December 20, 2013

श्री स्वामी चरित्र सारामृत-अध्याय १८



श्री गणेशाय नमः ॥ स्वामीसुताच्या गादीवरी । कोण नेमावा अधिकारी । ऐसा प्रश्न सेवेकरी । करिताती समर्थांते ॥१॥
तेव्हा बोलले समर्थ । सेवेकरी असती सांप्रत । परी एकही मजला त्यात । योग्य कोणी दिसेना ॥२॥
जेव्हा येईल आमुच्या मानसी । त्या समयी मोर पांखरासी । अधिकारी नेमू गादीसी । चिंता तुम्ही न करावी ॥३॥
मोर पांखरा मोर पांखरा । समर्थ म्हणती वेळोवेळा । रात्रंदिन तोची चाळा । मोठमोठ्याने ओरडती ॥४॥
आमुची पायाची वीट । जतन करावी नीट । वारंवार म्हणती समर्थ । काकूबाईलागोनी ॥५॥
लपवूनी ठेविले विटेसी । ती दिली पाहिजे आम्हांसी । याचा अर्थ करणासी । स्पष्ट काही कळेना ॥६॥
असो स्वामीसुताचा भ्राता । कोकणांत राहात होता । स्वामीसुत मृत्यु पावता । वर्तमान कळले त्या ॥७॥
तो केवळ अज्ञान । दादा तयांचे अभिधान । त्याचे शरीरी असमाधान । कृश होत चालला ॥८॥
काकूबाईने तयासी । आणविले आपणापासी । एके दिवशी समर्थांसी । दादाप्रती दाखविले ॥९॥
बाळ चालले वाळोनी । यासी अमृतदृष्टीने पाहोनी । निरोगी करावे जी स्वामी । बाई विनवी समर्थांते ॥१०॥
समर्थ बोलले बाईसी । चार वेळा जेवू घाला यासी । आरोग्य होईल बाळासी । चिंता मानसी करु नको ॥११॥
त्याप्रमाणे बाई करिता । दादासी झाली आरोग्यता । समर्थांची कृपा होता । रोग कोठे राहील ॥१२॥
केजगांव मोगलाईत । तेथे नानासाहेब भक्त । त्यांनी बांधिला श्रींचा मठ । द्रव्य बहुत खर्चिले ॥१३॥
श्रींची आज्ञा घेऊनी सत्य । पादुका स्थापाव्या मठात । याकारणे अक्कलकोटी येत । दर्शन घेत समर्थांचे ॥१४॥
ते म्हणती काकूबाईसी । पादुका स्थापन करायासी । तुम्ही पाठवा दादासी । समागमे आमुच्या ॥१५॥
बाई म्हणे तो अज्ञान । तशात शरीरी असमाधान । त्याची काळजी घेईल कोण । सत्य सांगा मजलागी ॥१६॥
परी आज्ञा देतील समर्थ । तरी पाठवीन मी सत्य । मग समर्थांजवळी येत । घेवोनिया दादासी ॥१७॥
समर्थे वृत्त एकोन । म्हणती द्यावे पाठवून । बाळ जरी आहे अज्ञ । तरी सांभाळू तयासी ॥१८॥
काकूबाई बहुत प्रकारे । समर्था सांगे मधुरोत्तरे । दादासी पाठविणे नाही बरे । वर्जावे आपण सर्वाते ॥१९॥
समर्थ तियेसी बोलले । त्यात तुमचे काय गेले । आम्हांसी दिसेल जे भले । तेच आम्ही करु की ॥२०॥
शेवटी मंडळी सांगाती । दादासी पाठविले केजेप्रती । पादुका स्थापन झाल्यावरती । दादा आला परतोनी ॥२१॥
पुढे सेवेकर्‍यां सांगाती । त्यासी मुंबईस पाठविती । ब्रह्मचार्‍यांसी आज्ञा करिती । यासी स्थापा गादीवरी ॥२२॥
ब्रह्मचारीबुवांजवळी । दादासी नेत मंडळीं । जी समर्थे आज्ञा केली । ती सांगितली तत्काळ ॥२३॥
दादासी करुनी गोसावी । मुंबईची गादी चालवावी । स्वामीसुताची यासी द्यावी । कफनी झोळी निशाण ॥२४॥
ब्रह्मचारी दादासी । उपदेशिती दिवस निशी । गोसावी होऊनी गादीसी । चालवावे आपण ॥२५॥
दादा जरी अज्ञान होता । तरी ऐशा गोष्टीकरीता । नकार म्हणेची सर्वथा । न रुचे चित्ता त्याचिया ॥२६॥
यापरी ब्रह्मचार्‍यांनी । पाहिली खटपट करोनी । शेवटी दादांसी मुंबईहूनी । अक्कलकोटा पाठविले ॥२७॥
दादास घेऊनी सत्वरी । श्रीसन्निध आले टाळकरी । तेव्हा दादा घेवोनी तुंबरी । भजन करीत आनंदे ॥२८॥
समर्थे ऐसा समयासी । आज्ञा केली भुजंगासी । घेऊनी माझ्या पादुकांसी । मस्तकी ठेव दादाच्या ॥२९॥
मोर्चेल आणूनि सत्वरी । धरा म्हणती त्यावरी । आज्ञेपमाणे सेवेकरी । करिताती तैसेचि ॥३०॥
श्रींच्या पादुका शिरी पडता । उपरती झाली त्याच्या चित्ता । हदयी प्रगटला ज्ञानसविता । अज्ञान गेले लयाते ॥३१॥
दादा भजनी रंगला । देहभानहि विसरला । स्वस्वरुपी लीन झाला । सर्व पळाला अहंभाव ॥३२॥
धन्य गुरुचे महिमान । पादुका स्पर्श करोन । जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान । काय धन्यता वर्णावी ॥३३॥
असो दादांची पाहून वृत्ती । काकूबाई दचकली चित्ती । म्हणे समर्थे दादांप्रती । वेड खचित लाविले ॥३४॥
ती म्हणे जी समर्था । आपण हे काय करता । दादांचिया शिरी ठेविता । पादुका काय म्हणोनी ॥३५॥
समर्थ बोलले तयेसी । जे बरे वाटले आम्हासी । तेचि करु या समयासी । व्यर्थ बडबड करु नको ॥३६॥
काकूबाई बोले वचन । एकासी गोसावी बनवोन । टाकिला आपण मारुन । इतुकेचि पुरे झाले ॥३७॥
ऐकोन ऐशा वचनाला । समर्थांसी क्रोध आला । घाला म्हणती बाईला । खोड्यामाजी सत्वर ॥३८॥
काकूबाईने आकांत । करुनिया मांडिला अनर्थ । नाना अपशब्द बोलत । भाळ पिटीत स्वहस्ते ॥३९॥
परी समर्थे त्या समयीं । लक्ष तिकडे दिले नाही । दादांसी बनविले गोसावी । कफनी झोळी अर्पिली ॥४०॥
दुसरे दिवशी दादांसी । समर्थ पाठविती भिक्षेसी । ते पाहूनी काकूबाईसी । दुःख झाले अपार ॥४१॥
लोळे समर्थांच्या चरणांवरी । करुणा भाकी पदर पसरी । विनवीतसे नानापरी । शोक करी अपार ॥४२॥
समर्थांसी हसू आले । अधिकचि कौतुक मांडिले । दादांसी जवळ बोलाविले । काय सांगितले तयासी ॥४३॥
अनुसया तुझी माता । तिजपाशी भिक्षा माग आता । अवश्य म्हणोनी तत्त्वता । जननीजवळ पातला ॥४४॥
ऐसे बाईंने पाहोनी । क्रोधाविष्ट अंतःकरणी । म्हणे तुझी ही करणी । लोकापवादाकारण ॥४५॥
भिक्षान्न आपण सेवावे । हे नव्हेची जाण बरवे । चाळे अवघे सोडावे । संसारी व्हावे सुखाने ॥४६॥
ऐकोनी वचन । उदास झाले तिचे मन । असो दादा गोसावी होवोन । स्वामीभजनी रंगले ॥४८॥
काही दिवस झाल्यावरी । मग आले मुंबापुरी । स्वामीसुताच्या गादीवरी । बसोन संस्था चालविली ॥४९॥
कलियुगी दिवसेदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥५०॥
दोघा बंधूंचे ऐसे वृत्त । वर्णिले असे संकलित । केला नाही विस्तार येथ । सार मात्र घेतले ॥५१॥
इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा प्रेमळ परिसोत ।
अष्टदशोऽध्याय गोड हा ॥५३॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या