श्री. दत्त करुणा त्रिपदी
आजकाल मन फार हळवं झालय. येणारा प्रत्येक दिवस काही ना काही संकट दाखवित आहे. पहलगाम हल्ला, ऑपेरेशन सिंदूर, युद्धविराम, हगवणे प्रकरण, अहमदाबाद दुर्घटना, केदारनाथ हेलिकॉप्टर क्रॅश, पेरू भूकंप, इंडोनेशिया वोलकॅनिक एरपशन, अतिवृष्टीने होणारी हानी, इस्राएल-इराण युद्ध आणि सर्वात कहर म्हणजे भविष्यवेत्यांच्या भविष्यवाण्या,1941 चे आणि 2025 चे कॅलेंडर सारखेच. नक्कीच ह्या वर्षी युद्ध, नैसर्गिक आपत्ती असे संकट येणार, परत अमूक दिवशी होणाऱ्या ग्रहांच्या युतीमुळे येणारे संकट तारीख-वार वेळेसहित सांगितले जाते. या सर्व प्रकारांनी मनःशांती ढळली जात आहे. येणारा दिवस काय घेऊन येणार ह्या चिंतेने सर्वच पोखरले जात आहेत.
प्रत्येक प्रश्नाला, समस्येला उत्तर असतेच. फक्त त्याचा शोध,जाणीव आपल्याला व्हायला हवी. मला तर ह्या प्रश्नाचे उत्तर देवकृपेनें प्राप्त झालेले आहे. माझ्या मते ह्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी दत्त भक्तांना फार परिश्रम करण्याची गरज नाही. 'श्री.दत्त करुणा त्रिपदी' आपले मन शांत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ह्यात दत्त महाराजांकडे आपण केलेल्या चुकांची माफी मागितली जाते आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना केली जाते. दत्त महाराजांच्या चरणी ही प्रार्थना केल्याने आपल्या जीवनातील अडचणी, संकटे आणि दु:ख दूर होतात. करुणा त्रिपदी पठण केल्याने मन शांत होते आणि मानसिक ताण कमी होतो, असे मानले जाते. तसेच याच्या पठणाने दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते आणि आपल्याला त्यांच्या आशीर्वादाचा लाभ मिळतो. ही करुणा त्रिपदी दत्त संप्रदायात खूप महत्वाची मानली जाते आणि दत्तभक्त नेहमी याचे पठण करतात. ह्या करुणा त्रिपदीची रचना श्री टेंबे स्वामी महाराज यांनी केली आहे. टेंबे स्वामी 'वासुदेवानंद सरस्वती' म्हणूनही ओळखले जाते. ते दत्तात्रेयांचे अवतार म्हणून ही ओळखले जातात.
करुणा त्रिपदी च्या निर्मिती बाबत एक कथा वाचनात आली ती अशी. नरसोबाची वाडी येथे पालखी प्रदक्षिणा सुरू असताना, तेथील पुजाऱ्याच्या हातून चुकून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली पडली. झाल्या प्रकरणाने सर्व लोक अपशकुन झाला म्हणून अत्यंत घाबरले व तेथील पुजारी मार्गदर्शनासाठी वासुदेवानंद सरस्वती स्वामी ह्यांना भेटण्यास गेले आणि घडलेली घटना त्यांना सांगितली. पुजाऱ्यां कडून ही घटना ऐकल्यावर स्वामी अत्यंत व्यथित होऊन ध्यानास बसले. ध्यानात त्यांनी दत्त महाराजांना या घटनेबाबत सांगितले, तेंव्हा दत्त महाराजांनी सांगितले, "हे लोक नियमांनुसार वागत नाहीत, पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हांलाच तिथे राहायचा कंटाळा आला आहे. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी!" ध्यानातून बाहेर आल्यावर स्वामींनी पुजाऱ्यांना खडे बोल सुनावले. नियमाप्रमाणे वागण्यासाठी नियमावली करून दिली. आणि परत असा अनुचित प्रकार घडला तर ते हस्तक्षेप करणार नाही अशी ताकीदही त्यांना दिली.
झाल्या प्रकाराने स्वामी अत्यंत अस्वस्थ झाले. त्यांची मनःशांती ढळली, मनाच्या या करुण अवस्थेत त्यांनी क्षमा याचनेसाठी 3 पद्याची रचना केली तीच करुणा त्रिपदी होय. ती तीन पदे पुढीलप्रमाणे-
1. शांत हो श्री गुरुदत्ता
2. श्री गुरुदत्ता जय भगवंता
3. जय करुणाघन निजजनजीवन.
ह्या तिन्ही पदांमध्ये स्वामींनी दत्तगुरुंची करुणा भाकली व झालेल्या अपराधाची क्षमा मागितली आहे. ही त्रिपदी अत्यंत भावपूर्ण, रसाळ व मंत्रमुग्ध करणारी रचना आहे. मनापासून प्रत्येक शब्दांचा अर्थ समजून घेतल्यास त्रिपदी म्हणताना डोळ्यातून अश्रू ओघळतात. यातून श्रीस्वामी महाराज, भगवान श्रीदत्तप्रभू देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर, शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केलीत तशीच आमच्यावरही करा, आमच्याकडून निरंतर सेवा करवून घ्या. आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हां सर्वांवर करुणेचे कृपाछत्र घाला, अशी अत्यंत दयार्द्र होऊन त्यांनी भगवंतांची प्रार्थना केली.
आजच्या घडीला श्रीदत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये, दत्त संप्रदायातील संतांच्या स्थानांवर ही करुणात्रिपदी दररोज आरतीनंतर विनवणी म्हणून म्हणायची पद्धतच आहे. साक्षात् दत्तावतार श्री. स्वामींचेच हे प्रासादिक, मंत्रमय शब्द असल्याने, आजवर अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की, करुणात्रिपदीच्या भावपूर्ण गायनाने श्रीदत्तप्रभूंची कृपा नक्की प्राप्त होतेच. मंत्ररुप प्रसादीक व दत्त भक्तांस प्रत्यक्ष प्रमाण असणार्या ह्या श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती यांच्या वरद चरित्र ग्रंथात ओवी क्रमांक ४० ते ५३, अध्याय ९२ ह्यात करुणा त्रिपदीचे महत्व विशद केले आहे.
ह्याचा संक्षिप्त भावार्थ असा आहे:-
'काही आपत्ति आल्यास जो नित्य एकविस वेळा श्रध्दायुक्त अंतःकरणाने, मनात कोणती ही शंका न आणता ह्या त्रिपदीचे पठण करेल त्याच्या आपत्तिचे पुर्ण निरसन होइल. तसेच पुर्ण श्रध्दावंत अंत:करणाने जो ह्या त्रिपदीचे एकवीस वेळा श्रवण करेल त्याची व्याधी दुर होऊन तो निरोगी होईल व त्याला व्याधीतून मुक्ती लाभेल. भक्तांसाठी करुणा त्रिपदीचे हे तत्कलिक फळ होय.'
आपण कुठेही असो, प्रवासात, घरी-दारी न चुकता आपल्या पठणात आपण करुणा त्रिपदी ठेवली पाहिजे. आर्तभावनेने त्रिपदी पठण केल्यास दत्त महाराज आपल्या हाकेला नक्कीच धावून येतील आणि आपल्याला मनःशांतीचा लाभ होईल. करुणा त्रिपदी म्हंटल्यानंतर कळपात चुकलेल्या वासराला अचानक त्याची आई दिसाल्यावर जसा आनंद होतो तसाच आनंद आपल्या भरकटलेल्या मनाला योग्य रस्ता सापडल्याचा होतो. दत्त प्रभूंची सेवा म्हणून जास्तीत जास्त दत्त भक्तांपर्यंत करूणा त्रिपदीचा प्रचार प्रसार आपण करु आणि तणावमुक्त, शांत जीवन जगण्याचा मार्ग आपण मनापासून अंगीकारू.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
-©सौ. प्रांजली नवीन कुलकर्णी.
No comments:
Post a Comment