन्म आधी, या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या, जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटणार्‍या प्रश्नाबद्दल काथ्याकूट करणे होय. आपल्याला नडते कुठे ते पाहावे. विषयांतच आम्ही गुंतून राहतो ते सोडावे. असत्यातूनच सत्य कसे जाणता येईल ते पाहावे. इथून कुणीतरी गेले, असे सावलीवरून आपण म्हणतो. त्याप्रमाणे ही जगत्‌रूप सावलीच आहे. तिला असणारे खर्‍याचे अधिष्ठान जो ईश्वर, त्याला आपण जाणून घेण्याचा प्रयत्‍न करू या. आपल्या डोळ्यांवर विषयाची धुंदी असल्यामुळे, सर्व ठिकाणी भरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता येत. त्याला पाहण्यासाठी दृष्टी निराळी करावी लागते. आपण आपले अंतरंग साफ केले तर तशी दृष्टी येते. आपण कोणा स्त्रीकडे पाहू लागलो तर आपली जशी वृत्ति असेल तशी ती दिसते; कामी असेल त्याला ती तशी दिसू लागेल, आणि सात्त्विक असेल त्याला ती मातुःश्रीच दिसू लागेल. म्हणून काय, की जोपर्यंत आपले अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही. भगवंत सर्व ठिकाणी पाहताना तो आपल्यातही आहे हे पाहिले पाहिजे. जोपर्यंत भगवंत आपल्यात आहे हे दिसून येत नाही, तोपर्यंत तो इतरांत असलेला आपल्याला दिसणार नाही. म्हणून भगवंत सदासर्वकाळ आपल्यात आहे हे पाहू लागले पाहिजे.
सद्‌गुरु सांगेल तसे वागावे. त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो. संतांचा थोडासा कटाक्ष जो कर्ममार्गावर आहे तो याचकरिता की, कर्म करण्याने अभिमान येतो, आणि त्याउलट, गुरुआज्ञेत वागल्याने तोच अभिमान नाहीसा होतो. इथे शंका वाटेल की, गुरू तरी नामस्मरण करायलाच सांगतात, म्हणजे कर्म आहेच ना ! वैद्याने एका रोग्याला सांगितले की तू काही खाऊ नकोस. त्याला वैद्याने औषधाच्या तीन पुड्या दिल्या, आणि त्या तीन वेळा घे म्हणून सांगितले. त्यावर तो रोगी म्हणाला, " तुम्ही काही खाऊ नको म्हणता, आणि या पुड्या घ्या म्हणून सांगता, हे कसे ? " त्यावर वैद्याने सांगितले, "पूर्वी जे अजीर्ण झाले आहे त्याचा नाश करण्यासाठी या पुड्या उपयोगी आहेत." त्याप्रमाणे, गुरू आपल्याला नामस्मरण करायला सांगतात ते पूर्वीचा विषयाचा अनुभव नष्ट करण्यासाठी. जो आपली विषयवासना कमी करून आपल्यामध्ये नामाचे प्रेम उत्पन्न करील तोच खरा सद्‌गुरू होय.

३३३. प्रपंच व परमार्थ यांचा छत्तिसाचा आकडा पाहून, संतांनी तडजोड
करण्याचा प्रयत्‍न केला, नामस्मरण करीत करीत प्रपंच करा, हीच ती तडजोड.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 27, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ नोव्हेंबर २०१४

निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावे. 

 

 

समजा आपल्या एका गावाला जायचे आहे. त्या गावाला जाणारी आगगाडी धरून आपण तिची संगती करतो. आपले गाव आले की आपण गाडी सोडतो. हे जसे खरे, त्याचप्रमाणे, निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे. निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी; पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचता येणार नाही हेही तितकेच खरे. सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की, एकीकडे ’ मी ’ नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो, आणि शेवटी परमात्मा शिल्लक राहतो. म्हणूनच, आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावे. स्वतःचा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला, तर निर्गुण आणखी कोणते राहिले ? परंतु ताप आलेल्या माणसाला ज्याप्रमाणे सर्व कडूच लागते, त्याप्रमाणे आपली वृत्ती विषयाकार झालेली, तिला सगुण, निर्गुण, दोन्ही कुठे गोड लागतात ? ’सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो’ म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. वस्तुतः तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याचे त्यालाच नाही कळत. स्थलात आणि कालात जे देवाला आणतात, त्यांनी त्याला सगुणात नाही आणले या म्हणण्यात काय अर्थ आहे ?
परमार्थाविषयी आपल्याला विचित्र कल्पना असतात. अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको. सूर्य हा आपल्या आधी होता, आज आहे आणि पुढेही राहणार आहे. तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भगवंताच्या बाबतीत आपले तसेच घडते. एखादा नास्तिक जर म्हणाला की, ’देव नाहीच; तो कुठे आहे हे दाखवा, ’ तर त्याला असे उत्तर देऊन अडविता येईल की, ’देव कुठे नाही ते दाखवा. ’ पण हा उत्तम मार्ग नव्हे. देव नाही असे म्हणणारालासुद्धा, त्या स्वरूपाचे काहीतरी आहे ही जाणीव असतेच; फक्त तो त्याला निरनिराळी नावे देतो. निसर्ग, शक्ति, सत्ता, अशी नावे देऊन त्यांचे अस्तित्व मान्य करतो, पण ’ देव ’ नाही असे तो म्हणतो. जे आहे असे त्याला वाटते तोच देव समजावा. मनुष्याला जितके ज्ञान असते तितके लिहिता येत नाही; जितके लिहिलेले असते तितके वाचणार्‍याला समजत नाही; त्याला जितके समजलेले असते तितके सांगता येत नाही; आणि ऐकणार्‍याला, तो जितके सांगतो तितके कळत नाही. म्हणून, मूळ वस्तूचे वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजावे. परमात्मा कर्ता आहे असे समजून, आपण आजचे कर्तव्य करीत राहावे.

३३२. निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही. म्हणून ते अवताररूपाने, अथवा संतरूपाने, सगुणरूप घेऊन येते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 26, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ नोव्हेंबर २०१४

भगवंताशी आपले नाते जोडावे. 

 



भगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुकेपण बरे नाही का ? दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहात नसेल तर ती दृष्टी काय कामाची ? आपले कान जर त्याची कीर्ति ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे ? डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे, मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे, हाच खरा अभ्यास आहे. भगवच्चरित्र ऐकायचे कशासाठी ? तर त्याप्रमाणे वागण्यासाठी.
भगवत्प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे. भगवंताशी आपले नाते जोडावे. कोणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे; तो माता, मी लेकरू; तो पिता, मी पुत्र; तो पती, मी पत्‍नी; तो पुत्र, मी आई; तो सूत्रधार, मी बाहुले; असे काही नाते लावावे. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही ? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको ? पण लग्न होताच ते नाते लावतो, आणि सहवासाने प्रेम वाढवितो. प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयीचे प्रेम कोणचे तरी नाते लावून वाढवावे. किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवद्प्राप्ती सुलभ होते. हनुमंताने दास्यभक्ति केली, रामाला आपल्या हृदयातच ठेवले. गुहकाचे रामावर तसेच प्रेम होते. रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, हनुमंताने स्वामी म्हणून, भगवंताला आपलासा करून घेतलाच.
ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नये. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावे. परान्न म्हणजे दुसर्‍याने मिळविलेले अन्न. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्माच आहे. त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता, जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे, याचे नाव सात्त्विक आहार होय. मुख्य म्हणजे, प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. मग ते खाणे, पिणे, गाणे, बजावणे, हिंडणे, काहीही असो. गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात, त्यामध्ये भगवंताची आठवण राहणे कठीण असते. गायन हे करमणुकीकरिता असले तरी भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यांत पाणी यावे. राम आपल्या जरूरीपुरते कुठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावे. प्रपंचात दुःखप्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण होते; तसे ते सर्व काळी करावे. रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते.

३३१. भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासा
करून घ्यायला निराळे काही करण्याची जरूरी नसते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 25, 2014

मार्गशीर्ष गुरुवार

मार्गशीर्ष  गुरुवार 

( सर्व माहिती इतर  संकेतस्थळावरुन साभार ) 


मार्गशीर्ष महिना मध्ये चारही गुरुवार सकाळी उपवास व संध्याकाळी गोड जेवण करतात.
सवाष्ण बायका वैभव लक्ष्मीव्रत करतात.


सुख, शांती, वैभव सवाष्ण रुप राहण्याकरता हे वैभव लक्ष्मीव्रत करतात. तांबा च्या तांबा मध्ये पाणी घालून आंबा याची पान ठेवतात.लक्ष्मी ठेवतात. सवाष्ण बायका बोलावून वैभव लक्ष्मीव्रत पुस्तक वाचतात.हळद कुंकू लावून खणा नारळांनी तांदूळ ह्यांनी ओटी भारतात. शिरा गव्हा ची खीर असे कांही गोड देतात.
वाटल्यास जेवण देतात.वैभव लक्ष्मीव्रत पुस्तक देतात.असे हे मार्गशीर्ष महिना त चार गुरुवार करतात.
मनाला खूप चांगल वाटत.हे वैभव लक्ष्मीव्रत केल्यामुळे .म्हणून वैभव लक्ष्मीव्रत करतात.

श्रीमहालक्ष्मी व्रतकथा
श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी,सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ध्यानी घ्यावी, अशी ही कहाणी आहे. द्वापार-युगातली. आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता प्रजादक्ष होता. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकून आठ अपत्ये होती. सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा-राणीने कन्येचे नाव शामबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल; प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले, तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत-टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, "कोण गं बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय ? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली, "माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आलेय. कुठे आहे ती? दासी म्हणाली, "राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले, तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब." म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली. "तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्‍नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी-तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणार्‍या श्रीमहालक्ष्मी-व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती, समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती-पत्‍नी लक्ष्मी-लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे." म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, " मला सांगाल ते व्रत? मी करीन ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही; घेतला वसा टाकणार नाही."


म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार, तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, "कोण गं तू थेरडे? इथे कशाला आलीस ? जा इथून." तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती, हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार, तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली, "आजी, रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते." राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली. तिने शामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता.


पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले.


लवकरच शामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा-समाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव, ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती; ती स्थिती आता बदलली. अन्न-पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे; पण तो तरी काय करणार? एकेक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता.


एक दिवस भद्रश्रवाला वाटले, मुलीकडे जावे, तिला पहावे आणि चार-आठ दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून-चालून तो खूप दमला होता; म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शामबालालाही ते समजले. शामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान-सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली.


भद्रश्रवा परत जायला निघाला, तेव्हा शामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे, हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय? हंड्यात धन नव्हतेच. होते फक्त कोळसे ! महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्र्श्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता.


दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक-एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली. तेव्हा शामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शामबालाने आईकडूनही महालक्ष्मी-व्रत करवून घेतले. चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई-वडिलांना भेटण्यासाठी म्हणुन शामबाला माहेरी आली. पण 'बाप' भेटायला गेला असताना त्याला शामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता; पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही,' हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली.


स्वगृही आल्यावर मालाधराने शामबालेला विचारले, " माहेराहून काय आणलंस?" शामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले, तर हंड्यात मिठाचे खडे ! मालाधराने चकित होत पत्‍नीला विचारले, "हे काय? या मिठाचा काय उपयोग? शामबाला म्हणाली, "थोडं थांबा, म्हणजे कळेलच." त्या दिवशी शामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न-पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. "हा मिठाचा उपयोग!' शामबाला पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पटले


थोडक्यात, जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील.


महालक्ष्मीची ही कथा, कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ॥


ॐ महालक्ष्मी नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ नोव्हेंबर २०१४

विषय, वासना, इत्यादि सोडून भगवंताला शरण जावे. 

 

 

भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. भगवंताचे मर्म ओळखायला, मी कसे वागावे हे प्रथम पाहावे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिलेली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळले. आपण त्यांचे आप्तवाक्य प्रमाण मानले. भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी ? बीजगणितामध्ये उदाहरण सोडविताना एक अज्ञात 'क्ष' घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या 'क्ष' ची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही. पण तो घेतल्याशिवाय चालत नाही. त्याप्रमाणे, जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचे खरे स्वरूप, जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल. खरोखर, जन्ममरणातून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवितो तो खरा आप्त. भगवंताला सर्वात अधिक काय आवडते हे संतांनी सांगून टाकले. ते म्हणजे ' आपण विषय, वासना इत्यादि सर्व काही सोडून भगवंताला शरण जावे. ' आपण नेहमी विषयांनाच शरण जातो. भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भितीच नाही उरत. सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे.
आपण जिना चढतो ते जिन्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते. वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून, जिना हे त्याचे साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रते, नेमधर्म ही साधने असून, परमेश्वरप्राप्ती हे आपले साध्य आहे. पण परमेश्वरप्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलो आहोत याला काय करावे ? मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे, पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो. आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो. याचा अर्थ असा की, आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो, आणि मग त्याच्या नामाकडे जातो. भगवंताने केलेली ही सृष्टी, आहे तशीच सर्व जरूर आहे. तिच्यामध्ये बदल करायला नको, बदल आपल्यामध्ये करायला हवा. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे, तर मग जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात आहेत यात शंका कोणती ? झाडाच्या मुळांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे, भगवंताचा विसर पडू न दिला म्हणजे सर्व काही बरोबर होते. भगवंत हवासा वाटणे, यामध्ये सर्व मर्म आहे. आत्मा हा समुद्रासारखा आहे; त्याचा अगदी लहान थेंब, त्याप्रमाणे हा जीव आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे, हेच खरे तत्त्वज्ञान आहे. या आत्म्याचे नित्य स्मरण ठेवून आनंदात असावे.


३३०. संतांनी नामस्मरणरूपी नाव आपणास दिली आहे.
त्यात विश्वासाने बसू. संत हे कर्णधार आहेत, ते आपणास पैलपार नेतील.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 24, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ नोव्हेंबर २०१४ 

उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी.

 


विस्तव माहीत नसला, तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भाजतो; किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही, लोखंडाचा घण त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे रहात नाही. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते. परंतु दुसर्‍या विषयांची आसक्ति जोवर आपल्याला सुटत नाही, तोवर मनापासून भगवद्‌भक्ति होत नाही. जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्यधर्म प्राप्त होतील. उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. शिवाय, जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत, त्यांनादेखील तो अनुभवाला येईल. परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी उत्कट राहीलच असा नेम नाही. म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही.
एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही, आणि त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत. हे जसे खरे, त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांति बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांति बिघडते. ज्या दातांनी सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलतो, हे लक्षात असू द्यावे. आपण निःपक्षपाती बुद्धीने विचार केला तर भगवंताचे सान्निध्य लाभले त्यालाच निर्भयता आणि निर्वासनता येईल. प्रत्येक माणसाला आधार लागतो. पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही; यासाठी भगवंताचा आधार धरावा. बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावे, की इंद्रिये तिकडे बळजबरीने जातीलच, राम उपाधिरहित आणि त्याचे नामही उपाधिरहित आहे. म्हणून, ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत, साखर किंवा मीठच विरघळते आणि समरस होते, तद्वत् रामाशी त्याचे नामच समरस होते.


३२९. सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 23, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ नोव्हेंबर २०१४

भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे. 

 



मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल ? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार ? माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तेव्हां त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे. अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे. याकरिता श्रद्धा आणि कल्पना यांतला फरक ओळखावा. खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते. प्रल्हादाइतके आपण नामाला सत्यत्व देत नाही. कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालविली. कल्पनेच्याही पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे ?
सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रांत, सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे, म्हणूनच तो सर्वांना सुसाध्य असला पाहिजे. एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो; परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात, आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो. तसे विद्वानाला कदाचित् भगवंत लवकर प्राप्त होईल, पण अडाणी माणसालादेखील तो प्राप्त होऊ शकेलच. भगवंताची दृष्टीच अशी आहे की, त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो. मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात, त्याचप्रमाणे, परमात्मा आनंदरूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे. जसा मारुतीमध्ये देवअंश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, पण आपण झाकून तो विझवून टाकला, याला काय करावे ? मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भिती वाटत नाही, चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भिती वाटते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते, त्याला उपाधीची भिती वाटत नाही; कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.



३२८. जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय. देव आहे असे निःशंकपणाने वाटणे, हे ज्ञान होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 22, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ नोव्हेंबर २०१४

देव अत्यंत दयाळू आहे. 

 



तुम्ही फार कष्ट करून इथे येता. किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो ! बरे, इथे आल्यावर हाल काय कमी होतात ? परंतु इथे कशासाठी आपण येतो, आपल्याला काय हवे आहे, हे आपल्याला कळते का ? आपल्याला देव खरोखर हवासा वाटतो आहे का ? याचा विचारच आपण फारसा करीत नाही. आपल्यावर काही संकट आले, किंबहुना आपले काही वाईट झाले, की आपण म्हणतो, देवाने असे कसे केले ? असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही. देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एकवेळ परवडला, कारण तो ’ देवाने वाईट केले ’ असे तरी म्हणणार नाही. देव खरोखर अत्यंत मायाळू आहे, त्याला कुणाचेही दुःख सहन होत नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख, कष्ट झालेले आवडेल ? म्हणून, देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका.
द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दुःशासनाने भर सभेत खेचले, तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही, ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत, ते दुःशासनाची खांडोळी करतील. तिला पांडवांबद्दल विश्वास वाटत होता. दुःशासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला, तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले. धर्माला वाटले, आता विरोध केला तर आपले सत्याचे व्रत उघडे पडेल, म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली. हे कसले अहंपणाने लडबडलेले सत्य ! तीच स्थिती इतर पांडवांची झाली. पुढे तिने भीष्माचार्यांकडे पाहिले, परंतु त्यांनीही मान खाली घातली. तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली, आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली; आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिची अब्रू रक्षण केली. पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की, " आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास ? तो दुष्ट, केस धरून मला खेचून नेत असतानाच का नाही धावलास ? " तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, " त्यात माझा काय दोष ? मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो, परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती, ते रक्षण करतील असे तुला वाटत होते. मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ ? तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलेस, त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो. " जगाची आशा, आसक्ति सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल ? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का ? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरूरी आहे; आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, हेच माझे सांगणे.


३२७. सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ नोव्हेंबर २०१४

भगवंताजवळ काय मागावे ? 

 



एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला, आणि त्याला 'तुम्ही कुठले' असे विचारले, तर तो आपल्या खेडेगावचे नाव सांगेल. जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तालुक्याचे नाव सांगेल, इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल; तसेच दुसर्‍या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचे नाव सांगेल, आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात. तसे, मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचे मूळ एकच असल्यामुळे, त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच. पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत, जो ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचे आचरण करणे हेच हिताचे असते.
सुख मिळविण्याच्या आपल्या सर्व कल्पना आज खोट्या ठरल्या आहेत. आपण प्रथम अशी कल्पना केली की, श्रीमंतीमध्ये सुख आहे. त्याप्रमाणे रगड पैसा मिळविला तरी आपल्याला जर सुख मिळाले नाही, तर तर आपली कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे ? एकच वस्तू एकाला सुखरूप तर दुसर्‍याला दुःखरूप वाटते; म्हणजे ती वस्तू मुळात दोन्ही नाही, सुखरूप नाही किंवा दुःखरूपही नाही. जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते, ती उद्या तशी वाटेलच असे नाही. आपली बुद्धी स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही. म्हणून त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पनादेखील खोटीच असली पाहिजे; ती तेवढी खरी आहे असे आपण का म्हणावे ? जगातली आपली नाती आपण कल्पनेनेच लावतो. ती नाही म्हणायला किंवा विसरायला आपणच तयार होतो. आपल्यावर संकट आले की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी, नाती, वगैरे गोड लागत नाहीत. त्यावेळी आपल्याला चैन पडत नाही. हा सर्व कल्पनेचाच खेळ आहे. एका काट्याने दुसरा काटा काढावा आणि नंतर दोन्ही टाकून द्यावेत; त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना मारावी आणि शेवटी दोन्ही कल्पना नाहीशा कराव्यात. कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करू या. भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे, अशी कल्पना आपण करू या. त्यात खरे हित आहे, आणि त्यानेच संसार खरा सुखाचा होईल. कल्पनेचे खरे-खोटेपण हे अनुभवाअंती कळते; म्हणून अनुभवानंतर कल्पना थांबली पाहिजे. अशी रीतीने कल्पना थांबल्यावर आणि वृत्ती स्थिर झाल्यावर तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच स्थिर वस्तू आहे. " अमुक एक वस्तू मजपाशी आहे म्हणून मी सुखी आहे, " या वृत्तीमध्ये राम नसून , काही नसताना वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे, आणि वृत्ती भगवंतापाशी स्थिर झाली पाहिजे. हेच परमार्थाचे खरे मर्म आहे.


३२६. कल्पना म्हणजे मायेचे हत्यार. कल्पनारहित थोडे नामदेखील फळ देईल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 20, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० नोव्हेंबर २०१४

रामापरतें सत्य नाही ॥

 





मी कोणाचा कोण ? । मी आलो कोणीकडून ? ।
तू आहेसी अजन्म आत्माचि निधान ।
आत्म्यासी नाही जन्ममरण । हे आहे सत्य जाण ॥
आत्म्यास नसे जन्ममरण । तरी तो देहांत आला कैसा कोण ? ॥
आत्मा निर्गुण निराकारी । त्यास नाही जन्ममृत्युची भरी । तो सत्तामात्र वसे शरीरी ॥
आत्मा नाही कर्ता हर्ता । तो कल्पनेच्या परता ॥
तूं आहेस आत्मा । सर्व व्यापूनी वेगळा तो परमात्मा ॥
सर्व पोथ्यांचे सार । सर्व साधू्-संतांचा विचार । परमात्मा एकच सत्य जाण ॥
रामापरते सत्य नाही ।श्रुतिस्मृति सांगतात हेचि पाही ॥
रामसत्तेविण न हाले पान । हे सर्व जाणती थोर लहान ॥
श्रीरामरूप ब्रह्मस्वरूप, निर्गुण सगुण, सुंदर । तयासी माझे अनंत नमस्कार ॥
रामाविणें सत्य काही । सत्य जाण दुजें नाही ॥
दुःखाचा हर्ता व सुखाचा कर्ता । परमात्म्यावाचून नाही कोणी परता ॥
रामापरते हित । सत्य सत्य नाहीं त्रिभुवनांत ॥
आजवर जें जें कांही केले । तें भगवच्चिंतनाने दूर झाले ॥
विषय मला मारी ठार । हा जेव्हां झाला निर्धार । तेव्हांच तो होईल दूर ॥

सर्व कांही पूर्ववत् चालावें । तरी पण मन रामाला लावावे ॥
वैभव, संपत्ति, मनास वाटेल तशी स्थिति, । ही भगवत्-कृपेची नाही गति ॥
न व्हावे कधी उदास । रामावर ठेवावा विश्वास ॥
स्वार्थरहित प्रेम । हीच परमात्म्याची खूण ॥
जसा सूर्याला अंधार नाही । तसें परमात्म्याशी असत्य, अन्याय, नाही ॥
परमात्मा न्यायरूप आहे । म्हणजे परमात्मा सत्य आहे ॥
रामाविण सत्य सत्य कांही । सत्यत्वाला उरले नाही ॥
आपले आधी आला । आपले संगत राहिला ।
आपले मागे उरला । त्याची संगत धरतो भला ॥
रामाचा आधार जन्माआधी आला । पण माझे-मीपणानें सोडून गेला ॥
सर्व स्थिति-लय-कर्ता । एकच प्रभु माझा राम त्राता ॥
राम सर्वव्यापी भरला । तो माझेपासून दूर नाही जाहला ॥
परमात्मा सर्व ठिकाणी भरला । त्याचेविण रिता ठाव नाही उरला ॥
सर्व जीव पराधीन । सर्व परमात्म्याचे अधीन ॥
म्हणून जें जें घडेल कांही । तें तें त्याचे सत्तेनेंच पाही ॥
चातुर्य, बुद्धी, देहभाव, वासना, कल्पना । ही मायाच अवघी जाणा ॥
माया बहुत जुनाट । तिनें बहुतास भोगविलें कष्ट ॥
मुख्य देहबुद्धी अविद्यात्मक । अविद्या पराक्रम साधी फार ।
तिची शक्ति फार मोठी । आत्मदर्शन न होऊं देई भेटीं ॥
म्हणून जें जें दिसतें तें तें नासते । हा बोध घेऊन चित्ति ।
सज्जन लोक जगीं वर्तती ॥

३२५. जगाची उत्पत्ति, स्थिति, लय । हे परमात्म्याचे हाती । मनी न वाटू द्यावी खंती ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 19, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ नोव्हेंबर २०१४

भगवंताजवळ काय मागावे ? 

 



परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल ? तो तर नाम, रूप आणि गुण यांच्या अतीत आहे; म्हणून, आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल. म्हणजेच, सर्व काही आपल्या भावनेवर आहे. आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरी तो द्यायला तयार असतो. आपण विषय मागितले तर तो देत नाही असे नाही, पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून सुखदुःखेही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून, काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे. एक गृहस्थ दमून एका झाडाखाली बसला. ते झाड कल्पवृक्षाचे होते. तो सहज म्हणाला, 'इथे आता मला पाणी मिळाले तर फार बरे होईल.' असे म्हणताच त्याला पाणी मिळाले. पुढे, 'आता काही खायला मिळाले तर बरे.' असे म्हणताच त्याला खायला मिळाले. त्यावर, त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली, आणि तसे म्हणताच त्याची निजण्याची सोय झाली. पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले, तेव्हां इथे माझी बायकोमुले असती तर मजा आली असती; असे म्हणताच ती तिथे आली. एवढे झाल्यावर त्याला वाटले, ' आपण जी इच्छा केली ते सर्व मिळाले. तर आता इथे मरण आले तर--' असे म्हणताच तो मरण पावला ! म्हणून काय, की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात. तेव्हां, ज्यापासून आपले कल्याण होईल असे मागावे. एका भिकार्‍याला राजा म्हणाला की, 'तुला काय मागायचे असेल ते माग.' त्याने आपल्याला पांघरायला घोंगडी मागितली. मागितले असते तर अर्धे राज्यही द्यायला तो राजा तयार होता, त्याच्यापाशी त्याने यःकश्चित् घोंगडी मागितली. समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे. म्हणूनच, भगवंतापाशी त्याच्या भक्तिची याचना करावी; ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते, आणि दुसरे काही मागण्याची इच्छा होत नाही.
भगवंताचे अवतार कसे झाले आहेत ? तर भक्तांकरिताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत. अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही, तर त्यामुळे इतरांनाही 'देव आहे' ही भावना निर्माण होते. आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन रहावे, म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारण उरत नाही. भगवंत हा अत्यंत दयाळू आहे. लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते. त्याप्रमाणे, भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला, बिभीषण शरण आला म्हणून त्याला तारला, आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला; पण त्याने सोडले कुणालाच नाही. असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही.



३२४. भगवंताच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही, असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 18, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ नोव्हेंबर २०१४

श्रद्धा ही मोठी शक्ति आहे. 

 

    

फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे. दुकानात गिर्‍हाईक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की, ' हे गिर्‍हाईक काही विकत घेणार नाही ' असे दुकानदार समजतो. परमार्थातही अती चिकित्सा करणार्‍या माणसाचे तसेच आहे. रणांगणावर गुरूंना कसे मारावे या चिकित्सेत अर्जुन पडला. भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखविले. त्यात पुढे होणार्‍या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या. देहबुद्धीच्या, अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळे झालेला गोंधळ या विश्वरूपदर्शनामुळे नाहीसा झाला.
मायेचे मूळ लक्षण म्हणजे 'मी कर्ता आहे’ असे वाटणे. 'अभिमानाशिवाय कार्य तरी कसे होईल ?' असे आपण म्हणतो, आणि पापाचरण करायलाही मागे पुढे पाहात नाही. देहबुद्धीने केलेला धर्म उपयोगी पडत नाही. अभिमानाने पुण्यकर्मे जरी केली तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात. सर्व काही देवाला अर्पण केले, ही आपली आठवण काही जात नाही. दुःखात असताना, आपण आपले जीवन प्रारब्धाच्या, ग्रहांच्या, संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो. परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून, आपण त्याला विसरतो. आपण आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही. त्यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल ? आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच ! 'मी कसा जगलो' याचे कारण कुणालाही सांगता येणार नाही. म्हणून, राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी.
ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली. सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे. तो आनंदमय आहे, आपण त्याचे अंश आहोत, मग आपण दुःखी का ? याचे उत्तर असे की, 'देव आहे' असे खर्‍या अर्थाने आपण वागत नाही, जिथे भगवंत आहे तिथे आपण त्याला पाहात नाही, श्रद्धेने साधन करीत नाही. श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही. श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ति आहे. श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते. विद्या, बुद्धी, कला, इत्यादि गोष्टी बिळासारख्या आहेत, त्यांच्यामधून श्रद्धा झिरपत जाते. विद्वानांची मते आपापसांत जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते, आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा, म्हणजे धीर पाहिजे. आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली, तरी आपले काम होईल. नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी, आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे.

३२३. भगवंतावर निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा, भगवंत कष्टसाध्य नसून सहजसाध्य आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 17, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ नोव्हेंबर २०१४

भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची. 

 



परमेश्वरापाशी काय मागावे ? तुम्ही त्रास करून घेऊन इतक्या लांब गोंदवल्याला जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात ना ? ते मागितलेत तर तो देणार नाही असे नाही. आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही. आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते, पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही. पण विषय मागून मिळाले तरी आपले खरे कल्याण होईल का ? त्याने तुम्हाला खरे समाधान होईल का ? नाही. कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुनः येणारच. म्हणून देहभोग येतील ते येऊ देत. देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचे असेल त्या स्थितीत 'मला समाधान दे' हेच त्याच्यापाशी मागावे. त्याची करुणा भाकून, 'मला तू निर्विषय कर आणि काही मागावे अशी इच्छाच होऊ नये हेच देणे मला दे,' असे तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे. त्यातच तुमचे कल्याण आहे.
भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे. अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटते, तेच भगवंताबद्दल वाटावे. सात्त्विक गुणापलिकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही. म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही. जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही. म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा भाका, म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही. जगात जे ज्याला आवडते तेच आपण केले तर त्याला ते गोड वाटते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसर्‍या कशाचीही गरज नाही. निःस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला बद्ध करता येते. प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या बोलण्यामध्ये, नव्हे पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे. प्रेम करायला गरीबी आड येत नाही, किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. नाम हे प्रेमरूपच आहे, आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे-घेणे हा होय. म्हणून, आपण नाम घेतले की, भगवंताचे प्रेम येईलच. नामाचे प्रेम नामातूनच उत्पन्न होते. देवाला देता येईल असे एक नामच आहे, ते घेऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो. अत्यंत गुह्यातले जे गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो : नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय. आपण भगवंताची प्रार्थना करून, नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो, आणि आपले मन आपोआप नामात रंगून जाऊ लागते.



३२२. भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ नोव्हेंबर २०१४

अभिमान जाणे ही देवाची कृपाच. 

 



आता उत्सव पुरा झाला; आता तुम्ही सर्वजण परत जाल, तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा. ती खूण म्हणजे काय ? क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा. आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी. तर इथे येऊन, विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का ? इथे साक्षात् परमात्मा आले आहेत, त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे. तर मला वाटते याहून तुम्ही काही तरी जास्त करणे आवश्यक आहे. तर एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी. अभिमान इथे सोडावा, आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी. अभिमान तुम्हाला देता येईल का ? अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का ? अभिमान जाणे म्हणजे देवाची कृपा होणे आहे. अभिमान सोडू म्हणून सुटत नाही. मागे एकदा असे झाले की, एकजण तीन वर्षेपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता. मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो आहे असे त्याला वाटत असे. एकदा त्याचे गुरू तिथून जात होते. त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले. म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की, " तू इथे काय करतो आहेस ? " तर तो म्हणाला, " मी इथे एके ठिकाणी बसून तीन वर्षे साधन करतो आहे." ते म्हणाले, " वा ! वा ! फार चांगले ! तू आणखी तीन दिवस इथे सारखे बसून साधन कर, म्हणजे आतापर्यंत केलेल्याचे श्रेय मिळेल." तो तसे करू लागला. त्याला वाटले की, तीन वर्षे साधन केले, तर आता तीन दिवस करणे फारसे काय अवघड आहे, तर ते सहज करीन ! पण गंमत अशी की, त्याला गुरूने सांगितल्यावर तिथे पाच मिनिटेसुद्धा बसवले नाही. त्याला आतून कोणीतरी फेकून देते आहे असे वाटू लागले, खालून मुंग्या आल्याशा वाटू लागल्या, आणि आजूबाजूने सारखी भिती वाटू लागली. तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली आणि तो गुरूला शरण गेला. तो म्हणाला, " मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले, पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणे शक्य नव्हते. आपणच माझ्याकडून सर्व करून घेतले आणि आपण शक्ति दिली म्हणूनच माझ्याकडून हे साधन झाले, नाहीतर होणे शक्य नाही. तर मी आपल्याला शरण आलो आहे." याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली. म्हणून, सात्त्विक अभिमानही उपयोगी नाही. एकवेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो, कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो; पण सात्त्विक अभिमान सुटायला फार वेळ लागतो.



३२१. परमार्थामध्ये मिळविण्यापेक्षा मिळविलेले टिकवणे हेच फार कठीण जाते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ नोव्हेंबर २०१४ 

काळजीचे मूळ कर्तेपणात आहे

 



आनंद पहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का ? नाही. जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन ' मी दुःखी आहे ' असे मानून घेतले आहे. एक जण आपले तोंड आरशात पहायला गेला, पण त्याला ते दिसले नाही. त्यावर दुसरा एकजण म्हणाला, ' मी दाखवितो.' असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून, त्याने आत पहायला सांगितले, तेव्हां तोंड स्वच्छ दिसले. त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात. ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मस्वरूप आहेस; म्हणजे तू स्वतःसिद्ध आणि आनंदरूप आहेस. परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो. आणि त्यामुळे त्यातले सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो. ज्याने तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ति असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीतही असतो; पण तिथे आपल्यावर कर्तेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करीत बसतो. वास्तविक आपल्या हाती काय आहे ? परमात्म्याला काय करायचे ते तो करीत असतो, आपण मात्र काळजी करून शीण करून घेत असतो. म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावे. आपण त्याचे होऊन राहिले म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही, आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो.
काळजी ही मोठी विलक्षण असते. एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी ही काळजी होती. पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर, त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली. काही दिवसांनी लग्न झाले; मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली. नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली. काही दिवसांनी तिला मूल झाले; त्या मुलाला फिट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली. शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फिट बरी झाली. पण त्या म्हातार्‍यालाच फिट्स येऊ लागल्या. आणि अखेर काळजी करीत करीतच तो मरून गेला. काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरेच काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे, आणि खुद्द कर्तेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. व्यवहारी माणसे मोठी हुशार असतात; भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात ! हा तर त्याच्याहिपेक्षा मोठा गुन्हा आहे. 'काळजी लागणे स्वाभाविक आहे ही कल्पनाच आधी मनातून काढून टाकली पाहिजे. आपली काळजी का सुटत नाही ? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. काळजीने आपल्याला धरण्याऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो, तर मग ती सुटणार कशी ? ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचे कारण उरत नाही.



३२०. संकट आले तर काळजी करू नये. भगवंत करतो ते आपल्या हिताचे करतो ही दृष्टी ठेवावी.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 14, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ नोव्हेंबर २०१४

प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा. 

 

    

हे जे सर्व जग दिसते, त्याला कुणी तरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का ? एखाद्या नास्तिकाला विचारले की 'हे जग कुणी निर्माण केले ? ' तर तो काय सांगेल, तर पांचभौतिक तत्त्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्त्वे कुणी निर्माण केली ? त्यावर तो सांगेल, 'ते मात्र काही कळत नाही'. पण जे कळत नाही त्यालासुद्धा कुणीतरी असलाच पाहिजे. म्हणून, देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहितो; आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी, ज्याअर्थी ती आहेत, त्या अर्थी त्यांना कुणीतरी बांधणारा आहेच. म्हणून काय की, जगाचा कुणी तरी कर्ता हा असलाच पाहिजे. तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच.
आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ थाटतात, खेळात लग्न लावतात, त्यांचा सर्व सोहळा करतात; बाहुलीचे सर्व संस्कार ती करतात. त्यांच्या खेळात बाळंतपण होते, मुले होतात, सर्व काही करतात; पण त्यांना कुणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तशीच धावत जातात. त्या वेळेस मूल तिथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहात नाही. असेच आपण संसारात वागावे. जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो आणि संहारही करणारा तोच असतो; तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे-वाईट झाले म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे ? समजा, आपण एक घर भाड्याने घेतले आहे. त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरतो आहोत. पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो, तर तो मालक ऐकेल का ? तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावील की नाही ? तसेच आपले प्रपंचात झाले आहे. जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे, तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो. परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे ? तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी, म्हणजे संसारात सुखदुःखे बाधत नाहीत.
आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये. भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालो तर वाईट काय ? बरे, तसे न झाले तर प्रपंच चालूच आहे ! प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा, आनंदाने रामनामात राहू या. सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा, मन खास चिंतारहित होईल, पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल.

३१९. हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे. प्रपंच ज्याचा आहे त्यास तो देऊन टाकून आपण मोकळे व्हावे.अडखळण्याची भितीच नाही.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 13, 2014

गुरु पुष्यामृत योग


श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ नोव्हेंबर २०१४

परमेश्वर जाणण्याचा मार्ग ! 

 

 


जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो; स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपाने असतो. न्यायाधीश निकाल देतो तेव्हा 'अमक्या न्यायाधिशाने निकाल दिला' असे म्हणतो. म्हणजेच काय की, तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले, त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे. म्हणूनच, सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असे सांगतात त्याचेही कारण हेच आहे. या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते. देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते, पण ती बरोबर जाणली जात नाही, आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणे हेच खरे व्हायला पाहिजे असे असते, अशी ज्याला इच्छा झाली त्याचे अर्धे काम झाले असे म्हणावे. तशी इच्छा झाल्यावर, देव पाहण्यासाठी काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो. त्याला पुष्कळ निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील. कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल; कुणी सांगतील की ब्रह्मचारी राहिले म्हणजे देव भेटेल, कुणी सांगतील गृहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितला आहे. तसे वागले म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल; कुणी याग, कुणी हठयोग, तर कुणी जपतपादि साधने सांगतील. अशा मतामतांच्या गोंधळात आपण काय करावे ? तर ज्यांनी तो मार्ग चोखाळला आहे, त्यांनी काय केले ते पाहावे. असा मार्ग कुणी चोखाळला ? तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी. त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे. म्हणून ते काय सांगतात ते पाहावे.
आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो. जिथे चार वाटा फुटतात तिथे पाट्या लावलेल्या असतात, आणि जिकडे जायचे ते त्यावर लिहिलेले असते. समजा आपल्याला पंढरपूर जायचे आहे; आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का ? पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावे, तसेच आपले झाले आहे. आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत, आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत. म्हणूनच, संत सांगत असतात त्या वाटेनेच जाण्याचा निश्चय करावा, आणि तो मार्ग जरी कठीण वाटत असला, तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवावे.


३१८. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे; पडण्याची, अडखळण्याची भितीच नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 12, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ नोव्हेंबर २०१४

बद्ध आणि मुक्त यांतला फरक. 

 

  


बद्ध हे जगाचे असतात. मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संतांची चवकशी करताना, त्याची उपासना कोणती, गुरू कोण हे पाहतात. त्याच्या आईबापांची नाही चौकशी करीत. संतांना देहाची आठवण नसते. ते आपला देहाभिमान, मीपण, भगवंताला देतात. परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बद्ध. विषयाचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्तदशेच्या मार्गाला लागणे, ' मी भगवंताचा ' म्हटले की तिथे बद्धपणा संपला. आपण बद्ध आहोत हे तरी आपणच बद्ध आहोत ही भावना करून घेतली म्हणून. आपण, मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना, सर्व इंद्रिये मिळून होणारा देह मी आहे असे म्हणतो; आणि त्यामुळे देहाला जे सुखदुःख होते ते आपल्याला झाले असे म्हणतो. आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो. परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असे आपण म्हणत असतो; म्हणून मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा, अशी आपली भावना दृढ झालेली असते. परंतु आपण बोलण्यात मात्र ' माझा ' हात दुखावला किंवा 'माझ्या ' पोटात दुखते, असे म्हणतोच की नाही ? म्हणजे, प्रत्येक अवयव 'माझा' म्हणणारा कुणीतरी वेगळा आहे हे खरे; आपल्याला ते बरोबर समजत नाही इतकेच. मीपणा हा आपल्यात इतका बाणलेला असतो.
आपले मन विषयाच्या आनंदात रंगले, म्हणून तिथे आपण आपलेपणाने वागतो. परंतु विषयच जिथे खोटे, तिथे मन रंगूनही, ते नाहीसे झाले म्हणजे आपल्याला दुःख हे होणारच. आपण दुसर्‍यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुखदुःख होते. म्हणून , आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असे समजून वागावे. हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ति करायला पाहिजे. भक्तिला जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच होय; आणि ती गेल्याशिवाय खरी भक्ति होणारच नाही. तरी आपण परमेश्वराचे आहोत असे समजून वागावे. जे जे होईल ते ते त्याची इच्छा म्हणून झाले असे समजून वागू लागलो, म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल. याकरिता काही तप, याग वगैरे करावे लागत नाही. संसार सोडून वनातही जावे लागत नाही आणि विशेष आटाआटीही करावी लागत नाही. जे घडते ते ' मी केले' हा मीपणा टाकून, ' मी देवाचा आहे ' असे म्हणून, आणि जे होईल त्यात आनंद मानून राहावे, म्हणजे मीपणा सुटत जाईल. हे ' मी ' केले नाही, परमात्म्याच्या इच्छेने झाले, असे मानले म्हणजे मीपणा राहिला कुठे ?


३१७. ज्याप्रमाणे, मनाने ' मी देहाचा आहे ' अशी समजून झालेल्याने आपण देहरूप बनलो,
त्याचप्रमाणे मनाने ' मी भगवंताचा आहे ' असे म्हणत गेल्याने आपण भगवद् रूप बनून जाऊ.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 11, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ नोव्हेंबर २०१४

परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग. 

 

परमात्म्याची ज्याने ओळख होते ते ज्ञान. अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच होय. परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही. भक्ति केल्यानेच तो ओळखता येईल. जसे गाय आली म्हणजे तिच्यामागोमाग वासरू येते, त्याला निराळे बोलवावे लागत नाही. त्याप्रमाणे, भक्ति केल्यावर ज्ञान आपोआपच मागे येते. आता भक्ति कशी करायची हे पाहिले पाहिजे. जो देवापासून विभक्त राहात नाही तो भक्त. नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही, तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवील त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैरागी होणे. सुखात ठेवले तर आसक्तिशिवाय राहिले म्हणजे झाले. वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही. साधुसंत प्रपंच सोडून राहात नाहीत. किंबहुना, ते आपल्यापेक्षांही प्रपंच उत्तम करतात; पण मनातून त्यांना त्यात आसक्ति नसते. मनाने आतून जो आसक्तिरहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले असे होते. अंगाला राख फासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही; तर देह प्रारब्धावर, भगवंताच्या भरवंशावर टाकून राहणे हेच वैराग्य. कशाचीही हाव न धरता, जी स्थिती प्राप्त होईल तीतच आनंदाने राहणे म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणे होय. आणि तसे राहिले म्हणजे आपोआपच भक्त होतो. तसे व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे. नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासाने घेत जावे.
गुरूने जे नामस्मरण करायला सांगितले असेल तेच करीत राहावे. आणि त्यातच त्याला पाहावे, म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागते. असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरू दिसू लागतो; चांगल्या दिवाणखान्यात असलो म्हणजे गुरू दिसतो आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही असे नाही. सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावर जगात वाईट असे काहीच राहात नाही, कारण मग वाईटाला जागाच राहात नाही. नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही तेच आहे. दुसर्‍या कुणीही काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये. नामस्मरण हेच सत्य. त्यावर इतका विश्वास ठेवा, की त्याशिवाय जगात दुसरे काही नाही. एवढा विश्वास अंगी बाणल्यावर देव काही लांब नाही, तुमच्याजवळ आहे. प्रपंचावर जी आसक्ति करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा, म्हणजे परमार्थ कठीण नाही. गुरूला अनन्य शरण जाणे म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणे होय. मीपणा समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही. मीपणा हा गुरूने सांगितलेले नामस्मरण करीत राहिल्याने जातो. म्हणूनच सतत नामस्मरण करीत असावे.


३१६. वैराग्य हे वृत्तीत असते. भगवंताने जे दिले त्यात समाधान असून, इतर काही हवे असे न वाटणे, हे वैराग्य.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

November 10, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- 

१० नोव्हेंबर २०१४

शेजार असतां रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ॥

  


ज्याला म्हणावे मी 'माझे' । त्यावर माझी सत्ता न गाजे ॥
स्वतःचा नाही भरंवसा हें अनुभवास येई । परि वियोगाचे दुःख अनिवार होई ॥
तुम्ही विचारी, सुज्ञ आहांत । थोडासा करावा विचार ॥
सर्व सत्ता रामरायाचे हाती । तेथे मानवाची काय गति ? ॥
विचाराने दुःख सारावें । सर्वांचे समाधान राखावें ॥
सर्व केले रामार्पण । हा नव्हे शब्दांचा खेळ जाण ॥
अर्पण केल्याची खूण । न लागावी काळजी तळमळ जाण ॥
परमात्म्याचे रक्षण, कोणतेही स्थळी, कोणतेही काळी, असते हा भरंवसा ।
याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ॥
ठेवा रामावर पूर्ण विश्वास । न करावे उपासतापास ॥
उपास हा शब्द अलिकडील जाण । त्याच्यापुढे एक पाऊल टाकून ।
उपासनेत राहावे आपण । तेथे आहे निर्धास्तपण ।
उपासनापुढील ठाण । उपासना मुख्य जाण ॥
उपासनेंत राहावे आपण । हेंच रामाचें सान्निध्य जाण ॥
शेजार असतां रामाचा । दुःखाची, काळजीची काय वार्ता ॥
जैसा सूर्य प्रकाशतां । काळोखाचा नाश होईल तत्त्वतां ॥
एवढें आता ऐकावे माझे । राम उतरील सर्व ओझें ॥
स्मरतां रामाला । तो देईल समाधानाला ॥
देवाकडे करावी विनंति । देहदुःख अति फार । होई रामाचा विसर ।
आता द्या नामाचे अखंड स्मरण । देवा, देह केला तुला अर्पण ॥
परमात्मा दयाळू फार । आपलें हित करील हा ठेवावा निर्धार ॥
मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा विश्वास । न सोडावा आता धीर ।
सदा घ्या भगवंताचे नाम । जेणें कृपा करील रघुनंदन ॥
राम कृपाळू दीनांचा नाथ । तो सर्व कांही पाहात ॥
आपले प्रारब्धाने आलेले कर्म । ते त्यास न विसरतां करावे अर्पण ।
सुखाने घ्या नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥
हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥

मागील गोष्टींची आठवण । पुढील गोष्टींचे चिंतन । हेंच दुःखाला खरे कारण ॥
स्वार्थ म्हणजेच आपलेपण । म्हणून माझा मीच दुःखाला कारण ॥
आपण आपलेपणानें वागत गेलें । सुख, दुःख, चिंता, शोक यांचे मालक व्हावे लागलें ॥
सुखदुःखांत चित्ताची न राहे स्थिरता । तीच त्याची खरी अवस्था ॥
सुखदुःख परिस्थितीवर नसते । आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ॥
दुःखाचें मूळ कारण । जगत् सत्य मानलें आपण ॥



३१५. जोपर्यंत 'देही मी' ही भावना । तोपर्यंत दुःखाच्या यातना ॥
सारांश, देहातादात्मक । याचेंच नांव दुःख ॥




( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या