February 26, 2015

‘श्रीगुरुचरित्राचं’ लेखनस्थान : कडगंची


‘श्रीगुरुचरित्राचं’ लेखनस्थान : कडगंची


(श्री Sameer Anil Thite यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार)

 . श्रीगुरुदेव दत्त!
कडगंची, श्रीदत्तात्रेयांच्या भक्तांसाठी वेदसम असलेल्या श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थळ! कर्नाटक राज्यातील आळंद-गुलबर्गा मार्गावर असलेलं सुमारे १०,००० च्या आसपास लोकसंख्या असलेलं एक काहीसं अज्ञात आणि दुर्लक्षित खेडं! श्रीदत्तात्रेयपंथात वेदतुल्य असलेल्या 'श्रीगुरुचरित्र' या श्रीदत्तप्रभूंच्या द्वितियावताराचं, ज्यांना भक्तगण अत्यादरानं ‘श्रीगुरु’ म्हणतात अर्थात् श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीमहाराजांचं, अलौकिक चरित्रवर्णन करणा-या दैवीग्रंथाचं लेखनस्थान असल्यानं या परमपावन स्थानी प्रत्येक दत्तभक्तानं माथा टेकवण्यासाठी आवर्जून जायला हवं.
श्रीगुरुंचा कालावधी हा इ.स. १३७८ ते इ.स. १४५८ मानला जातो. बाळसरस्वती, कृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, माधवसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतिसरस्वती आणि सिद्धसरस्वती असे श्रीगुरुंचे मुख्य ७ संन्यासी शिष्य होते. या बरोबरच संसार करुनही श्रीगुरुंना निरंतर समर्पण भावानं पूजणारे अनेक संसारीजनही श्रीगुरुंचे शिष्य होते. या संसारी शिष्यांत श्रीगुरुंचे अंतरंग शिष्य होते श्री. सायंदेव साखरे, अर्थात् श्रीगुरुचरित्रकार श्री. सरस्वती गंगाधरांचे खापर पणजोबा, जे कडगंची या मूळ गावी राहून वासरब्रह्मेश्वर (आज आंध्रप्रदेशात असलेलं बासर! या ठिकाणी सरस्वतीमंदिर आहे.) या ठिकाणी अधिकारी म्हणून तत्कालीन यवनराजाच्या पदरी कार्यरत होते. श्री. सायंदेव-नागनाथ-देवराव-गंगाधर आणि सरस्वती (श्रीगुरुचरित्राचे लेखक) असा हा श्री. सायंदेव साखरे घराण्याचा वंशविस्तार आहे.
श्री. सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायातच ३८ व्या ओवीत 'भाषा न ये महाराष्ट्र्' असा उल्लेख करुन स्वतःला मराठी भाषा येत नसल्याचं सांगून, केवळ श्रीगुरुंच्या दैवी कृपेनंच आपण हा एवढा महान आणि काव्यात्मक ग्रंथ मराठीत लिहू शकलो हे पुनःपुन्हा कथन केलं आहे. सर्वसाधारणपणे राज्यकर्त्यांची भाषा जनमानसात रुजत जाते असा आजवरच्या इतिहासाचा निर्वाळा आहे. मराठी बोलताना आजही आपण त्यात किती इंग्रजी शब्द वापरतो, हे पाहिल्यास याचं अनुमान करता येऊ शकेल. मात्र ज्याची मातृभाषा कानडी आहे, त्यानं मराठीत एवढा काव्यमय ग्रंथ लिहिणं आणि त्यातही ७५९५ ओव्यांमधे एकही यावनी शब्द नसणं हे पहाता श्री. सरस्वती गंगाधरांवर श्रीगुरुंचा अखंड वरदहस्त होता हेच काय ते निर्विवाद सत्य आहे. श्री. सायंदेवांच्या भाग्याचं थोरपण वर्णन करण्यास तर शब्दसंपदाही अपूरी आहे. यवनराज्यात नोकरी करुनही अनन्यभावे श्रीगुरूंच्या श्रीचरणी त्यांची अव्यभिचारी निष्ठा होती. श्रीगुरुंच्या संपर्कात आल्यानंतर, त्यांच्याच आज्ञेनं त्यांनी यवनाची चाकरी सोडली आणि पूर्णवेळ श्रीगुरुसान्निध्यात ते राहू लागले.
श्री. सरस्वती गंगाधरांना ‘श्रीगुरुचरित्र’ श्रीसिद्धसरस्वतींनी कथन केलं. हेच श्रीसिद्धसरस्वती आपण श्रीगुरुंच्या प्रमुख ७ संन्यासी शिष्यांपैकी एक असल्याचं, १३ अध्यायातील २० व्या ओवीत सांगतात. म्हणजेच, श्री. सायंदेवांच्या काळातील श्रीसिद्धसरस्वतींनी, स्वतः येऊन श्री. सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं असाच सर्वसाधारण समज आहे.
परंतु यात दडलेला गूढार्थ पुढ़ीलप्रमाणे आहेः- १०० वर्षांत साधारणतः ४ पिढ्या होऊन जातात. याचाच अर्थ असा की त्यावेळी श्रीसिद्धसरस्वतींचं वय १००हून अधिक असायला हवं. मात्र ‘अवतरणिका’ या नामाभिधानानं प्रसिद्ध झालेल्या, ५२ व्या अध्यायातील १०५वी ओवी 'आपण आपली दावूनि खुणा, गुरुशिष्यरुपे क्रीडसी' याचा सखोल विचार केल्यास श्रीगुरुंनीच, आपलं तत्कालीन अवतारकार्य समाप्तीसाठी कदलीवनात अंतर्धान पावल्यानंतर १०० वर्षानी पुन्हा श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात येऊन आपले परमशिष्य असलेल्या श्री. सायंदेवांचे खापरपणतू श्री. सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं. श्री. सायंदेव आपल्याच घराण्यात, श्री. सरस्वती गंगाधर या रुपानं पुनर्जन्म घेऊन आले आणि त्यांना स्वयम् भगवन् श्रीदत्तात्रेयांनी (श्रीगुरु श्रीनृसिंहसरस्वतींनी) श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात श्रीगुरुचरित्र कथन केलं असं मानलं जातं. स्वतःच्याही नावात 'सरस्वती' असल्यानं श्री. सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरुचरित्रात स्वतःचा उल्लेख 'नामधारक' (श्रीगुरुंच्या 'श्रीनृसिंहसरस्वती' या नावातही 'सरस्वती' असल्यानं) असा केलेला आहे.
कडगंची हे स्थान गुलबर्गा जिल्ह्यात, आळंद तालुक्यात आळंद-गुलबर्गा मार्गावर आहे. श्री. सायंदेवांचे पुढे वंशज नसल्यानं १९९५ साली, जेंव्हा त्यांच्या कडगंचीतील रहात्या वाडयाचा जीर्णोद्धार करायचं ठरलं, तेंव्हा जुन्या झालेल्या एकेक भिंती पाडण्यास सुरुवात झाली. कार्यात एका ठिकाणी 'करुणा पादुका' आणि नाणीयुक्त कलश आढळला. आजही त्या पादुका कडगंचीस पहावयास मिळतात. खोदकाम करताना माती निघून येण्याऐवजी सुगंधी भस्म येऊ लागलं. त्याचा परिमल मैलो न् मैल पसरला होता. श्रीसिद्धसरस्वतींनी कथन केलेली आणि श्री. सरस्वती गंगाधरहस्ते लिखित, लाल वस्त्रात गुंडाळलेली, पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी आजही याच ठिकाणी गुप्तरुपात आहे. श्रीशैलमल्लिकार्जुनाच्या मागे असलेल्या पाताळगंगेतून, पुष्पांच्या आसनावर बसून कदलीवनात जाण्याआधी श्रीगुरुंनी काठावर उभ्या असलेल्या चार शिष्यांना (ज्यामधे श्री. सायंदेवही होते), "आम्ही पैलतीरावर पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची ४ प्रसादपुष्पं येतील. ती काढून घ्या." अशी आज्ञा दिलेली होती. त्यातील एक शेवंतीपुष्पं श्री. सायंदेवांना लाभलं आणि शेवंतीचं तेच प्रसादपुष्प आजही त्या मूळ हस्तलिखितावर ठेवलेलं आहे. ‘अधिकारी’ दत्तभक्तांना त्याचं दर्शन आजही होतं. कडगंची मंदिराच्या गाभा-यात अधूनमधून येत असलेला अद्वितीय सुगंध हे त्याचंच कारण आहे.
मूळ श्रीगुरुचरित्रात श्री. सरस्वती गंगाधरांनी स्वतः लिहीलेला मंत्रशास्त्राधारित असा एक अध्यायही होता. म्हणजेच मूळ श्रीगुरुचरित्र ५३ अध्यायांचं होतं. मात्र श्रीसिद्धसरस्वतीरुपातील श्रीगुरुंच्या आज्ञेनं त्यांनी तो त्यात समाविष्ट केला नाही. "गायत्री मंत्राचं पुरःश्चरण केलेल्यालाच तो वाचता येईल" असं श्रीसिद्धसरस्वतींनी श्री. सरस्वती गंगाधरांना सांगितलं. या ५३व्या अध्यायाच्या रक्षणार्थ श्रीगुरुंनी एक सर्प आणि 'चंडदुरितखंडनार्थ' असा एक दंड यांचीही व्यवस्था करुन ठेवलेली आहे.
श्री. सायंदेवांच्या कडगंचीतील मूळ वाडयाच्या जागी आज एक सुंदर देऊळ उभारलं आहे आणि आत भगवन् श्रीदत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील नितांत सुंदर मूर्ती, करवीर पिठाच्या श्री. शंकराचार्यांनी २५ फेब्रुवारी २००२ मधे स्थापन केलेली आहे. कर्नाटकातील गदग शहरातील एका मूर्तीकारानं ही मूर्ती घडवली आहे. ‘ही एवढी सुंदर मूर्ती श्रीदत्तप्रभूंनीच माझ्याकडून करुन घेतली आहे’, अशी त्याची श्रद्धा आहे. मूर्ती घडवतानाही त्याच्याकडून केवळ गुरुवारीच काम घडत असे.
खोदकाम सुरु असताना, सन २०१२ मधे, एकावेळेस दोघंजण बसू शकतील अश्या उंचीची, आणि केवळ बसूनच आत प्रवेश करता येईल अशी, आतमधे तेलाचा दिवा बसू शकेल असा कोनाडा असलेली एक गुहाही जमिनीखाली आढळली. याला ६ पाय-या होत्या. हीच श्री. सायंदेवांची ध्यानगुहा आणि याच स्थळी इ.स. १५५८ च्या सुमारास (म्हणजे श्रीगुरूंच्या कदलीवन गमनानंतर सुमारे एका शतकानं), पुन्हा श्रीसिद्धसरस्वतींच्या रुपात येऊन श्रीगुरुंनी परमशिष्य श्री. सायंदेवांचे खापरपणतू श्री. सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र कथन केलं आणि त्यानुसार श्री. सरस्वती गंगाधरांनी ते शब्दबद्ध केलं. मूळच्या ६ पाय-यांपैकी ३ पाय-या अजूनही आहेत. त्याच उतरुन जाऊन, खाली असलेल्या गुहेत बसून साक्षात् श्रीदत्तप्रभूंनी श्री. सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र श्रीसिद्धसरस्वतीरुपात सांगितलं.
या स्थानाचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी श्री. शिवशरणप्पा अत्यंत प्रामाणिकपणानं आणि पोटतिडकीनं प्रयत्नरत आहेत. श्रीगुरुचरित्र पारायणासाठी एका हॉलची उभारणी झालेली आहे. येणा-या भक्तांच्या निवासासाठी खोल्या, अन्नगृह यासारख्या सोयीही आहेत.


या पावन वास्तूची देवता अजूनही वास्तूच्या रक्षणार्थ तिथेच फिरते आहे. श्री. शिवशरणप्पांचे वडील मूळ वास्तूत (जीर्णोद्धार होण्याआधी) दुपारच्या वेळी वामकुक्षीसाठी गेले असता, त्यांनी त्या ठिकाणाचं द्वार बंद करुन घेतलं. आडवे झाले नाही तोच कसल्याश्या आवाजानं ते उठून बसले. पहातात तो शेजारीच केसाळ सर्परुपात या पवित्र स्थानाचा वास्तूपुरुष आलेला होता. नमस्कारासाठी त्यांनी हात जोडले आणि क्षणार्धातच तो वास्तूपुरुष गुप्तही झाला.
श्रीगुरुचरित्राच्या पठणाला श्रीदत्तात्रेयपंथात अत्यंत महत्वाचं आणि अत्यादराचं स्थान आहे. हा वेदसमान ग्रंथ ज्या ठिकाणी जन्मास आला, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीगुरुचरित्राचं लेखन झालेलं आहे अश्या या दुर्लक्षित, अज्ञात परंतु परमपावन स्थानास गाणगापुरी जाणा-या प्रत्येक श्रीदत्तभक्तानं आवर्जून भेट द्यावी.
(संदर्भ - श्रीगुरुचरित्र, श्रीदत्तात्रेयज्ञानकोश, श्री. मधुकर कुलकर्णी यांचा 'श्रीगुरुचरित्रःसर्वांगीण अभ्यास' हा शोधप्रबंध आणि श्री. शिवशरणप्पा यांच्याशी प्रत्यक्ष भेटीत झालेली चर्चा)

February 25, 2015

वाचकांनी दिलेली प्रतिक्रिया

या ब्लॉगच्या नियमित वाचकांनी दिलेली प्रतिक्रिया 

आपणही आपल्या प्रतिक्रिया  अवश्य द्या 
-------------------------------------------------------------------------------














एखाद्या स्तोत्राची पी डी फ फाइल किंवा प्रिंट पाहिजे असल्यास तो धागा सर्व प्रथम उघडावा  त्यानंतर उजव्या बाजूला  print friendly असे बटण  दिसेल. त्यावर  टिचकी मारली असता  ते स्तोत्र  पी डी फ  मध्ये करता येईल किंवा  प्रिंट
घेता येईल 

February 20, 2015

श्री दुर्गासप्तशती सार

|| श्री दुर्गासप्तशती सार ||

या माया मधुकैट्भप्रमथनी या महिषोन्मूलिनी |
या धुम्रेक्षणचंडअमुंड्मथनी या रक्तबीजाशनी |
शक्ती: शुंभनिशुंभ दैत्यदलीनी, या सिद्धीलक्ष्मी: परा |
सा चंडी नवकोटीमूर्तिसहिता मां पातु विश्वेश्वरी ||१||

स्तुता सुरै: पुर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेंद्रेण दिनेषु सेविता |
करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानी भद्राण्यभिहन्तु चापदः ||२||
या सांप्रतं चोद्धतदैत्यतापितैरस्माभिरीषा च सुरैर्नमस्यते |
करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः ||३||
या च स्म्रुता तत्क्षणमेव हन्ति नः सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभि: |
करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः ||४||
सर्वाबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी |
एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ||५||
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||६||
स्रुष्टीस्थितिविनाशाम् शक्तिभूते सनातनी |
गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते ||७||
शरणागतदीनार्त परित्राण परायणे |
सर्वस्यार्तिहरे देवी नारायणी नमोस्तुते ||८||
सर्वस्वरुपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते|
भयेभ्यस्राहि नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते ||९||

मानसिक बळ वाढविण्यासाठी आणि कर्तूत्व सिद्ध करण्यासाठी दुर्गा सप्तशती सार वाचावे. हे वाचल्याने देवी महात्म्य वाचल्याचे फळ मिळते. (शरद उपाध्ये यांच्या 'भक्ति सागर' या पुस्तकातून)

February 19, 2015

आजच्या दिवसाची पत्रिका

आजच्या दिवसाची प्रत्येक लग्नाची पत्रिका 
लग्न -   कालावधी ( वेळ )

कुंभ लग्न :०६. ४९ ते ०८.२६

मीन लग्न : ०८.२६ ते १०.००

मेष लग्न :१०. ते ११.४४

वृषभ  लग्न : ११.४४ ते १३.४३

मिथुन लग्न :१३. ४३ ते १५. ५६

कर्क लग्न : १५. ५६ ते १८.०९

सिंह लग्न : १८.०९ ते २०.१७

कन्या लग्न : २०.१७ ते २२. २४

तुळ  लग्न : २२.२४ ते ००. ३९

वृश्चिक लग्न : ००. ३९ ते ०२.५३

धनू लग्न : ०२.५३ ते ५.००

मकर लग्न : ५.०० ते ०६. ४५



February 16, 2015

महाशिवरात्री

ॐ  नम: शिवाय  

उद्या महाशिवरात्री 

 शिवलीलामृत अध्याय ११ -  इथून  डाउनलोड करून घ्या 




February 13, 2015

समर्थ रामदास नवमी

१३ फेब्रुवारी  - समर्थ रामदास नवमी

सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगापरी
नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी|
साकेताधिपती कपि भगवती, हे देव ज्याचे शिरी
तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी॥


२२ जानेवारी १६८८ माघ वद्य नवमी या दिवशी देहत्याग करण्याचे समर्थांनी मनी ठरविले. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. परंतु जीवनाचे प्रयोजन संपले, असे मानून त्यांनी सज्जनगडावर देहत्याग केला. ही समर्थ समाधी आणि समर्थांचा दासबोध आजही नवजीवन व नवप्रेरणा देणारे आहेत.

माझी काया आणि वाणी
गेली म्हणाल अंत:करणी|
परि मी आहे जगज्जीवनी निरंतर॥

जय जय रघुवीर समर्थ !

समर्थ रामदास स्वामींनी बारा वर्षं तपश्चर्या केली. त्याचवेळी श्रीराम आणि हनुमानानं त्यांना दर्शन दिलं आणि 'कृष्णातीरी जगदुद्धार कर असा आदेश दिला. त्यानंतर रामदासांनी भारतभर पायी भ्रमण केलं. हिंदू जनतेची मनं रामभक्तीकडे वळवून त्यांना दूरवस्थेतून बाहेर काढण्याचं त्यांनी ठरवलं. त्याचबरोबर रामाचा संदेश पोहोचवणारा सर्वश्रेष्ठ दास मारूतीकडच्या बलाची उपासनादेखील लोकांना शिकवावी असंही त्यांनी ठरवलं. त्यासाठी गरज होती लोकसंग्रहाची आणि लोकजागृतीची. म्हणूनच त्यांनी गावोगावी भ्रमण केलं आणि ११ मारुतींची स्थापना केली.

श्रीक्षेत्र शहापूर 

समर्थांच्या अकरा मारुतींपैकी हा मारुती कालानुक्रमे पहिला मानला जातो. शके १५६६ सन १६४५ मध्ये त्याची स्थापना झाली. 

शहापूर हे गाव तेव्हा आदिलशाहीत होतं. तेथील बाजीपंत कुळकर्णी देवभक्त होते. कामात एकदम चोख. समर्थांचा मुक्काम त्यावेळी तिथूनच जवळ असलेल्या चंद्रगिरी डोंगरावर असायचा व ते शहापुरात माधुकरी मागायला यायचे. ते बाजीपंत कुळकर्ण्यांच्या घरासमोर येताच पंतांची पत्नी सतीबाई तणतणत बाहेर यायची ,समर्थांची गोसावडा ्हणून अवहेलना करायची. परंतु एक दिवस कुळकर्ण्यांच्या घरात काहीसं दुःखी वातावरण होतं. कारण गावकीच्या हिशोबावरून बाजीपंतांना मुसलमानांनी पकडून विजापुरास नेले होते. 

सतीबाईंची अवस्था रामदासांना पाहवेना. तेव्हा समर्थ सतीबाईंना म्हणाले , " आजपासून पाचव्या दिवशी बाजीपंत सुखरूप परत आले तर तुम्ही रामनामाचा जप कराल काय ?" सतीबाई म्हणाल्या , " तसे झाले तर एकदाच का हजारदा जप करीन. त्यानंतर रामदास निघून गेले. 

ते कारकुनाच्या वेषात आदिलशहासमोर हजर झाले आणि बाजीपंतांच्या सास-यांनी व पत्नीनं आपल्याला हिशोबसमजावून सांगायला पाठवल्याचं सांगितलं. आपलं नाव त्यांनी दासोपंत सांगितलं आणि अधिका-यांना हिशोब समजावून बाजीपंतांची सुटका केली. बाजीपंतांना काहीच कळायला मार्ग नव्हता. गावाच्या वेशीवर येताच रामदास स्वामी अदृश्य झाले. बाजीपंत घरी आले तेव्हा दासोपंतांची कथा ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. अचानक सतीबाईंना गोसाव्याची आठवण झाली आणि त्याचं दर्शन होईपर्यंत त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला. रामदासांना हे कळताच ते कुळकर्ण्यांच्या घरी गेले. तेव्हा सतीबाईंना त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांनी समर्थांकडून अनुग्रह घेतला. 

एकदा त्या रामदासांच्या दर्शनासाठी एका डोंगरावर गेल्या. रामदास नैवेद्य दाखवत असताना त्यांना मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना प्रखर तेजस्वी हनुमानाची मूर्ती दिसली. ती पाहून सतीबाई मुर्च्छित पडल्या. त्या शुद्धीवर येताच समर्थ म्हणाले तुमच्या थोर पूर्वपुण्याईमुळे तुम्हाला आज मारुतीरायांचे दर्शन घडले. 

त्यानंतर समर्थांनी एक चुन्याची मारूतीची मूर्ती तयार केली व सतीबाईंच्याच गावात एका योग्य ठिकाणी तिची प्रतिष्ठापना केली. तीच ही शहापूरच्या देवळातली मारुतीची मूर्ती. हा मारुतीला शहापूरचा चुन्याचा मारुती 'असंच म्हणतात. मूर्तीचा चेहरा उग्र वाटतो आणि त्याच्या डोक्याला एक गोंड्याची टोपी आहे. येथ चैत्र शुद्ध १५ या तिथीला हनुमानजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. 

श्रीक्षेत्र मसूर 

समर्थांच्या भ्रमणामुळे त्यांच्या रसाळ कीर्तनांमुळे आणि त्यांच्या सिद्धिसामर्थ्यांमुळे त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढतचालला. आपल्या शिष्यांना व आपल्याकडे आकर्षित होणा-या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात परस्परांविषयी आत्मियता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रामजन्माचे व हनुमानजयंतीचे उत्सव सुरू केले. अशा उत्सवांसाठी त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली त्यातलाच एक मसूरचा मारुती होय. मसूर येथील ब्रह्मपुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता. म्हणून या ब्रह्मपुरी भागातच शके १५६७सन १६४६ मध्ये मारुतीची स्थापना केली. हा मारुती मसूरचा मारूती म्हणून ओळखला जातो. त्याला 'महारुद्र हनुमान ही म्हणतात. 

ही मूर्तीसुद्धा चुन्याची आहे. समर्थांच्या अकरा मारुतीत सर्वात देखणी ही मूर्ती आहे. तिची मुद्रा सौम्य प्रसन्न आहे आणि डोक्यावर सुरेख मुकूट आहे. गळ्यातील माळा हार जानवे कटि-मेखला लंगोटाचे काठ हाताची बोटं बारकाव्याने रंगवलेली आहेत. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूला शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची चित्रं काढलेली आहेत. 

समर्थ रामदासांनी या मारूतीची स्थापना केल्यानंतर सतत चार वर्षे येथे रामनवमीचा उत्सव केला. तिथेच समर्थांना कल्याण या शिष्याची प्राप्ती झाली होती. 

चाफळचे मारुती 

समर्थ रामदासांच्या जीवनकार्यात चाफळचे महत्त्व फार मोठे आहे. चाफळचं प्रसिद्ध राममंदिर रामदासांनी शके १५६९ सन १६४८ मध्ये आपले शिष्य व गावकरी यांच्या मदतीने बांधलं. प्रभू रामचंद्रांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे चाफळपासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातील रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली व तिची या देवळात प्रतिष्ठापना केली. पंचवटीचा राम कृष्णेच्या खो-यात आला आणि समर्थ संप्रदायाच्या मुख्य मठाचे स्थान चाफळ हे ठरले. 

अशी आख्यायिका आहे की ज्यावेळी प्रभू रामचंद्रांनी समर्थांना अंगापूरच्या डोहातील मूर्तीविषयी दृष्टान्त दिला त्याच वेळी मारुतीनेही समर्थांना दर्शन देऊन सांगितले की या रामाच्या समोर माझी मूर्ती स्थापन करून तू त्या मूर्तीत प्रवेश कर आणि माझी भीममूर्ती रामाच्या देवळाच्या मागे स्थापन कर. मारुतीच्या या आदेशाप्रमाणे समर्थांनी राममंदिराच्या पुढे हात जोडून उभा असलेला दासमारुती आणि मंदिराच्या मागे प्रतापमारुती अशा दोन मूर्तींची स्थापना शके १५७० सन १६४९ मध्ये केली. 

दासमारुती 

हा श्रीरामाच्या समोर दोन्ही कर जोडोनि उभा आहे. श्रीरामासमोर नम्र हनुमंताची मूर्ती असली पाहिजे म्हणून समर्थांनी सुंदर दगडी मंदिर बांधून त्यात दासमारुतीची स्थापना केली. ही मूर्ती सुमारे सहा फूट उंच आहे. चेह-यावर अत्यंत विनम्र भाव समोर असलेल्या प्रभू श्रीरामाच्या चरणांवर विसावलेले नेत्र अशी ही मूर्ती आहे. तिचे अवयव रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. या दासमारूतीसाठी समर्थांनी बांधलेले मंदिर आज सुमारे सव्वातीनशे वर्षांनंतरही उत्तम स्थितीत आहे. १९६७ सालच्या भूकंपातही या मंदिरास कोठे धक्का लागला नाही साधा तडाही गेला नाही. राममंदिराचे मात्र या भूकंपाने मोठं नुकसान झालं. त्यामुळे त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. परंतु समर्थकालीन सर्व शिल्प व वास्तू कायम ठेवण्यात आली आहे. 

प्रतापमारुती 

श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे तीनशे फूट अंतरावर प्रतापमारुतीचे मंदिर आहे. या मारुतीला भीममारुती ', 'प्रताप-मारुती किंवा वीर-मारुती अशी तीन नावं आहेत. प्रताप-मारुतीची उंची सुमारे सात-आठ फूट आहे.मूर्ती अत्यंत भव्य उंच व रेखीव आहे. भीमरुपी महारुद्रा या स्तोत्रात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे पुच्छ माथा मुरडिले आहे. मस्तकावर मुकूट कानात कुंडले आहेत. कटिभोवती सुवर्णाची कासोटी व तिला रुणझुण करणा-या घंटा आहेत. टकाराचे ठाण मांडून बसलेली ही मूर्ती नेटकी व सडपातळ आहे. समर्थांनी आपल्या विशिष्ट शैलीत ठसकेबाज वर्णन केलेली ही मूर्ती पुण्यवान भक्तांना परितोषविणारी व दुष्टांना काळाग्नी व काळरुद्राग्नी सारखी भासते. 

चाफळ मठात वास्तव्य असलं की समर्थ या मूर्तीच्या चरणतलाशी बराच वेळ बसून समोर असलेल्या बकुलवृक्षावरील वानरांच्या लीला पाहात. चाफळ गावावर आलेले कोणतेही दैवी संकट या मूर्तीच्या पूजेने दूर होते अशी या भागातील भाविक जनतेची श्रद्धा आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात महारुद्र मूर्तीला महारुद्राभिषेक करण्यात येतो व अनुष्ठानाची सांगता वद्य ३० ला यथासंग साजरी केली जाते. 

श्रीक्षेत्र शिंगणवाडी 

चाफळच्या नैऋत्येला अर्ध्या मैलावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तेथील गुहेत समर्थ रामदास जप करायला जात म्हणून त्यांनी आपलं आराध्य दैवत मारुतीची तिथे स्थापना केली. चाफळच्या दोन मारुतींपाठोपाठ शके१५७१ सन १६५० मध्ये या मूर्तीची स्थापना झाली असावी असे मानले जाते. चाफळ येथे मुख्य मठ स्थापन करण्यापूर्वी समर्थांचा मठ येथे होता. शिवाजी महाराज व समर्थ रामदासांची भेट या मठालगतच्या बागेतील एका शेवरीच्या झाडाखाली झाली होती. या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांकडून गुरुदक्षिणेदाखल मिळालेले होन समर्थांनी जमलेल्या लोकांवर उधळले होते त्यातील काही नाणी अगदी परवा-परवापर्यंत सापडत होती. 

इथून जवळच रामघळ हे समर्थांचं चिंतनाला बसण्याचं ठिकाण आहे. तसंच शिवाजी महाराजांची तहान भागवण्यासाठी समर्थांनी आपल्या कुबडीनं दगड उलथून दगडाखाली पाण्याचा झरा दाखवला ते कुबडीतीर्थ ही जवळच आहे. 

या मारुतीला खडीचा मारुती किंवा बालमारुती असंही म्हणतात. मारुतीच्या डाव्या हातात त्रिशुळासारखी वस्तू आहे आणि दुसरा हात उगारलेला आहे. रामदासांच्या अकरा मारुतींमध्ये हे देऊळ सर्वात छोटं आहे. 

श्रीक्षेत्र उंब्रज 

समर्थ रामदासस्वामी चाफळहून रोज उब्रज येथे स्नानाला जात असत म्हणून येथील मारुतीची स्थापना झाली असावी. मंदिराच्या जवळ कृष्णा नदीचा घाट आहे. तिथे स्नान करायचं आणि मारुतीच्या मूर्तीची पूजा करायची असा समर्थांचा नित्यक्रम असे. या मूर्तीची स्थापना शके १५७१ सन १६५० मध्ये झाली. या मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थांनी सतत १३ दिवस कीर्तन केलं असा उल्लेख आहे. समर्थांना शके १५७० मध्ये उंब्रजमध्ये काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळे त्यांनी येथे मारुती मंदिर व त्यापाठोपाठ मठही स्थापन केला. 

समर्थांच्या अकरा मारुतींमध्ये ही मूर्ती वयानं सगळ्यात लहान वाटते. तो बालमारूती वाटतो. या मूर्तीला चांदीचे डोळे आहेत. त्याला उंब्रजचा मारुती किंवा मठातील मारुती अशी नावं आहेत. हनुमानाचं पाऊल आणि खडकावर उमटलेला श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र या दोन्हीच्या खुणा अजून इथे आहेत. रामदास बुडत असताना मारुतीनं त्यांना वाचवलं त्यावेळी उमटलेलं ते हनुमानाचं पाऊल असल्याचं मानलं जातं. 

श्रीक्षेत्र माजगाव 

माजगावच्या शिवेवर साधारण घोड्याच्या आकाराचा एक मोठा धोंडा होता. लोक त्या धोंड्यालाच ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजीत असत. एकदा समर्थ त्या गावी गेले असताना त्यांना गावक-यांनी तो धोंडा दाखवला व 'तुमच्या पवित्र हातांनी या मारुतीची प्रतिष्ठापना व्हावी अशी विनंती केली. 

गावक-यांची श्रद्धा पाहून समर्थांनी त्या धोंड्यावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली व शके १५७१ सन १६५० मध्ये त्या मारुतीची उत्सवपूर्वक स्थापना केली व तेथे देऊळही उभे केले. आजचं तिथलं देऊळ श्रीधरस्वामींनी बांधलेले आहे. माजगावचा मारुती याच नावानं हा मारुती ओळखला जातो. 

सध्या तिथे असणारे मारुतीचे मंदिर श्रीधरस्वामींनी उभारले आहे. मूर्ती पाच फूट उंचीची आहे. मूर्तीचे तोंड पश्चिमेला म्हणजे चाफळच्या मारुतीकडे आहे. देवळाच्या पूर्वेकडील बाहेरच्या भिंतींवर आकाशोड्डाण करणा-या हनुमंताचे सुंदर चित्र रेखाटले आहे. 

श्रीक्षेत्र बहे बोरगाव 

कृष्णा नदीकाठी वाळवे तालुक्यात असलेल्या बहे-बोरगाव हे समर्थस्थापित मारुतीचे जागृत आणि रम्य स्थान आहे. येथील नदीत रामलिंग नावाचे बेट आहे. तेथे एक राममंदिर असून राममूर्तीच्या पुढ्यात शिवलिंग आहे. या मारुतीचे हात कृष्णेचा प्रवाह अडवण्याच्या स्थितीत आहेत असे वाटतात. आकाराने भव्य असलेल्या या मूर्तीची स्थापना समर्थांनी इसवीसन १६५२ मध्ये केली असे मानले जाते. 

या स्थानाबद्दल एक अख्यायिका सांगितली जाते. रावणवध करुन सीतेसह परत येत असताना रामलक्ष्मणांनी बाहे गावात मुक्काम केला. सीतामाईंना गावात ठेवले आणि ते कृष्णेत स्नानासाठी गेले. स्नानानंतर श्रीराम शिवलिंगाची पूजा करण्यात मग्न असताना नदीचा प्रवाह एकदम वाढू लागला. मारुतीरायांनी लगेचच रामाच्या मागे नदीत उभे राहून दोन्ही हातांनी कृष्णेचा प्रवाह रोखला. मारुतीने प्रवाह रोखल्यामुळे प्रवाह दोन बाजूंनी पुढे गेला आणि मध्ये बेट तयार झाले. म्हणूनच या स्थानाला बाहे असे नाव पडले. 

समर्थ तिथे आले तेव्हा त्यांना ही लोकांकडून ही हकीगत कळली. मारुती नदीत उडी मारुन बसला आहे असा गावक-यांचा समज होता. जेथे रामाने वास केला तेथे मारुती असणारच असे समर्थांनीही मानले. समर्थांनी डोहात उडी मारली. काही काळ ते डोहात होते. पण त्यावेळी गावरक-यांकडून पूजेची तयारी झाली नव्हती. त्यामुळे मारुतीराय पुन्हा डोहात लुप्त झाले. समर्थांनी ते रुप आठवून दुसरी मूर्ती तयार केली आणि तिची रामाच्या मूर्तीमागे स्थापना केली. 

अत्यंत निसर्गरम्य असणा-या या क्षेत्राचा कृष्ण महात्म्यात बाहुक्षेत्र असा उल्लेख आढळतो. 


श्रीक्षेत्र मनपाडळे 

ज्योतिबाचा डोंगर आणि पन्हाळगड येथून जवळ असलेला आणि सर्वात दक्षिणेकडचा समर्थस्थापित मारुती म्हणजे श्रीक्षेत्र मनपाडळे. पन्हाळगडाचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन समर्थांनी या मारुतीची स्थापना केली असावी. 

नदीच्या अगदी टोकावर वसलेल्या या मारुती मंदिराचा गाभारा ७ ६ फूट असून त्याभोवती २६ १५ फूट असा सभामंडप आहे. मंदिर कौलारू आहे आणि त्याच्याजवळून ओढा वाहतो. बलभीम मारुतीची मूर्ती उत्तराभिमुख आहे. साधारणतः साडेपाच फूटाची ही मूर्ती साधी पण सुबक आहे. 

श्रीक्षेत्र शिरोळे 

नागपंचमीच्या सणासाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे या गावात महादजी साबाजी देशपांडे हे समर्थशिष्य राहत असत. त्यांच्या आग्रहास्तव समर्थांनी इसवीसन १६५५ मध्ये येथे मारुतीची स्थापना केली. तेव्हापासून या मारुतीच्या पूजेची जबाबदारी देशपांडे कुटुंबांकडे आहे. 

हे देऊळ उत्तराभिमुख असून मूर्तीचे तोंडही उत्तरेकडे आहे. ही सात फूट उंचीची वीरमारुतीची मूर्ती असून तिच्या कंबरपट्ट्यात घंटा कटिवस्त्र आणि गोंडा चितारलेला आहे. मूर्तीच्या मस्तकाच्या डाव्या-उजव्या बाजूला झरोके असून त्यातून मूर्तीभोवती हवा खेळती राहते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी या झरोक्यातून मूर्तीवर प्रकाश पडतो आणि फार सुंदर दृश्य दिसते. देवळाच्या दक्षिण दिशेलाही एक प्रवेशद्वार आहे. 

श्रीक्षेत्र पारगाव 

क-हाड कोल्हापूर रस्त्यावरील वाठार गावापासून वारणा साखर कारखान्याकडे जाणा-या रस्त्यावर नवे पारगाव आहे. या नव्या पारगावाच्या उत्तरेस दोन मैलावर जुने पारगाव आहे. या जुन्या पारगावचा मारुती म्हणजेच समर्थांनी स्थापलेला शेवटचा मारुती. 

अकरा मारुतींपैकी या मारुतीची मूर्ती सर्वात लहान मानली जाते. या मूर्तीची उंची फक्त दीड फूट आहे. एका सपाट दगडावर ही मूर्ती कोरलेली असून या मारुतीने केसाची शेंडी बांधलेली आहे. तो डावीकडून तोंड करुन धावत निघालेला आहे. समर्थाच्या इतर मूर्तीहून ही मूर्ती इतकी निराळी आहे की ही मूर्ती समर्थांची नव्हे अशी शंका यावी. 

या पारगावाबद्दल असेही सांगतात की राजकीय खलबतांसाठी शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास येथे येत असत असे म्हणतात. 
समर्थांचे हे अकरा मारूती जागृत देवस्थाने आहेत असे मानले जाते. हया अकरा मारूतींना 'वारीचे मारूती' असेही म्हणतात.
संदर्भग्रंथ - समर्थ स्थापित अकरा मारुती
(लेखक - पु. वि. हर्षे)

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या