December 16, 2017

अजि सोनियाचा दिनू



मंडळी,  दिल्लीला जनपथ रोडवर आज मोठी लगबग असणार आहे. आज शनिवार,  अनुराधा नक्षत्र ( शनीचे नक्षत्र)   चंद्र वृश्चिक राशीत असताना युवराजांचा पक्षीय अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक होत आहे.

आता पुढचे लिखाण *मुहूर्त बघणे म्हणजे कसा भंपकपणा आहे वगैरे मानणारे आणी असे टुकार मेसेज वेळोवेळी Whatsapp किंवा इतर सोशल मिडीयावर पुढे ढकलणाऱ्यांसाठी*

तर आजच्या अध्यक्ष पदाची सूत्रे घेण्याआधी या माऊलीने आपल्या मुलाची पत्रिका जोतिषाला नक्कीच दाखवली असणार आणी माझ्यामते त्यांनी आजचा योग्य दिवस निवडला आहे.

राजकारणाचा कारक ग्रह शनी आहे.आज त्याचा वार आणी अनुराधा  नक्षत्र स्वामी या नात्याने शनी दिवसभर रुलिंग मधे आहे.

साधारण पणे एखादा चांगला दिवस बघण्यासाठी रोजच्या चंद्राचे भ्रमण लक्षात घेतात. मुळ पत्रिकेतील शुभ स्थानातून त्या दिवशीचा चंद्र जात असेल तर तो दिवस उत्तम मानतात
आज चंद्र वृश्चिक राशीत आहे आणि युवराजांच्या पत्रिकेत वृश्चिक रास लाभस्थानात आहे. अर्थात लाभस्थान हे पत्रिकेतील एक चांगले स्थान आहे.

शास्त्र कारांनी प्रत्येक नक्षत्रावर काय करावे हे लिहून ठेवले आहे. आज अनुराधा नक्षत्र,  या नक्षत्रावर राज्याभिषेक करताता ( पक्षाच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारणे हा एक प्रकारचा राज्याभिषेकच)
खाली पुस्तकातील लिखीत स्वरूपातील माहिती दिली आहे 👇🏻

तर निवडणुकीपूर्वी ' देवा तुझ्या द्वारी आलो' म्हणणारे पदग्रहण करण्यासाठी ही जर चांगला दिवस/ मुहूर्त बघायला लागले असतील तर तो तमाम भारतवर्षासाठी

अजि सोनियाचा दिनू  असंच म्हणावं लागेल.




युवराजांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐आणि ' देवा तुझ्या द्वारी आलो' या अनुदिनी कडून एक प्रेमळ भेट 🎁

बाकी आमच्या देवळात कधीही दर्शनाला या
kelkaramol.blogspot.in

📝( अभ्यासू) अमोल
१६/१२/१७

December 2, 2017

न कर्त्याचा वार शनिवार

न कर्त्याचा वार शनिवार

ही म्हण ऐकली असेल सगळ्यांनी. पण या म्हणीसाठी शनिवारच का निवडला असावा? रविवार ते शुक्रवार पैकी एका वाराची निवड का केली नाही?

मंडळी थोडा जोतिष शास्त्रीय विचार करु. कृष्णमूर्ती पद्धतीत रुलिंग प्लँनेट ही एक संकल्पना आहे. यात प्रत्येक क्षणावर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असतो हे त्यांनी सांगितले आहे. यात त्या दिवसाचा स्वामी दिवसभर रुलिंग मधे असतो असाही एक नियम आहे.
म्हणजे शनिवारी - शनी रुलिंग मधे पूर्ण दिवस असतो.
आता ' शनी' चे कारकत्व माहितच आहे. उशीर करणे, वेळ लागणे, विलंब
म्हणूनच ही म्हण तयार झाली असावी.   

पण केवळ ' न कर्त्याचा वार शनिवार ' म्हणजे कुठल्याही चांगल्या ( मोठ्या) कामाला सुरवात शनिवारी करु नये असा गैरसमज पसरत गेला

पण शनी - उशीर करतो पण हक्काने काम करुन देतो.
शास्त्रकारांनी रचलेले नियम बरोबर होते आपलीच समजण्यात कधी कधी चूक होते.
हे लेखन आजच्या दिवशी शनीचरणी अर्पण 📝
🌺🙏🏻

November 28, 2017

मंगळ - नेपच्युन युती

मंगळ  - नेपच्युन युती 


आज एका मित्राच्या भाच्चीची  पत्रिका बघत असताना मंगळ  - नेपच्यून  युती पत्रिकेत  बघितली.  नुकताच  तिला अपघात झाला होता.
श्री   व. दा भट यांच्या ' हर्षल, नेपच्युन प्ल्युटो  या ' पुस्तकात  जे लिहिले आहे अगदी तसेच घडले 

शास्त्रकारांनी  केवढा मोठा  अभ्यास केला आहे याची प्रचिती आली . 


November 8, 2017

धनु राशीतून शनीचे भ्रमण - पुढील भाग

धनु राशीतून शनीचे भ्रमण - पुढील भाग 

धनू राशीत शनी १८ एप्रिल ते ६ सप्टेंबर २०१८ आणी ३० एप्रिल ते १८ सप्टेंबर २०१९. वक्री असल्याने प्रत्येक नक्षत्रात आणखी चरणात त्याचा कालावधी असा असेल

मूळ नक्षत्र. चरण १
२८ नोव्हेंबर १९१७ पर्यत

मूळ नक्षत्र,  चरण २
२८ नोव्हेंबर १७ ते २६ डिसेंबर २०१७ पर्यत

मूळ नक्षत्र,  चरण ३
२६/१२/२०१७ ते २५/०१/२०१८
२२/०७/२०१८ ते २१/१०/२०१८

मूळ नक्षत्र,  चरण ४
२५/०१/२०१८ ते ०२/०३/२०१८
०५/०६/२०१८ ते २२/०७/२०१८
२१/१०/२०१८ ते २७/११/२०१८

पु.षाढा , चरण १
०२/०३/२०१८ ते ०५/०६/२०१८
२७/११/२०१८ ते २७/१२/२०१८

पु. षाढा, चरण २
२७/१२/२०१८ ते २४/०१/२०१९
०२/०९/२०१९ ते ०५/१०/२०१९

पु.षाढा , चरण ३
२४/०१/२०१९ ते २६/०२/२०१९
०५/०७/२०१९ ते ०२/०९/२०१९
०५/१०/२०१९ ते २५/११/२०१९

पु.षाढा, चरण ४
२६/०२/२०१९ ते ०५/०७/२०१९
२५/११/२०१९ ते २७/१२/२०१९
उ.षाढा, चरण १

२७/१२/२०१९ ते २४/०१/२०२०

२४ जाने २०२० नंतर शनीचा मकर राशीत प्रवेश आणी धनू साठी साडेसातीची अडीच वर्षे  शिल्लक. 
वरील नक्षत्र आणी चरण जांचे आहे त्यांना त्या कालावधीत काही त्रास होऊ शकतो. - नैराश्य, मानसिक त्रास.
मुळ पत्रिकेत चर चंद्र चतुर्थेश असेल ( मेष लग्नाची पत्रिका असेल) तर आईला त्रास होण्याची शक्यता
अर्थात पत्रिकेत धनू रास कुठल्या स्थानात आहे, त्या राशीत कुठले ग्रह आहेत यावर अनेक गोष्टी अवलंबून आहे
जोतिष शास्त्रात वाईट समजली जाणारी शनी - मंगळ युती २. एप्रिल २०१८ ला  धनू राशीत पु.षाढा नक्षत्रात होत आहे. यासंबंधीची माहिती परत कधीतरी

October 28, 2017

धनु राशीतुन शनीचे भ्रमण

धनु राशीतुन शनीचे भ्रमण - पुढील भाग 📝



२६ ऑक्टोबर २०१७ ते २४ जानेवारी २०२०
म्हणजे तब्ब्ल ८२० दिवस  शनीचे धनु राशीतून भ्रमण होईल 
या मध्ये खालील कालावधीत  शनी वक्री  असेल ( उलट गतीने धनु राशीत मार्गक्रमण करेल )
१८ एप्रिल २०१८  ते  ६ सप्टेंबर २०१८  - साधारण १४१ दिवस 
३० एप्रिल २०१९ ते  १८ सप्टेंबर २०१९ -  साधारण १४१ दिवस 
आता आपणास माहितच आहे की एका राशीची अगदी लाखो माणसे असतात . मग सगळ्यांना एकाचवेळेला त्रास होतो का? तर नाही.
मग  `प्रत्येकाने केंव्हा काळजी घेतली पाहिजे? हे प्रत्येकाच्या पत्रिकेवरून अवलंबून आहे
व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात तसेच जोतिष शास्त्रात व्यक्ती प्रमाणे पत्रिका असे ही म्हणता येईल
आता पुढचा भाग काही दिवसांनी पाठवेन,  त्याआधी एक काम करायचं
आपली पत्रिका बघून ठेवा
धनू रास आहे म्हणजे चंद्र धनू राशीत (९) असणारच, आता तो कुठल्या नक्षत्रात आहे, चरण काय आहे, धनू राशीतच इतर काही ग्रह आहेत का? मुळ पत्रिकेत शनी कुठल्या राशीत आहे ( धनेतच आहे का? )
मुळ पत्रिकेत धनु रास पत्रिकेत १- ते १२ पैकी कुठल्या स्थानात आहे, महादशा- अंतर्दशा - विदशा कुठल्या ग्रहाची केंव्हा आहे, धनु राशीचा स्वामी गुरु पत्रिकेत कुठे आहे, त्याचे गोचर शनीशी काय योग होत आहेत
ही माहिती करुन घेतलीत तर शनीचे गोचर भ्रमण केव्हा त्रासदायक ठरेल आणी केंव्हा फलदायी ठरेल याचे अनुमान काढता  येईल
( सध्या ज्यांचे मुळ नक्षत्र पहिले चरण आहे त्यानी काळजी घेणे आवश्यक आहे कारण शनीचे याच चरणतून भ्रमण होत आहे)
पुढचा भाग यथावकाश
शुभं भवतू 🙏🌺
अमोल
a.kelkar9@gmail.com

October 26, 2017

सा रे सा थी.

खुप गर्दी असलेल्या बसमधून किंवा लोकल मधून प्रवास करताना सर्वसाधारण पणे तीन प्रकारचे  लोक दिसून येतात...

१) आरामात सिट वर बसलेले पण आता उतरायचे ठिकाण जवळ आल्यामुळे एवढ्या गर्दीत उतरायचं टेन्शन घेतलेले
२) २-३ स्थानकापुर्वी चढलेले प्रवासी,  पण अजून दोन सीटच्या मधेच उभे राहिलेले, बसायला केंव्हा मिळतय याची वाट पाहणारे अजून बराच प्रवास बाकी असणारे
३) मागच्याच स्टेशन/ स्थानकावर चढलेले,  प्रचंड घाबरलेले प्रवासी, खुपच लांबचा पल्ला गाठायचा आहे पण अजून दारातच लोंबकळणारे प्रवासी
हे  👆🏻सा रे सा थी नेहमी सर्वत्र दिसतात

हेच  उदाहरण 👆🏻 सा डे सा ती ला कसे संयुक्तिक ठरते पहा

आज  २६/१०/१७ ला रात्री ' शनी' धनु राशीत जात आहे त्यामुळे आता
वृश्चिक राशीची अडीच वर्षे शिल्लक,
धनुची ५ आणी मकरेला साडेसातिची सुरवात
वरील उदाहरणातील
प्रवासी १- वृश्चिक
प्रवासी २ - धनू
प्रवासी ३ - मकर
मंडळी अशी नेहमीची उदाहरणे दिली की जोतिष समजायला सोपं वाटतं ना?😀


तर मकर राशीला साडे साती सुरु होईल,  धनू राशीत शनी प्रत्येक नक्षत्रातून केंव्हा भ्रमण करेल ? त्यानुसार धनू राशीवाल्यांनी केंव्हा काळजी घ्यावी? उपाय, उपासना आणि इतर उपयुक्त माहिती जमेल तशी क्रमश: देईनच
तुर्त आज इतकेच

जाता जाता
भारत देशाची रास मकर आहे. तसेच खालील काही मान्यवरांच्यासाठी साडेसातीचा हा कालखंड कसा जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल
राज ठाकरे( मकर रास)
ऐश्वर्या बच्चन ( धनू)
प्रशांत दामले( वृश्चिक)
सोनाली कुलकर्णी (मकर)

सदर लेखन, शनीचरणी अर्पण 🙏
📝 अमोल
a.kelkar9@gmail.com

August 22, 2017

गणपती प्राणप्रतिष्ठापना - पूजेची ध्वनीफीत

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी  ' गणपती प्राणप्रतिष्ठापना ' पूजेची ध्वनीफीत   इथे  ठेवली  आहे 

ही पूजा ज्ञानप्रबोधिनी  धर्मशास्त्र अभ्यासिका, पॊराहित्य प्रशिक्षक   आर्या जोशी यांनी सांगितली आहे 

इच्छूकांनी अवश्य लाभ घ्यावा 


मोरया 

July 27, 2017

स्वीकारा स्वामी माझी बत्तीशी


आज पहिला श्रावणी गुरुवार  यानिमित्याने  स्वामी समर्थावर रचलेली ही स्वीकारा स्वामी माझी बत्तीशी  ही  प्रार्थना 

|स्वीकारा स्वामी माझी बत्तीशी||
सर्व जीवाचे उदिष्ठ व्हावे साध्य` | स्वामी तुम्हीच सर्वांचे आराध्य | नित्य वंदावे तव पाद्य | नमोनिया त्रिकाळी ||१||
सानिध्य लाभले तव चरणाचे | भाग्य उजळले शरणागताचे | भेद मिटले जन्मान्तराचे | जगण्याची हीच इच्छा ||२||
तव इच्छेनेच घडती जनभेटी | असो सभोवती सज्ज्नांची दाटी | भिऊ नको मी तुझ्या पाठी |
ऐकून घडते दर्शन तुमचे ||३||
जे काम हाती आले | त्यातूनच साधावे भले | डोळे आश्रुनी व्हावेत ओले | तव चरणक्षालनासी ||४||
इच्छेची तुमच्या आवाज्ञा नसावी | हीच दक्षता अंगी यावी | मलीनता निघोनी जावी | सत्वर तव कृपेने ||५||
तुम्ही इच्छिलेले कर्म | तोच असावा आमचा धर्म | तव सेवेचे जाणुनी वर्म | वर्तत असावे सदा||६||
जो तुम्हाला आहे त्याग | तोच मनी नसावा भोग | हा वरकरणी आहे रोग | नसावी हानी काही ||७||
सकार बोलण्याचा परिणाम | करतो तुमच्या दर्शनाचे काम | नित्य असावे आमही ठाम | तव दर्शनासी ||८||
तुम्हीच आमचे राम | तुम्हीच आमचे शाम | तुमच्या चरणीच चारी धाम | आम्ही असू दर्शनाभिलाषी ||९||
अनुसंधान साधते सुविचाराने | त्रस्त होतो जीव कुविचाराने | दोन्ही येते तुमच्या इच्छेने |
आता करवून घ्यावे योग्यते ||१०||
अज्ञानाची हि आपत्ती | वाढवते ज्ञानाची संपत्ती | त्यात दर्शन हीच प्राप्ती | तळमळ नित्य असावी ||११||
कष्ट अपार घडो ज्ञानासाठी | तो संचय असावा देण्यासाठी | झोळी फाटकी नसावी घेण्यासाठी | कदापीही ||१२||
जनास रुचेल तेच मी द्यावे | सर्वांतच तुम्हाला पहावे | परोपकारासाठीच जगावे | सर्वकाळ ||१३||
अनुभव जनाचे हेच दर्शन | त्यात मानाचे नसावे आकर्षण | तरीच होईल पुनर्वषण | तव कृपेचे ||१४||
कार्मातुनच मिळावे ज्ञान | शंकेचेही व्हावे समाधान | फुकाचा नसावा अभिमान | कष्टातुनी आता ||१५||
तुमच्या कृपेने संचय होवो | वितरणात निस्वार्थ राहो | अहंभाव हि सरो |.आत्मसुखासाठी ||१६||
भेटणाऱ्यातच आमचे भले असे | न मिळणारे कामाचे नसे | तेथे हि टिकावे सेवेचे पिसे | नम्रतेने स्वामीराया||१७||
मर्यादित यशाची व्यथा | असे आमुची कमतरता | यातही तुमची उदारता | व्हावे आम्ही महान ||१८||
ज्यांची मजप्रती अपेक्षा | त्यांची न व्हावी उपेक्षा | तुमच्या आशीर्वादाची भिक्षा | चोख व्यवहारा साठीच ||१९||
स्वार्थापोटी नको फसवणे | उदिष्ठा साठी नसावे अडवणे | देहास हि दंड देणे | नसावे कृत्य आमचे||२०||
क्षमावा हा अपराध | इच्छेला तुमच्या द्यावी दाद | सत्कर्मासाठी नको वाद | अनुसंधान साधावे||२१||
अव्दितीय असे तुमचे देणे | आता संयमा वाचून न रहाणे. |तुमचा कौल आहे घेणे | हानी टळण्या वळणावरी ||२२||
अभिमानाची व्यथा न जडो | परोपकार सतत घडो | सत्संगती सदा वाढो | इच्छा माझी स्वामिया ||२३||
उगाच नको तर्क वितर्क | फसवणुकीने होउ नये गर्क | सत्वाचाच पीत असावा अर्क | तव कृपेने स्वामीराया||२४||
अपात्र म्हणुनी नका दूर लोटू | मग तुम्हावीण कोणास भेटू? | दु:ख हे कोणासवे वाटू ? | स्वामीराया ||२५||
तव आशीर्वाद असे माझा श्वास | तव चरणाशी नम्र हा दास | आम्हा न करा उदास | प्रभो कालत्रयी ||२६||
दुष्कर्माच्या भोगाचे फटके | नसावे परी रहाटके | रागावणे असावे लटके | ठेऊन तळाशी प्रेमभाव ||२७||
जर नको ते घडले | तरी काही कमी न पडले | मात्र तुमच्या कृपे वाचून सर्व नडले | राहो सदा स्मरणात||२८||
हेच ठसावे मनात | तरच योग्य मी जनात | तव सेवेचा ध्यास स्मरणात | अखंड वसो ||२९||
माझी न योग्यता | तुम्ही निवाराव्या सर्वच खंता | अभिमानाने सर्व नासता | कर्म गहन मी म्हणतसे ||३०||
येथे खुंटते माझी प्रगती | वेळेच्या सदुपयोगाने मिळावी गती | अनुसरावी योग्य नीती | साधावया हित माझे ||३१||
हि आहे मनीची व्यथा | दासाच्या जीवनाची रंगवा कथा | नतमस्तक होऊनी ठेवितो माथा |
चरणावरी स्वामिया ||३२||
||अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सचीतानंद अक्कलकोट निवासी
 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय ||
(श्री गुरुचरण दास----विनायक.दि.पत्की.)

July 9, 2017

गुरुपोर्णीमा- स्मरण गुरुंचे

गुरुपोर्णिमे पासूनचा अनमोल निश्चय 📝

रविवारी स्मरु साई 🙏🏼🌺
दुख: अवघे जाई

सोमवारी महाराज गोंदवल्याचे 🙏🏼🌺
सार्थक करु या जीवनाचे

मंगळवारी गण गण गणात बोते 🌺🙏🏼
चूक लक्षात येऊन काम सोपे होते

बुधवारी ॐ राम कृष्ण हरी🙏🏼🌺
पावसचे स्वरुपानंद लांब असले जरी

गुरुवारी स्मरुया वाडीचे
 महाद्मा महाराज पाटील 🙏🏼🌺
बघा कसे  सहज
अपयश निघून जाईल

शुक्रवारी देवीच्या स्वरूपातील स्वामी समर्थ 🌺🙏🏼
तारक मंत्र स्मरता जीवनाला येईल अर्थ

शनिवारी स्मरू रामदास स्वामी 🌺🙏🏼
तारुन जाईल आयुष्य हीच सगळ्यांची हमी

*जय जय रघुवीर समर्थ*

📝🌺🙏🏼
देवा तुझ्या द्वारी आलो
गुरुपोर्णीमा ९/७/१७

kelkaramol.blogspot.in

For blog article on whatsapp contact on 9819830770

June 13, 2017

चिंचवडचे गणपती मंदिर

चिंचवडचा श्री मोरया गोसावी.....

मोरया गोसावी हे सतराव्या शतकातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. मोरया गोसावी हे शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समकालीन.
कर्नाटक राज्याच्या बिदर जिल्ह्यातील बसव तालुक्यातले शाली हे मोरसा गोसावी यांच्‍या आईवडीलांचे मूळ गाव. मोरया यांचे आईवडिल, वामनभट शाळिग्राम आणि त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांचे वैदिक कुटुंब होते. वामनभट त्यांना मूलबाळ न झाल्याने गाव सोडून निघाले. सोबत पार्वतीबाई होत्या. ते दोघे पुण्यातील मोरगावला येऊन स्थिरावले. त्यांना कऱ्हा नदीचे खळाळणारे पाणी, मोरयाची भव्य मूर्ती यांनी भुरळ घातली. त्या परिसराबद्दल काही अद्भुत दंतकथा वामनभटांच्या कानी आल्या. ब्रम्हदेवाने तेथे तपश्चर्या केली! त्याच्या कललेल्या कमंडलूतून कऱ्हा नदी उगम पावली! जगताच्या उत्पत्तीचा ब्रम्हदेवाचा मनोरथ तेथे पुरा झाला! मोरयाच्या कृपेने ब्रम्हदेवाला जगताची सृष्टी करता आली! वगैरे वगैरे. त्या कहाण्या ऐकून वामनभटांना वाटले, की मोरया त्यांचेही मनोरथ पूर्ण करेल! त्यांनी अनुष्ठान मांडले. मोरयाने स्वप्नात येऊन सांगितले, की ‘तुझ्या नशिबात पुत्र नाही.’ त्यामुळे वामनभट खट्टू झाले. पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. शेवटी, पार्वतीबाईंचा पाळणा हलला. त्यांनी बाळाचे नाव मोरया हेच ठेवले.
मोरया वाढू लागला. त्याची मुंज झाली. त्याचे वेदाध्ययन झाले. त्याच्यात तपश्चर्येची ऊर्मी जागी झाली. त्याला नयन भारती गोसावी गुरू भेटले. मोरया त्यांच्या प्रेरणेने थेऊरला आला. त्याची तपश्चर्या मुळा-मुठेच्या काठी चिंतामणीजवळ सुरू झाली. मोरयाच्या बेचाळीस दिवसांच्या तपश्चर्येनंतर चिंतामणीने मोरयाला दर्शन दिले.
मोरया गोसावी महाराज सिद्धी प्राप्त झाल्यावर मोरगावला परतले. आईवडिलांचा आनंद गगनात मावेना. गावकऱ्यांना मोरया गोसावींचा आधार वाटू लागला. मोरया गोसावी सगळ्यांच्या अडचणी दूर करत. रंजले-गांजले अष्टौप्रहर त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामुळे मोरया गोसावींना पूजेअर्चेला वेळ मिळेना. शेवटी, ते कंटाळून गेले. त्यातच त्यांच्या आईवडिलांचाही अंत झाला. मोरया गोसावींनी मोरगावचा निरोप कोणालाही न कळवता घेतला.
मोरया गोसावींनी पवनेच्या काठी किवजाईच्या देवळात मुक्काम केला. त्यांची साधना थेरगावच्या घनदाट जंगलात सुरू झाली. परंतु तेथेही मोरया गोसावींच्या एकांतात व्यत्यय येत असे. चिंचवडच्या गावकऱ्यांना मोरया गोसावींनी त्यांच्या गावी यावे असे वाटत होते. त्यामुळे गावडे-चिंचवडे, भोईर, वाल्हेकर, रबडे, गपचूप असे सगळेजण मोरया गोसावींकडे गेले आणि त्यांनी मोरया गोसावींना चिंचवडला आणले. मोरया गोसावी रबड्यांनी बांधलेल्या झोपडीत राहू लागले.
मोरया गोसावींचा प्रघात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी चिंचवड सोडावे, चतुर्थीपर्यंत मोरगावला जावे, मोरयाची पूजाअर्चा करावी, पंचमीचे पारणे करून परतावे असा होता. मोरया गोसावींच्या मोरगाव वारीत कधी खंड पडला नाही. त्‍यासंदर्भातील एक दंतकथा सांगितली जाते. एकदा कऱ्हेला पूर आला, नदी ओलांडणे मुष्किल झाले, तर मोरया कोळ्याचे रूप घेऊन आला. त्याने मोरया गोसावींना नदीपार नेले. दुसरी दंतकथा अशी - एकदा, मोरया गोसावींना पोचायला उशीर झाला. गुरवांनी देऊळ बंद केले. मोरया गोसावी बाहेर तरटीच्या झाडापाशी बसले, तर मोरया स्वत: बाहेर आला आणि महाराजांना चिंतामणीचे दर्शन झाले! कऱ्हा नदीत स्नानाच्या वेळी भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या मंगलमूर्तीची स्वयंभू मूर्ती आली. मग मासिक वारीऐवजी भाद्रपद, माघ, ज्येष्ठ अशा वाऱ्या चालू झाल्या.
पुढे, चिंचवडजवळच्या ताथवडे गावच्या गोविंदराव कुलकर्ण्यांना दृष्टांत झाला. त्यानुसार त्यांची मुलगी उमा हिच्याबरोबर मोरया गोसावींचे लग्न झाले. थेऊरचा चिंतामणी त्या उभयतांच्या पोटी जन्माला आला. जन्मल्यावर तो रडला नाही. त्याच्या छातीवर शेंदराचा पंजा होता आणि त्याने खेचरी मुद्रा (अष्टांगयोगातील एक मुद्रा) केली होती. मोरया गोसावींना त्या सगळ्या गोष्टींचा अचंबा वाटला नाही. कारण त्या खुणा चिंतामणीने अगोदरच मोरया गोसावींना सांगून ठेवल्या होत्या!
‘न मागे तयाची रमा होय दासी’ असे म्हणतात. मोरया गोसावींना 1616 पासूनच जमिनी इनाम म्हणून मिळू लागल्या होत्या. त्यांना आदिलशहा, निजामशहा, शहाजीराजे, शिवाजीराजे यांच्याकडून मोरगाव, कुंभार वळण, चिंचवड, चिंचोली या आणि इतर अनेक ठिकाणच्या जमिनी मिळाल्या. संप्रदाय वाढला, अन्नछत्र-सदावर्त, उत्सव-यात्रा, पूजाअर्चा यांचा पसारा वाढला. मोरया गोसावी वयोमानाप्रमाणे थकले. ते मार्गशीर्ष वद्य षष्ठी(25-01-1657) या दिवशी सकाळीच घाटावरील तयार केलेल्या गुंफेत जाऊन बसले. मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली. त्यावर त्यांचे पुत्र थोरल्या चिंतामणी महाराजांनी मोठी शिळा ठेवली आणि त्यावर सिद्धी-ऋद्धीसहित मोरयाची मूर्ती बसवली. चिंतामणी महाराजांनी 1658-59 मध्ये त्यावर देऊळ बांधले. समाधीच्या प्रवेशद्वारावर कोथळ्याहून (जेजूरीच्या खंडोबाची मूर्ती सोमवती अमावस्येला स्नानासाठी कोथळे गावी नेली जाते.) आणलेली अर्जुनेश्वर शंकराची मोठी पिंड बसवली.
चिंतामणी महाराज संस्थानचा कारभार पाहू लागले. तेही वडिलांइतकेच साक्षात्कारी संत होते. त्यांच्या कारकिर्दीत समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरू तुकाराम महाराज चिंचवडला आले. चिंतामणी महाराजांनी त्या प्रसंगी मोरयाला बोलावले तर ते स्वत:च मोरया झाले असे म्हणतात. खुंडादंडविराजित, चतुर्भुजमंडित असे त्यांचे गणेशरूप पाहून तुकाराम महाराजांनी त्यांना ‘देव’ म्हणण्यास सुरुवात केली. पुढे, तेच त्यांचे आडनाव झाले. शाळिग्राम-गोसावी-देव असा हा आडनावांचा प्रवास पूर्ण झाला.
चिंतामणी महाराजांच्या कृपेने पुण्याची देशमुखी कृष्णाजी काळभोर यांना 1664 मध्ये मिळाली, म्हणून कृष्णाजींनी चिंचवड-रावेतची देशमुखी चिंतामणी महाराजांना दिली. चिंतामणी महाराजांनी कारभाराला शिस्त लावली, यात्रा-उत्सव आखीवरेखीव केले. त्यांनी पौष वद्य चतुर्थीच्या रात्री देह ठेवला. ते वर्ष बहुधा इसवी सन 1694 असावे.
चिंतामणी महाराजांना चार मुले होती. पैकी नारायण महाराज गादीवर आले. नारायण रावांचे भाऊ काका महाराजांनी थेऊरला तपश्चर्या करून स्वतंत्र चिंतामणीची प्राप्ती करून घेतली; थेऊरची यात्रा सुरू केली. नारायण महाराज एका भाद्रपदी यात्रेत जेजुरीजवळच्या घोडेउड्डाण समोर कोथळ्याच्या देसाई पाटलांकडे उतरले होते. महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांची कोथळ्याला समाधी आहे.
नारायण महाराज राजगुरू होते. त्यांच्या काळात चिंचवड संस्थान श्रीमंत झाले. चिंचवड, वाकड, औंध, माण, चिखली, चऱ्होली, पिरंगुट इत्यादी गावे, कित्येक गावांच्या जमिनी, अनेक ठिकाणची देशमुखी, जकाती यांसारखी उत्पन्नाची साधने संस्थानास मिळाली. चिंचवडला येणाऱ्या मालाला जकात माफ असे. नारायण महाराजांनी 1719 च्या भाद्रपद शुद्ध सप्तमीला देह ठेवला.
नारायण महाराजांचा थोरला मुलगा चिंतामणी याने 1741 पर्यंत संस्थानचा कारभार पाहिला. त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे चिमाजी अप्पांचा वसईचा वेढा. हिंदू बांधवांची फिरंग्यांच्या छळातून सुटका करण्यासाठी चिंतामणी महाराजांनी पेशव्यांकडे आग्रह धरला, त्या मोहिमेला लागणाऱ्या खर्चासाठी दहा हजार रुपये कर्जही दिले. महाराजांचा भक्त गंगोजी नाईक अणजूरकर पठारे प्रभू त्या मोहिमेत होता. महाराजांनी दिलेली गणपतीची मूर्ती अणजूरला नाईकांच्या माडीत आहे. चिमाजी अप्पा 1739 च्या मोहिमेचा विजय साजरा करण्यासाठी पुण्याला जाण्याआधी चिंचवडला थांबले. त्यांनी वसईतून आणलेल्या मोठ्या घंटा चिंचवड, मोरगाव, सिद्धटेक आणि थेऊर या ठिकाणी आहेत.
चिंतामणी महाराजांचा थोरला मुलगा धरणीधर महाराज. त्यांची मोरयाचे वरदायक, साक्षात्कारी संत म्हणून ख्याती होती. धरणीधर महाराजांची गणेशभक्तीची अनेक पदे प्रसिद्ध आहेत.
पेशव्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटत असे. यात्रेच्या वेळी पेशवे स्वत: गणेशखिंडीत पालखीला सामोरे जात, त्यांचे स्वागत करत असत. यात्रेला शिधाशिबंदी देऊन, महाराजांचा आशीर्वाद घेऊन, पालखीबरोबर चार पावले चालून मंगलमूर्तीला निरोप देत असत. त्यांच्या काळात चिंचवडला टांकसाळ आली. टांकसाळीचा फायदा अन्नछत्रात वापरला जाऊ लागला. टांकसाळ इंग्रजी राज्य येईपर्यंत चालू होती.



चिंचवड, मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक या देवस्थानांची व्यवस्था चिंचवड देवस्थानामधून होते. सर्वत्र त्रिकाळ पूजा, नैवेद्य, नंदादीप यांची व्यवस्था असते. चिंचवडला अन्नछत्र व वेदपाठशाळा चालू आहे. तसेच, एक ग्रंथालय व देवस्थानच्या पुढाकाराने चालू झालेले मोरया हॉस्पिटल आहे. माघ व भाद्रपद महिन्यांत दोन मोठ्या यात्रा असतात. श्री मोरया गोसावी त्यांना प्राप्त झालेल्या मंगलमूर्तीसहित वाजत-गाजत मोरगावला जातात. माघात थेऊर, सिद्धटेकलाही जातात. येताना जेजुरीला खंडोबा, शिवरीला यमाई, पुण्याला कसबा गणपती आणि जोगेश्वरी यांचे दर्शन घेतात. देवांची भेट होते, पालखीचे ठिकठिकाणी स्वागत होते. मिरवणूक निघते. श्री मोरया गोसावी यांच्या पुण्यतिथीचा चार दिवसांचा भव्य सोहळा मार्गशीर्ष वद्य षष्ठीला होतो. नामवंत कलाकारांची कीर्तने, प्रवचने, गायन-वादन, सत्कार समारंभ होत असतात. मोठ्या प्रमाणावर अन्नदान होते. इतर सत्पुरुषांच्याही पुण्यतिथी साजऱ्या होतात. देवापुढे गायनाचे कार्यक्रम रोज सकाळी व संध्याकाळी होतात. इतर अनेक कार्यक्रम वर्षभर चालू असतात.

माहिती : संग्रहित 

June 6, 2017

' अंगारकी चतुर्थी व्रतकथा' - मंगळ असणा-यांसाठी

ज्यांना मंगळ  आहे  ( दोष आहे असे  म्हणणार नाही )  त्यांनी  अंगारकी चतुर्थीचे व्रत अवश्य करावे . आपल्या शास्त्रात अशा अनेक गोष्टी  लिहून ठेवल्या आहेत. फक्त विश्वास पाहिजे 



येत्या १३ जूनला अंगारकी चतुर्थी आहे 
ज्यांना ' अंगारकी चतुर्थी व्रतकथा'  पुस्तक हवे असेल ( पीडीएफ फाईल )  त्यांनी अवश्य ईमेल करा 
a.kelkar9@gmail.com


June 5, 2017

सुदंर ते ध्यान

कर  कटावरी ठेवूनिया  ! 


 

GSLV - मार्क ३ ला शुभेच्छा 


May 25, 2017

संक्षिप्त शनिमाहात्म्य

शनैश्चर जयंती निमित्य शनि भक्तांसाठी ' संक्षिप्त शनिमाहात्म्य ' 🌺🌼🌸
  ( श्लोक १ ते ९१)

ॐ नमोजी गणनायका। सरस्वती सिध्दीदायिका। 
गुरु संत श्रोते पाठका। अखिलांसी नमो नम : ।१

मुळ कथा गुर्जर भाषेची। नवग्रहांच्या श्रेष्ठत्वाची।
 आणि महाराजी विक्रमांची। उज्जायिनी नगरिच्या।२

एके दिवशी प्रभातकाळी। नवग्रहांची चर्चा रंगली।
 पंडितांनी महती वर्णली। स्वबुध्दीपरत्वे सभेमाजी।३

राजा विक्रमाने प्रश्ण केला।ग्रहश्रेष्ठत्वाचा द्या दाखला।
सांगुन स्थिती-गतीमतिला।रुप पूजा वर्णावी।४

एकाच्या मते रवि महान ।दुजा म्हणे चंद्रमा गहन।
तिस-याचे निश्चित वचन। मंगळ वरिष्ठ मानावा।५

चौथा म्हणे बुध बळवंत।गुरु श्रेष्ठ पाचव्याचे मत।
शुक्राचा महिमा त्रिलोकात। सांगे विद्वान सहावा।६

पुढे राहू - केतू कथिला। अंती एकजण उटीला। 
शनि श्रेष्ठत्व सांगू लागला। साकल्ये करोन।७

तो म्हणे शनि सर्वश्रेष्ठ। बलाढ्य एवं कोपिष्ठ। 
करितो कोणासही भ्रष्ट। दृष्टि चमत्कारे ।८

भाविकांचे करितो रक्षण। दुर्जनास टाकतो ठेचून। 
जातीचा तेली पंगू चरण। कृष्ण वर्णी आहे जो.।९

काळभैरव त्याचे दैवत। जयावरी करी दृष्टीपात। 
करितो नामशेष उदध्वस्त। जीवन तो त्या जीवांचे।१०

रविराजाचा पुत्र शनि। पाहे पिता जन्मताक्षणी।
 उठतो कष्ट देही झणी। पित्याच्या सर्वांगी.। ११

पितृरथीचां सारथी। पांगुळा झाला निश्चिती।
अश्वांचिया नेत्रापती। आले पूर्ण अंधत्व।१२

थकले उपाय अनंत। जाहले धन्वंतरी त्रस्त। 
कृपा दृष्टी होता समस्त। आरोग्य पावले। १३

हे  ऐकोनी राजा विक्रम। हसून बोलला सप्रेम। 
हा नाही सुपुत्राचा धर्म। जनकास छळण्याचा। १४

या समयी यानी बसोनी। चालले होते क्रोधी शनी। 
विक्रमाचे वचन ऐकोनी। तत्काळ सभेसी पातले। १५

राजा अश्चर्यचकित जाहला। शनिचरणी प्रसादा धावला। 
परी शनिश्चरे अव्हेरिला। कठोर वाक् ताडनाने।१६

यमग्राज म्हणे रे वाचाळा। निंदका खळा मस्त टवाळा। 
कन्याराशी आलो तुझ्या मुळा। करीन मी गर्वहरण। १७

राजा झाला नतमस्तक। हरपला त्याचा विवेक। 
शनिदेव दावोनि धाक। सत्वर विमानकंपनीची बैसले। १८

खिन्नवदने सभा भंगली I राजा विक्रमास ग्लानी  आली I
मानसी कृष्णछाया दाटली I अंतरंगी सर्वांच्या  I  १९
एक मास उलटून गेला I  विक्रमा बारावा शनी आला I
सर्वत्र हाहाकार माजला I अभाविक गांजले I २०
या समयी पंडिता सांगती  I शनैश्चर पूजन पध्द्ती  I
आग्रहे विक्रमास म्हणती  I व्रतपालन असे करावे  I २१
प्रथम करावे अभ्यगस्नान  I मग करावे एकाग्रचितंन I
अश्वनाल प्रतिमेचे  जून पूजन I करावे विधीवत I २२
मृत्तिकेचा कुंभ स्थापावा I तयावरी नाल ठेवावा I
तेलअभिषेक करावा I काळी फुले व्हावी I २३
उडीद मीठ शनीस अर्पावे I सत्पात्रा-सोने-लोह-नील द्यावे I
वा काळे घोगडें दान करावे I किंवा अन्न -गुळ -तेल I २४
निलाजनं समाभासम रवी पुत्रम यमाग्रजम I
छाया मार्तंड संभुतं तन्नमामी शनैश्चरम I २५
हा जप करावा तेवीस सहस्त्र I प्रतिवारी वाचावे शनीस्तोत्र I
संतुष्ट करावे धार्मिक सत्पात्र I एकभुक्त रहावे शनिवारी I २६
राजाने उपदेश ऐकिला I अंतरी फार कष्टी जाहला I
शनी कृपेवरी विसंबला I उदास होऊन I २७
पुढे एक दिनी दोन प्रहरी I व्यापारी सौदागर आला नगरी I
घोडे विकावया आणिले भारी I त्याने बहुलक्षणी I २८
राजाही मैदानी प्रवेशाला I अभ्यास पाहून हरकला I
एका वारूवरी स्वार झाला I स्वतः च परीक्षा करावया I २९
आरूढ नृप  दृष्टीआड झाला I तुरंग तात्काल  गगनी उडाला I
निबीड दरी जाऊन उतरला I आणि जाहला अदृश्य I३०
सौदागर वेशी शनीने I शोधावया लावली राने I
न मिळे राजा म्हणोनी त्याने I केला पैका वसुल I ३१
राव चिंताग्रस्त घोर रानी I पश्चिमेस बुडे दिनमणी I
धरती ग्रासतसे रजनी I तेव्हा तो तेथेच विसावला I ३२
रात्र सारे पसरे रवितमा I पाऊले नेती राजा विक्रमा I
पोहोचला तामलिंदा ग्रामा I अंत्यत थकून भागून I ३३
त्या नगरी एक वैश्य होता I ज्याची अग्नीत मालमत्ता I
त्याची अलौकिका नामे दुहिता I इच्छांवर शोधतसे I ३४
त्या धनिके देखाला अतिथी I राजलक्षणे मदनाकृती I
नाम ग्रामादि घेई माहिती I आणि सुस्वागत करितसे I ३५
विसावला वैश्यगृही विक्रम I आवरी नित्यनैमित्यिक कर्म I
सेविली पंचपक्वांन्नी उत्तम I अति आग्रह अत्यादरे I ३६
उज्जयिनी स्वामीस कन्या द्यावी I असा हेतू धरोनी मनोभावी I
ही सुवर्ण संधी न दवडावी I एवं कथिले दुहितसे I ३७
लाडक्या पुत्रीच्या इच्छेनुसार I सावकारे धाडीला नृपवर I
पार्कही युक्ती उपवर I राजास शयनमंदिरी I ३८
पथिक निद्रागृही प्रवेशला I पाही सुशोभित रंगमहाल I
शृगांर साधने नटविलेला I नवदांपत्यासाठी I ३९
विक्रम मनी संशय उपजला I  कोणे हेतू रसरंग सजविला I
सावकारे पाठविले येथे मला I कोणत्या कारणे I ४०
नृपती सावधान अंतरी I गाढ निद्रेचे सॉंग पांघरी I
इतक्यात पावली सुन्दरी I सोळा शृगार करून I ४१
अलौकिक भाषण चतुर I यौवन शिखरी उपवर I
मधुमीलना झाली आतुर I ऐतदर्थ  पुरुषा जागवी I ४२
इशारे करून थकली I रंभा निद्राधीन झाली I
सन्मुख दृश्ये थरारली I चित्तवृत्ती राजाची I ४३
भित्ती चित्रातील हंसांने I उड्डाण करोनि लीलेने I
हाराची मौत्यें चचुने I भक्षण केली सत्वर I ४४
मदनिका जागी झाली I प्रेमभंगे संतापलेली I
खुंटीवरी पाहो लागली I ठेवलेला मौक्तिक हार I ४५
भूमीवरी करोनी पद प्रहार I म्हणे अरसिका देई माझा हार I
 आणि आपुल्या पंथे जावे सत्वर I कृष्णमुख घेवोनि I ४६
परी  तो उत्तरे हार लाभला नाही I ऐकून कोपली  लवलाही I
जनका सांगे तुम्ही स्वगृही I शर्विलक आणला I ४७
सावकार अविचारे पेटला I नृपा वाक्ताडन करू लागला I
सेवकी निर्दयपणे ताडिला I हारप्राप्तीसाठी I ४८
मारमारून चाकर थकले Iराजदरबारी घेऊन गेले I
चंद्रसेन राजाने ऐकिले I सर्व कथन वैश्याचे I ४९
चंद्रसेने  पथिका आज्ञा केली I मुक्ताहार डावी याच पाउली I
नहून सांभाळी त्वचा आपली I चौर्यकर्म शिक्षा म्हणून I ५०
विक्रम सांगे वास्तविकता I राजा कोपे कथा न ऐकिता I
आणि दूता म्हणे तोडा आता I हातपाय याचे सत्वरी I ५१
हस्तपादरहित शरिर। भुमिशैय्या निलाकाशावर। जलासाठी तळमळे फार। तुषार्त राजा विक्रम। ५२
या घटनेस उलटला मास। सोशी अनंत व्यथा प्रार्थीप्रहार। दयार्द्र शनिने चंद्रसेनास। द्रवविले अन्नोदक देण्या। ५३
अन्नोदक मिळतसे विक्रमा। मनी स्मरे तो उज्ज्ययिनी महिमा। एके दिनी दिसे स्नुषा उत्तमा। तेलीयाची त्या मार्गी।५४
तिचे माहेर नगरी उज्जयिनी।शश्वुर गृहासी जातसे कामिनी। खंडीत देही नृपास ओळखोनी। व्यथित मने थांबली। ५५
परस्परांच्या संभाषणातून। अघटीत घडलेले जाणून। आधरे भरपाई यानी बैसवून। आणिले तिने स्वगृही। ५६
तया ठका पाहोनी शश्वुर। राज भये कांपे थरथर। हा विक्रम राजा नरवर। स्नुषा सांगे निश्चये.। ५७
ऐकोनी दावे चंद्रसेनाकडे। म्हणे आणू कां तस्कर बा पुढे। अनाथा पाहोनि ह्दय रडे। माझे धर्मबुध्दीने। ५८
भक्तीचा हुंकार ऐकोनी। तेलकट परतला तिष्ठत मनी। चौरंगी बसोनि हाके घाणीं। सांगे विक्रम राजाला। ५९
चंद्रसूर्य उगवतो मावळती। सप्त संवत्सरे उलटून जाती। लीलया दीपराग स्वर स्फुरती। एकदा विक्रम कंठातून। ६०
अहो तो सायंकाळ शुभसमय। पेटवून लक्ष ओळी दीप वलय। उचंबळे राजकन्येचे हृदय। जाज्वल्य संगीत ऐकोनी। ६१
चंद्रसेन कन्या पद्मसेना। पाठवी शोधावया दासींना। तया पुरुषासी झणी आणा। पतीरुपे पुजीन मी। ६२
एकस्तंभाच्या राजमहाली। रंगती संगिताच्या मैफली। तेल्याघरची सेवा संपली। येथे विक्रम राजाची। ६३
रागरंग ऐकोन निशीदिनी। चंद्रसेन म्हणे यावे पाहोनी। उधळतो रंग कोणे करणी। कन्येच्या प्रासादी। ६४
दासी म्हणती हे राजराजेश्वर। आम्हास न कळे कन्येचे अंतर। बोले राजन समजेल प्रकार। आणि निद्राधीन जाहला। ६५
इकडे विक्रममन चिंताग्रस्त। केव्हा उज्जायिनी होईल प्राप्त। त्याचवेळी शनिदेव अकस्मात। दिसले साडेसात वर्षांनी.।६६
शनीदर्शने विक्रम हरपला। प्रणाम करण्या पुढे सरकला। विनवी न छळे मानवाला। अति असह्य होतसे। ६७
उत्तरी ग्रहस्वामी बोलले। मी अनेक गर्विष्ठां छळिले। गुरुग्रहा सुळापाशी नेले। अभिमान करताच.।६८
म्या भिवविले शिवशंकरा। धाडी वनी राजा रामचंद्रा। पाठविली सिता लंकापुरी। दशानन मारिला। ६९
कौशिके छळीले हरिश्चंद्रा। पिडीली दमयंती सुंदरा। भगें पडली  इंद्रशरीरास। कलंकीत झाला चंद्रमा।७०
आणि माझी दृष्टी पडता।क्षय झाला वशिष्ठपुत्रा। केली पराशरे भ्रष्टता। मस्यगंधे कारणे। ७१
श्रीकृष्ण कौरव पांडव। कितीतरी देव दानव। त्रासिले मी महामानव। एकाच दृष्टिक्षेपात.। ७२
विक्रम विनवू ग्रहश्रेष्ठा। न देई मानवा  देहाला कष्टा। नको नकोत हाल अपेष्टा। कोणाही प्राणीमात्रास.।७३
शनैश्वरे ठेविले वरदहस्त। नृप झाला दिव्यदेही पुर्ववत। म्हणे नाही छळणार मी समस्त। व्रतधारक मानवा। ७४
शनिदेव गेले निजस्थानास। चंद्रसेन आला कन्या गृहास। पाही सन्मुख तेजस्वी नरास। जणु मदन अवतरला। ७५
चंद्रसेन विचारी विनयप्रभावे। महाराज आपण कोण वदावे। कोणता देश नामगोत्र सांगावे। कोणत्या प्रयोजने या स्थानी। ७६
विक्रम हासून उद्गारला। तुम्ही होता जो तस्कर दंडिला। बोलवावे श्रीपती वैश्याला। मज ओळखण्यासाठी। ७७
ऐक माझे नामगोत्रादि आता। मी असे उज्जायिनी भाग्यविधाता। क्षत्रिय कुलीन जनीन पिता नाम माझे विक्रम। ७८
ऐकोनी घालतसे दंडवत। म्हणे केवढा घडला अनर्थ।
कोणते महत्तम प्रायश्चित्त।  घ्यावे मी चंद्रसेनाने। ७९
अहो महासमर्था दंडक पामरा। कोणत्या शासने तयाचा उध्दार। क्षमा मागण्या निरलस अधिकार। गहन गती कर्माची। ८०
यावरून विक्रम सांत्वन करी। राजन चंद्रसेना अवधारी। शनीची कृपा झाली आम्हावरी। म्हणोनि घडले अघटित हे.। ८१
चंद्रसेन पाचारी सावकार। हस्त जोडीने आला सामोरा। खिन्नवदने करी मुजरा। आर्जवी स्वगृही चलण्यास। ८२
मनी ना ये विक्रमाच्या। सार्वभौम नृपतीच्या। चंद्रसेन वैश्य आघवे। दास आणि पौरजन.। ८३
प्रवेशले अलौकिकेच्या मंदिरी। चित्रीचा हंस होता निर्जीव जरी। उगाळी मोतीहार सर्वांसमोरी। स्वमुखातून लीलेने।८४
सकळजण आश्चर्य पावले । म्हणती श्रेष्ठा दूषणे लाविले। शनिच्या अवकृपेने सोसले। भोग साडेसात वर्ष। ८५
असे पद्मसेना राजकन्या। आणि अलौकिका रुपांगना। अर्पिती विक्रमाच्या चरणा। जीवन सर्वस्व आपुले । ८६
चंद्रसेन आणि सावकार। विवाही ओतती  भारंभार। मोत्ये, पोवळी, रत्नें अपार।
जामाता तुष्ट कराया। ८७
राजा विक्रम त्या तेलियास। देतसे एक संपन्न देश। आणि दाने देई याचकांस। सर्वांच्या इच्छा पूर्ण करी.।८८
पुढे आजन्म शनिव्रत। पाळी विक्रम सज्ज नीत। श्रोते हो तुम्हीही समस्त। शनिव्रत आचरावे.।८९
तात्याजी महिपतीची मुळकथा। शनिदेवचरणी ठेवोनी माथा। संक्षिप्तरुपे निवेदिली तत्वता। सर्वांच्या कल्याणासाठी.।९०
द्विजवंशी जिचा जनक। ती संक्षेपी हे कथानक। सुखी व्हावा हा तिहीलोक।
*शनैश्वरार्पणमस्तु* ।।९१
इति श्री शनैश्वर माहात्म्य समपूर्णम्
। शनिमहाराज की जय ।
-----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो 🙏🏼🌺

May 23, 2017

भविष्याच्या अंतरंगात भाग - ६( शनि महिमा)

येत्या गुरूवारी शनी जयंती आहे. प्रस्तृत लेखनमालेत या निमित्ताने *झुंजार शनी*( लेखक : पद्माकर जोशी) व *शनि महिमा* ( लेखिका: वसुधा वाघ) यांच्या पुस्तकातील संकलित माहिती देत आहे. झुंजार शनी या पुस्तकात लेखकाने सर्व जोतिषांसाठी एक सुरेख विवेचन लिहिले आहे. ते म्हणतात, ' 

जोतिषशास्त्र हे मनोरंजक असून भविष्याचे ज्ञान समजावून देणारे म्हणजे ईश्वराच्या अगदी जवळचे शास्त्र आहे. जितके हे शास्त्र सुगम व पवित्र आहे तितकेच हे शास्त्र जो शिकेल त्याला अपवित्र करणारे आहे. याचे कारण नकळत त्याला गर्व येतो आणि गर्वाचे घर नेहमी खालीच असते. म्हणून कुणाचे ही वर्म दुस-यास सांगू नका. एखाद्याच्या कुंडलीचा व्यवहारात उपयोग करु नका, नाहीतर तुमचे भाग्य नष्ट होईल, तुमच्या वाणिचे तेज नष्ट होईल.

 खूपच छान विचार आहेत हे.🏻 आणि सर्व जोतिषांना याचा नक्की फायदा होईल

 शनी संबंधि काही ठळक सिध्दांत देताना लेखक म्हणतात

 १) शनी समोर रवी प्रथम स्थानी असेल तर बाप लेकाचे पटत नाही २)शनी समोर रवी जर धन स्थानात असेल तर नेत्रदोष, अंधत्व येते ३) शनी समोर रवी तृतीयात असेल तर भावंडांबाबतीत एखादी वाईट घटना घडू शकते ४) शनी समोर बुध लाभात असेल तर परदेशात फायदा होतो 

 *शनी महिमा* या वसुधा वाघ यांच्या पुस्तकातही अनेक गोष्टींची विस्तृत माहिती आहे.यात त्यांनी एका वेगळ्या प्रकारे पत्रिकेतील प्रत्तेक स्थानात शनी असता व्यक्तीचे जीवन कसे असते हे समजावून सांगितले आहे 

 प्रथम स्थानात शनी - त्या व्यक्तीचे जीवन चारुदत्ता सारखे असते

 शनी द्वितीयस्थानात - धुतराष्ट्राचे जीवन वाट्याला येते

 तृतीय स्थानात - द्रोणाचार्य 

चतुर्थात शनि - गांधारीचे जीवन 

पंचमात शनी - उर्मिला

 षष्ठात शनी - पंडू राजा ( निरोगी आयुष्य कमी)

 सप्तमात शनि, - अंबे सारखे जीवन वाट्याला येते 

अष्टमात शनि - भीष्म 

नवमात शनि - दुर्योधन 

दशमात शनि - श्रीकृष्ण ( चकीत करणारे जीवन)

 लाभात शनि - कर्ण 

व्ययात शनी - पांडव 

 शनिच्या प्रसन्नतेसाठी हनुमानकवच, हनुमान चालीसा, शनी महात्म्य अवश्य वाचावे. शनिच्या देवळात जाऊन मनोभावे प्रार्थना करुन दर्शन घ्यावे.

 निलांजन समाभासं रवीपुत्रं यमाग्रजं

 छायामार्तंड संभूतं त्वं नमामिम् शनैश्चरम् !! 

( नीलवर्ण व अंजनाप्रमाणे कृष्ण कांती असलेला, सूर्याचा पुत्र, यमाचा अग्रज तसेच छाया व आदित्य यांच्यापासून जन्मलेला जो शनैश्चर त्याला माझा नमस्कार  असो) 

 सदर संकलन शनिचरणी अर्पण 

May 21, 2017

भविष्याच्या अंतरंगात भाग ५



डॉ श. म .साठ्ये  यांच्या आरोग्य कुडंली  या पुस्तकातील काही उपयुक्त माहिती देत असताना या भागात पाहूया, षष्ठ स्थानात  सिंह, कन्या , तुळ, वृश्चिक रास असता घ्यावयाची काळजी
👇🏻

*सिंह रास* : - ही राशी उष्ण आहे.

जर या राशीत  बुध  असेल तर अतीशय अभ्यास त्रासदायक होऊ शकतो

शुक्र असेल तर कपड्यातील अनियमित पणा धोकादायक ठरतो

मंगळ  असेल तर घाई व भावनांचा क्षोभ टाळावा

गुरु असेल तर आहारातील अनियमितपणा आणी अतियोग टाळावा

शनी असता खुप शारिरिक श्रम टाळावेत

नेपच्यून असता चुकीची औषधे घेत नाही ना हे पहावे

*कन्या रास* - ही राशी पचनाशी संबंधित आहे

या राशीत बुध  असता  मानसिक ताण टाळून नियमित सवयी लावून घेतल्या पाहिजेत

या राशीतील शुक्र अयोग्य खाण्याकडे कल दर्शवतो

मंगळ असता पोषण अयोग्य असते

गुरु असता आहाराच्या अतीयोगापासीन जपावे

शनी असता मल प्रवृत्ती साफ राहील याची दक्षता घ्यावी

युरेनस - घाईघाईने जेवण टाळावे

*तूळ रास* : ही उबदार राशी आहे

या राशीत बुध असता - खुप वेळ उभा राहणे, उभे राहून अभ्यास करणे टाळावे

शुक्र असता गोड पदार्थ जास्त खाऊ नयेत

मंगळ असता सांसर्गीक रोगापासून स्वतः:चे रक्षण करावे

गुरु असता : उच्च दर्जाची राहणी आजाराला कारणीभूत होते

शनी असता : थंडी पासून कमरेला जपावे

नेपच्युन असता अतिप्रमाणात औषध घेण्यापासून काळजी घ्यावी

*वृश्चिक रास*

या राशीत बुध असता सर्वप्रकारचा निष्काळजीपणा आणी विसराळूपणा याबाबत दक्ष राहिले पाहिजे

शुक्र असता: नैतिकता जपावी

मंगळ असता : जननेंद्रियांचे रोग होण्याची शक्यता

गुरु असता चरबीयुक्त खाणे यामुळे विकार दर्शवतो

शनि असता, बेताचेच थंड पदार्थ सेवन करावे

पुढील भागात - धनु, मकर, कुंभ, मीन राशीबद्दल



For blog article on whatsapp contact on 9819830770

May 19, 2017

भविष्याच्या अंतरंगात - भाग ४



डॉ श म साठ्ये  यांच्या आरोग्य कुडंली  या पुस्तकातील काही उपयुक्त माहिती सध्या आपण वाचत आहोत . षष्ठ स्थानात मेष राशीत काही ग्रह असताना  काय काळजी घ्यायची हे आपण पाहिले . या भागात आपण वृषभ, मिथुन , कर्क या राशी बद्दल  माहिती  घेऊ

तत्पूर्वी  एक गोष्ट नमूद करावीशी वाटते . या पुस्तकाचे लेखक  स्वतः: डॉक्टर आहेत .
व्यवसायाने   प्रतिथयश डॉक्टर असूनही  अनेकांना जोतिषशास्त्र अवगत होते किंबहुना  वेळोवेळी शस्त्रक्रिया वगैरेंच्या आधी  हे डाँक्टर आवर्जून  या शास्त्राची मदत घेत असत . याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबइचे स्त्रीरोगतद्न्य डॉ  पुरंदरे . यांच्या कार्याविषयी परत केव्हातरी .  पण उठसुठ हे शास्त्र  म्हणजे  फेकाफेकी आहे असे मानणारे अनेक डाँक्टर  दवाखान्याची , स्वतः: च्या घराची अगदी विधीवत वास्तुशांत करण्यासाठी मुहूर्त वगैरे पाहताना  दिसून आले आहेत . असो ..

षष्ठात   वृषभ, मिथुन , कर्क रास असताना घ्यावयाची काळजी 👇🏻

*वृषभ रास* : - ही राशी रुक्ष आणि थंड आहे.

जर या राशीत  बुध  असेल तर आवाजाचा वापर जपून करावा मोठ्यांदा बोलणे टाळावे .

शुक्र असेल तर मानेचे संरक्षण करावे

मंगळ  असेल तर स्वरयंत्रावर त्राण येणार नाही याची काळजी घ्यावी

गुरु असेल तर सर्वच बाबतीत ' अति 'वर्ज्य करावे

शनी असता मान व घसा याचे योग्य त-हेने विशेषतः थंडी पासून रक्षण करावे

*मिथुन रास* - ही राशी मज्जासंस्थेला  बिघडवते

या राशीत बुध  असता  फुफुस्साच्या आरोग्यासंबंधी काही व्यायाम घेतला पाहिजे

शुक्र असता रक्त चागले राहील याची काळजी घ्यावी

मंगळ असता घशाच्या विकाराची तत्पर चिकित्सा करावी

गुरु असता अन्नातील अनियमित पणा त्रासदायक ठरू शकतो

शनी असता श्वसनाचा  व्यायाम ( प्राणायाम , योग्य ) अवश्य करावा

युरेनस - मज्जासंस्थेवरील ताण टाळावा

*कर्क रास* : या राशीचा परिणाम अन्नपचनाशी संबधीत अवयव व मन यावर होतो

या राशीत बुध असता - अनावश्यक चिंता टाळाव्यात

शुक्र असता आहारातील अनियमितता टाळावी

मंगळ असता सांसर्गीक रोगापासून स्वतः:चे रक्षण करावे

गुरु असता : खाण्यातील अतिरेक टाळावा

शनी असता : आहारात जास्त थंड पदार्थ घेऊ नयेत

क्रमश:
पुढील भागात - सिंह , कन्या , तुळ, वृश्चिक राशीबद्दल


For blog article on whatsapp contact on 9819830770

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या